महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सोळावा
दीक्षांत समारंभ
राज्यपाल चे.विद्यासागर राव यांच्या हस्ते
डॉ.प्रकाश आमटे यांना डी.लिट. प्रदान
नाशिक दि.20 :- महाराष्ट्र विज्ञान
विद्यापीठाच्या 16 व्या दीक्षांत समारंभात
राज्यपाल चे.विद्यासागर राव यांच्या
हस्ते ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांना डी.लिट. पदवी प्रदान करण्यात
आली. तसेच विविध विद्याशाखेतील
यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, डॉ.प्रकाश आमटे, डॉ.मंदाकिनी आमटे, कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर, आरोग्य संचालक डॉ.प्रविण शिनगारे, प्रति-कुलगुरू डॉ.मोहन खामगावकर, परीक्षा नियंत्रक डॉ.कालिदास चव्हाण आदी उपस्थित होते.
दीक्षांत मिरवणूकीने कार्यक्रमाची सुरूवात झाली. समारंभात मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष 2015-16 मधील पदविका, पदवी, पदव्युत्तर
अभ्यासक्रम आणि आंतरवासिता पूर्ण केलेल्या विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या 8887 विद्यार्थ्यांना
पदवी प्रदान करण्यात आली. त्यात आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे 639, दंतविद्या
शाखा 1563, आयुर्वेद 721,
युनानी 54, होमिओपॅथीच्या 947, पीबी बी.एस्सी नर्सिंग 229, बेसिक
बी.एस्सी. नर्सिंग
1158, बी.पी.टी.एच 97, बी.ओ.टी.एच. 11, बी.एस.एल.पी. 36, बी.पी.ओ. 3, बी.पी.एम.टी. 197, डिप्लोमा
इन ऑप्थॅल्मिक सायन्स 31, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री 50, पदव्युत्तर
विद्याशाखांमध्ये एम.डी.मेडिकल 894,
एम.एस.मेडिकल 424, डी.एम.मेडिकल 49, एम.सी.एच. 57, पी.जी.डिप्लोमा 284, पॅरामेडिकल
डिप्लोमा 64, पी.जी.डी.एम.एल.टी. 80,
एम.एस्सी. फार्मासिटीकल
मेडिसिन 10,
एम.एस्सी.मेडिकल बायोकेमिस्ट्री 1, एम.बी.ए. 30, एम.पी.एच. 9, एम.डी.एस. 351, पी.जी.डिप्लोमा दंत 2, एम.डी.आयुर्वेद 430, एम.एस.आयुर्वेद 149, एम.डी.युनानी 11, एम.एस.युनानी 04, पी.जी.डिप्लोमा आयुर्वेद 9, एम.डी.होमिओपॅथी 30, एम.ए.एस.एल.पी. 19, एम.एस्सी.नर्सिंग 101, एम.पी.टी.एच. 103, एम.ओ.टी.एच. 10, एम.पी. ओ. 4, ए.डी.एच.एम. 1, पी.एच.डी. विद्याशाखेच्या 25 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध
विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना
सुवर्णपदके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
विद्यापीठाच्या
प्रगतीचा अहवाल सादर करताना कुलगुरू डॉ.म्हैसेकर यांनी 2017 पर्यंत विद्यापीठांतर्गत
संपूर्ण डिजीटलायझेशन होईल, असा विश्वास व्यक्त केला. पुढील वर्षापासून डॉ.प्रकाश आमटे
यांच्या सहकार्याने आदिवासी भागासाठी फेलोशिप
अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यापीठाने अवयवदान
सारख्या मोहिमेत सक्रीय सहभाग घेतला. सर्व परीक्षा केंद्रात सीसीटीव्हीची सुविधा सुरू
करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
ई-लर्निंग सुविधेचे उद्घाटन
राज्यपाल महोदयांच्या
हस्ते विद्यापीठाच्या ई-लर्निंग सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. या सुविधेच्या माध्यमातून विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये
जोडली जाणार असून विद्यार्थ्यांना विविध व्याख्याने आणि प्रात्यक्षिकांचा लाभ होणार
आहे. कुलगुरू डॉ. म्हैसेकर यांनी या सुविधेविषयी
माहिती दिली.
विद्यार्थ्यानी ग्रामीण रुग्णांना सेवा देण्याचा वसा घ्यावा-गिरीष
महाजन
डॉ. प्रकाश आमटे यांच्यासारख्या सेवाव्रतींचा आदर्श घेऊन वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देण्याचा वसा घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केले. स्नातकांना उद्देशून केलेल्या दीक्षांत भाषणप्रसंगी ते बोलत होते.
श्री. महाजन म्हणाले, ज्ञान हे बदलासाठी शक्तीशाली साधन आहे. समाजाच्या विकास आणि कल्याणासाठी ज्ञानाची निर्मीती व
उपयोजन आवश्यक आहे. सकारात्मक दृष्टिकोण आणि कार्यातील नैतिकता विद्यार्थ्यांना आनंद देत व्यवसायिक यशाकडे नेते. जीवनात येणाऱ्या संधीमध्ये समाजहीत पाहिल्यास राष्ट्राच्या विकासात योगदान होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, आरोग्य सेवा क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. विद्यापीठाने दिलेल्या सुविधा आणि प्रशिक्षण उपयुक्त ठरणारे आहे. नाविन्यपूर्ण
दृष्टिकोण ठेवून या
ज्ञानाचा समाजासाठी उपयोग झाल्यास आपल्या कुटुंब आणि राष्ट्राला अभिमान वाटेल, असे त्यांनी सांगितले.
डॉ. आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागाला दिलेल्या सेवेचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीचे ध्येय समोर ठेवून उच्च प्रतीच्या शिक्षणासह सामाजिक सेवेचे मुल्य जोपासणारे विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या विकासासाठी शासन प्रयत्न करीत असून विद्यापीठाचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील, अशी ग्वाही श्री.महाजन यांनी दिली.
निष्पाप आदिवासींसोबत काम करून जीवन समृद्ध झाले-डॉ.प्रकाश आमटे
वीज, रस्ते, आरोग्यसुविधा नसलेल्या भागात बाबांच्या प्रेरणेने काम सुरू करता आले. या कार्यात पत्नी आणि सहकार्यांचे योगदान मिळाले. त्याचबरोबर निष्पाप आदिवासींसोबत काम करून जीवन समृद्ध झाले, अशा शब्दात डॉ.प्रकाश आमटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ते म्हणाले, निष्ठेने काम केल्यास समस्यांवर मात करता येते. पदवी मिळाल्याचा आनंद असतोच, मात्र त्यापेक्षाही दु:खी रुग्णांची सेवा केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे हास्य ही मोठी ऊर्जा असते. समाजासाठी काम करताना मिळणारे समाधान कोणी हिरावून नेऊ शकत नाही.
ग्रामीण भागासारखा अनुभव शहरात मिळणार नाही. हा अनुभव आयुष्याला कलाटणी देणारा ठरू शकेल. त्यामुळे ग्रामीण भागाच्या सेवेसाठी विद्यार्थ्यांनी किमान एक वर्ष द्यावे. देशासाठी हे कार्य करीत असल्याची भावना त्यामागे असावी आणि हे करताना गरज व लोभातली पुसट रेषा विद्यार्थ्यांनी ओळखावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment