Saturday 30 December 2017

खान्देश महोत्सव

पालकमंत्र्यांची खान्देश महोत्सवास भेट


नाशिक, दि.30 :  राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी खान्देश महोत्सावास भेट दिली. यावेळी त्यांनी  प्रदर्शनाला भेट देऊन खान्देशी पदार्थ आणि विविध वस्तुंची माहिती घेतली. त्यांचे समवेत खान्देश महोत्सवाच्या आयोजक आमदार सीमा हिरे, पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल आदी होते.

श्री.महाजन म्हणाले, खान्देश महोत्सवाच्या माध्यमातून खान्देशच्या लोप पावत चाललेल्या वैभवशाली परंपरेचे दर्शन होत आहे. काळाच्या ओघात लुप्त होणाऱ्या अशा परंपरांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. नव्या पिढीला महोत्सवाच्या माध्यमातून खान्देशी लोकसंस्कृती आणि लोकजिवनाचे दर्शन घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुंभमेळ्यानंतर एका चांगल्या सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाल्याचे नमूद करून आमदार श्रीमती हिरे यांनी महोत्सवाचे उत्तम आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

-----

जिल्हा नियोजन समिती

ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगदान द्या-गिरीष महाजन


नाशिक, दि. 30 : जिल्हा विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा असून लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी गावपातळीवर जावून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. सर्वांच्या योगदानातून ग्रामीण विकासाच्या शासनाच्या प्रयत्नांना बळ मिळेल आणि विकासप्रक्रीया अधिक गतीमान होईल, असे  प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.  बैठकीस ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहूल आहेर, बाळासाहेब सानप, नरहरी झिरवाळ, जिवा पांडू गावित, निर्मला गावित, दिपीका चव्हाण, अनिल कदम, जयंत जाधव, राजाभाऊ वाजे,  जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय दराडे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र  चौधरी आदी उपस्थित होते.

श्री. महाजन म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेमध्ये लोकसहभागामुळे चांगले यश दिसून आले असून सामाजिक संस्था, उद्योग, संघटनांच्या सहभागामुळे ग्रामीण भागातील पाण्याची समस्या सुटण्यास मदत झाली आहे. स्वच्छ भारत अभियानातदेखील असाच लोकसहभाग अपेक्षित आहे. या अभियानात देशपातळीवर जिल्ह्याचा नावलौकीक करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा यादीत केल्याने याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. एमटीडीसीच्या माध्यमातूनही पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. त्र्यंबकेश्वर येथे निर्मल वारीउपक्रम यशस्वी करण्यासाठी आणि भाविकांच्या सुविधेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  नमामी नर्मदेच्या धर्तीवर गोदावरी स्वच्छतेसाठी नमामी गोदे हा उपक्रम सुरु करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

पालकमंत्री म्हणाले, समिती सदस्यांच्या सूचनांचा विचार योजनांची अंमलबजावणी करताना करण्यात येणार आहे. प्रामुख्याने ग्रामीण रस्ते तसेच पायाभूत विकास कामांना ध्यानात घेऊन नियोजन केले जाईल. रस्ते कामांचा दर्जा उत्तम राखला जावा आणि कामात पारदर्शकता रहावी यासाठी कामांची माहितीचे फलक ठिकाणावर लावले जावेत, अशी सुचना त्यांनी केली.

राज्यमंत्री भुसे म्हणाले, जिल्हा परिषद प्रशासकिय इमारतीसाठी त्र्यंबकेश्वर रोडवरील जागा निश्चित झाली असून तेथे पूर्वी असलेली कुकुटपालन शेड स्तलांतरीत करुन जागा ताब्यात घेण्यासाठी जिवायोतून तरतूद केली जावी. जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीची कामेदेखील हाती घेण्यात यावी, अशी सुचना त्यांनी केली. कर्जमाफी योजनेअंतर्गत सहकारी विकास संस्थांनी नियमानुसार कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.  
बैठकीत लोकप्रतिनिधींनी चर्चेत सहभाग घेऊन विविध विषयांसंदर्भात सुचना मांडल्या. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेच्या 900 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी
बैठकीत  2018-19 साठी 900 कोटी 52 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास समितीने  मंजूरी देली. हा आराखडा राज्य समितीच्या बैठकीत मंजूरीसाठी ठेवण्यात येईल.
यापैकी सर्वसाधारण योजनेअंतर्गत 321 कोटी 38 लाख, आदिवासी उपयोजनेअंतर्गत 481 कोटी 59 लाख आणि अनुसुचित जाती उपयोजनेसाठी 97 कोटी 55 लाख रुपयांच्या आराखड्यास मंजूरी देण्यात आली.
सर्वसाधारण योजनेअंतर्गत सुक्ष्म सिंचन योजनेसाठी 10 कोटी 74 लाख, जनसुविधा ग्रामपंचायतींना सहाय्यक अनुदानासाठी 15 कोटी,  लघुपाटबंधारे विभाग साडेसतरा कोटी, रस्ते विकास 34 कोटी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 48 कोटी 21, पर्यटन आणि यात्रास्थळांचा विकास 7 कोटी 24 लक्ष, ग्रामीण रुग्णालयाचे विस्तारीकरण एक कोटी, नळ पाणीपुरवठा योजना 20 कोटी 39 लक्ष, निर्मल भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकाम 23 कोटी, नगरपालिका आणि महानगरपालिकांना अर्थसहाय्य 11कोटी 91 लाख, अंगणवाडी बांधकाम 2 कोटी,  प्राथमिक शाळा बांधकाम 3 कोटी आणि नाविन्यपूर्ण योजनेसाठी 16 कोटी 7 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

 जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत यावर्षी  झालेल्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.यावर्षी करण्यात आलेल्या तरतूदींपैकी सर्वसाधारण योजनेतून 87 कोटी 33 लाख रुपये , आदिवासी उपयोजनेतून 111 कोटी 41 लाख रु. व अनुसुचित जाती उपयोजनेतून 3 कोटी 70 लाख रुपये खर्च झाले असून खर्च झालेल्या खर्चाची टक्केवारी 67.35 टक्के आहे. उर्वरीत कालावधीत संपूर्ण निधी खर्च केला जाईल याची दक्षता घ्यावी. कामांचे योग्य नियोजन करून ती वेळेत पुर्ण होण्यासाठी व जिल्हा वार्षिक योजनेची प्रलंबित कामे त्वरीत पुर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.


नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार

याप्रसंगी पालकमंत्री महाजन यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये निवड झालेल्या नवीन सदस्यांचा सत्कार केला. पालकमंत्री म्हणाले, नवीन सदस्यांना कामकाजाची माहिती व्हावी यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल. त्यांनी कामकाजामध्ये भाग घेऊन आपल्या भागांतील जनतेचे प्रश्न मांडावेत, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीस सुरुवातीस योजनेतून तयार केलेल्या मातृत्व ॲपचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ॲपची निर्मिती शासनाने डीजीटल इप्मॅक्ट स्क्वेअर आणि टाटा कन्सलटन्सी यांच्या सहभागाने केली आहे. गर्भवती मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या ॲपचा वापर करण्यात येत असून अंबोली व अंबड येथे याच्या वापरास प्रथम सुरुवात करण्यात आली. यामध्ये गर्भवती मातांची माहिती नोंद करण्यात येईल. अतिजोखमीच्या मातांना तातडीने आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी याचा उपयोग होईल.


----

Wednesday 27 December 2017

कौशल्य विकास

     कौशल्य विकासामुळे युवकांना रोजगाराच्या संधी - सुभाष देसाई


       नाशिक, दि. 27:- साधन संपन्नता, पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळामुळे उद्योगांसाठी पोषक वातारण असून भविष्यात शैक्षणिक पात्रतेसोबतच कौशल्य असलेल्या युवकांना व्यवसाय व नोकरीसाठी अनेक संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
          बेजॉन देसाई फाऊंडेशन पुरस्कृत कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सीमाताई हिरे, प्रा.देवयानी फरांदे, वनाधिपती विनायकराव पाटील, मानवधन शिक्षण संस्थेचे प्रकाश कोल्हे, बेजॉन देसाई फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज टिबरेवाला, युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे विजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

          श्री. देसाई म्हणाले, रोजगार निर्मितीच्यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारने कौशल्य विकासावर भर देण्याचे धोरण स्विकारले असून राज्यामध्ये यासाठी महाराष्ट्र कौशल्य विकास महामंडळ तयार  करण्यात आले आहे. त्यासाठी स्वतंत्र खाते निर्माण करण्यात आले आहे. महाविद्यालयातून मोठ्या संख्येने बाहेर पडणाऱ्या पदवीधरांची संख्या लक्षात घेता त्यांना कौशल्य संपन्न करण्याची गरज आहे.

          कौशल्य विकासाच्यादृष्टीने पावले उचलतांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या आधुनिकीकरणासाठी उपाय करण्यात येत आहे. राज्यात 900 कौशल्य विकास संस्था असून त्यांच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात येत आहे. मोठे उद्योग या संस्थांना दत्तक घेत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
          अमरावती येथे वस्त्रोद्योग क्लस्टरमधील सियाराम, रेमण्ड आदी मोठ्या कापड उद्योगासाठी लागणारे कुशल कामगार तयार करण्यासाठी देशपातळीवरील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईनची तेथे सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे तेथील मुली , महिला व युवकांना  प्रशिक्षण आणि रोजगाराची मोठी संधी मिळणार आहे, असे श्री. देसाई म्हणाले.
          याप्रसंगी आमदार श्रीमती हिरे , प्रा. फरांदे यांच्यासह अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.  मंत्री महोदय व मान्यवरांनी कौशल्य विकास केंद्राची पाहणी केली.



