Tuesday 30 August 2016

महाअवयवदान रॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद
अवयवदान जनजागृतीच्या संदेशांनी नागरिकांचे लक्ष वेधले
            
              
          नाशिक दि 30 :- जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विद्यान विद्यापीठातर्फे महाअवयवदान अभियानांतर्गत आयोजित रॅलीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. रॅलीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या अवयवदान जनजागृती संदेशांनी शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले. रॅलीच्या समारोपप्रसंगी अवयवदात्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.

          रॅलीचा शुभारंभ अनंत कान्हेरे मैदान येथे करण्यात आला. यावेळी आमदार सीमा हिरे, महापौर अशोक मुर्तडक, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.दिलीप म्हैसेकर, अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, निलीमाताई पवार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण, आरोग्य उपसंचालक डॉ. सुनिल पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एस.पी.जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते.

          रॅलीच्या उद्घाटप्रसंगी मोतीवाला होमिओपॅथी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून अवयवदानाचा संदेश दिला. जिल्हा रुगणालय, जिल्हा परिषद, कालीदास नाट्यगृह, शालीमार, महात्मा गांधी मार्ग, कन्या शाळामार्गे शिवाजी स्टेडीअम येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. ‘अवयवदान श्रेष्ठ दान’,  ‘बी अ डोनर, बी अ हिरो’,  ‘ऑर्गन डोनेशन, बेस्ट डोनेशन’च्या घोषणा देत रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी मृत्युनंतर अवयवदान करण्याचा निर्णय घेण्याचे  आवाहन जनतेला केले.

          समारोपप्रसंगी  नामको महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय गणेशवाडी, सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे अवयवदानाचे महत्व मांडले. याप्रसंगी बोलताना श्री.बगाटे म्हणाले, आपल्या संस्कृतीने ‘मरावे परि किर्ती रुपे उरावे’ हा संदेश दिला आहे. तसेच दानाला सर्वश्रेष्ठ मानण्यात आले आहे. मृत्युनंतरही आपली आठवण कायम ठेवण्याची संधी अवयवदानातून प्राप्त होते. ही समाजसेवेची आणि मानवतेची सेवा करण्याची संधी असल्याने नागरिकांनी मृत्युनंतर अवयवदान करण्याचा निर्णय घेऊन त्याची माहिती आताच कुटुंबियांना द्यावी, असे त्यांनी सांगितले.

          आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत 15 महाविद्यालये, इतर 24 