                                                 उद्योग विकासाबाबत उद्योजकांसमवेत चर्चा
       उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी नाशिकमधील उद्योग विकास व उद्योजकांच्या विविध प्रश्नांबाबत  निवडक उद्योजकांसमवेत चर्चा केली. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थपक पी.डी. रेंदाळकर, नासचे अध्यक्ष विक्रम सारडा, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, डॉ. उदय खरोटे , विनोद शहा, विक्रम मते आदी उपस्थित होते.
          याप्रसंगी कायमस्वरुपी उद्योग प्रदर्शन केंद्र (इंटरनॅशनल कनव्हेन्शन सेंटर ) उभारणे, लघुउद्योग घटकांसाठी औद्योगिक संकुल उभारणे व  महिला उद्योजकांसाठी उद्योग गाळे उपलब्ध करुन देणे आदीप्रश्नी उद्योग संघटना करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती  मंत्रीमहोदयांना देण्यात आली.  श्री. देसाई यांनी  यावेळी नाशिक येथील औद्योगिक विकासासाठी शासन कटीबद्ध असून विविध प्रश्नांबाबत उच्चस्तरीय बैठकीमध्ये चर्चा करुन तातडीने प्रश्न सोडविण्यात येतील, असे सांगितले.    
                                                              
00000

  

Tuesday 26 December 2017

‘शेल्टर-2017’

शेल्टर’च्या माध्यमातून नाशिकचा ब्रॅण्ड तयार करा
समृद्धी महामार्गास  नाशिकसाठी ‘डेडीकेटेड कनेक्टर’- मुख्यमंत्री

नाशिक दि.26 :- शहराला नवा आकार देण्याचे काम बांधकाम व्यावसायकिच करू शकतात.  शेल्टर प्रदर्शानच्या माध्यमातून नाशिकचा  ब्रॅण्ड  विकसीत  करण्याचा प्रयत्न करण्यात यावा. नाशिकच्या विकासाच्यादृष्टीने समृद्धी महामार्गास नाशिकसाठी ‘डेडीकेटर कनेक्टर’ देण्याचा निश्चित विचार करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
क्रेडाई नाशिकच्यावतीने डोंगरे वसतीगृह मैदान येथे आयोजित शेल्टर-2017’ प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीष महाजन, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, डॉ.राहुल आहेर, महापौर रंजना भानसी, शेल्टर समितीचे अध्यक्ष सुनिल कोतवाल, समन्वयक उदय घुगे  आदी उपस्थित होते.

 मुख्यमंत्री म्हणाले, कोणतेही शहर हे त्या शहरातील आपुलकीने वागणाऱ्या नागरिकांमुळेच मोठे होते. क्रेडाईने हे आपुलकीचं नाते जपले असून आपल्या सर्वांच्या माध्यमातून नाशिकला स्मार्ट सिटी बनवायचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घरे 2022 अंतर्गत सर्व सामान्य नागरिकांना परवडणारी घरे बांधण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे येत्या काळात सर्वाधिक गुंतवणूक ही बांधकाम व्यवसायात होणार आहे. शहरी भागात 10 लाख व ग्रामीण भागात साडेबारा लाख घरे बांधावयाची असल्याने क्रेडाइेने हे शिवधनुष्य पेलण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

 प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापुर महानगरपालिका 30 हजार घरे तर नागपुर महानगरपालिका 10 हजार घरे बांधत आहे. नाशिक शहरातही याप्रकारची घरे बांधण्यासाठी सहभाग घेऊन महापालिकेमार्फत अशी घरे बांधण्याचा प्रस्ताव दिल्यास त्यास केंद्र व राज्य शासनामार्फत तात्काळ मंजुरी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
 महाराष्ट्राला देशाच्या वीस वर्ष पुढे घेऊन जाण्याची शक्ती असलेला समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जात आहे. या महामार्गाला ‘डेडीकेटेड कनेक्टर’च्या माध्यमातून ईगतपुरी ते नाशिक जोडण्यासाठी निश्चीतपणे प्रयत्न केला जाईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, नाशिक शहर हे ऐतिहासिक व पौराणिकदृष्टया महत्वपूर्ण शहर आहे. येथील वातावरण चांगले आहे. या शहराच्या सुरक्षिततेसाठी शहरात सिसिटीव्हीचे नेटवर्क उभारण्यात येणार असून शहरातील प्रमुख ठिकाणी वायफाय सेवाही सुरु करण्यात येणार आहे. नाशिक शहर दत्तक घेतलेले असल्याने या शहराच्या विकासासाठी शासनासमोर येणाऱ्या प्रस्तावांना सकारात्मक दृष्टीकोनातून मान्यता देण्यात येईल.

शहरातील परिवहनसेवा चांगली असेल तर शहर सुधारते हा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून शहरातील एस.टी.महामंडळ चालवित असलेली परिवहन सेवा महापालिकेने चालवावी यासाठी शासन मनपाला सर्वतोपरी मदत  करण्यात येईल. शहराच्या प्रस्तावित विकास आराखड्यासंदर्भात असलेल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्व संबंधितांची बैठक लवकरच मुंबई येथे घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
 क्रेडाईच्या वतीने अध्यक्ष सुनिल कोतवाल व समन्वयक उदय घुगे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्मृतीचिन्ह देवुन स्वागत केले. यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष सुनिल कोतवाल यांनी प्रास्ताविकात प्रदर्शनाबाबत माहिती दिली. शेल्टरचे समन्वयक श्री. घुगे यांनीदेखील विचार व्यक्त केले.
 या कार्यक्रमास शहरातील उद्योजक, बांधकाम व्यावसायिक , बँकर्स, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---         
         




मंदिर जिर्णोद्धार

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकासासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य -मुख्यमंत्री

नाशिक दि.26 :-  श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला देशभरातून येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यशासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल आणि लवकरच त्या संदर्भातील बैठक आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाही  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
त्र्यंबकेश्वर येथे संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिराच्या जिर्णोद्धाराचे भूमीपूजन आणि भक्तनिवासाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीष महाजनग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, खासदार हेमंत गोडसे,  हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, निर्मला गावीत, दिपिका चव्हाण, डॉ.राहुल आहेर, सीमा हिरे, आशिष शेलार, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर,  आदी उपस्थित होते.

           संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन करणे हा भाग्याचा क्षण असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले,  संत निवृत्तीनाथ महाराजांचे मंदीर उभे करणे हे ईश्वरीय कार्य आहे. या कार्यात नागरिकांच्या सहभागाबरोबरच शासनाच्यावतीने आवश्यक सहकार्य करण्यात येईल. नेत्रदिपक असा कुंभमेळा पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाल्याने एमआयटी सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यवस्थापनाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने राज्याचा विशेष गौरव केला. नागरिकांचे सहकार्य या सोहळ्यासाठी महत्वाचे ठरले.

          त्र्यंबकेश्वर हे धर्म आणि संस्कृतीचे पीठ असल्याने येथे सुविधा निर्माण करण्याबाबत राज्यशासन गंभीर आहे. नागरिकांच्या सहकार्याने या पावन नगरीचा विकास करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

          वारकरी संप्रदायाने परकीय आक्रमणाच्या काळात भागवत धर्म जिवंत ठेवला. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह वारकरी संप्रदायातील संतांनी सद्विचारांचा वारसा महाराष्ट्राला दिला आहे. त्यामुळे निवृत्तीनाथ मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या माध्यमातून विचारांचा हा वारसा पुढे नेण्यासाठी शासनाचे सहकार्य राहील, असेही  मुख्यमंत्री म्हणाले.


          पालकमंत्री महाजन म्हणाले, कुंभमेळा, संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदीर आणि बारा ज्योर्तिलिंगापैकी एक श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर यामुळे त्र्यंबकेश्वरचे नांव राष्ट्रीयस्तरावर पोहोचले आहे. देशभरातून भाविक या ठिकाणी येतात. या पवित्रनगरीचे पर्यटनस्थळात रुपांतर करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. येथे पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा विशेष भर आहे. युनोस्कोने कुंभमेळ्याला आंतरराष्ट्रीय वारसा घोषित केल्याने त्र्यंबकेश्वरचे नांव जगभरात पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन सर्व सहकार्य करेल, असे श्री. महाजन म्हणाले.
             याप्रसंगी शाम जाजु, मारुती महाराज कुऱ्हेकर यांनी विचार व्यक्त केले. संस्थानचे  अध्यक्ष संजयनाना धोंडगे यांनी प्रास्ताविकात भक्तनिवास आणि संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज मंदीर जिर्णोद्धाराविषयी माहिती दिली.

          मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिर जिर्णोद्धाराचे भूमिपूजन आणि नव्याने उभारण्यात आलेल्या भक्तनिवासाचे लोकार्पण करण्यात आले.
          कार्यक्रमाला सांदिपन महाराज शिंदे, पांडुरंग महाराज धुवे, माधवमहाराज धुवे,  सागरानंद सरस्वती महाराज, संस्थानचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस यांचे ओझर येथे स्वागत
            तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे आज ओझर विमानतळ येथे   आगमन झाले.  प्रशासनाच्यावतीने  विभागीय आयुक्त महेश झगडे  यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे,  देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, विशेष पोलिस महानिरीक्षक विनय चौबे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल, महानगरपालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय दराडे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना  आदी उपस्थित होते. 


00000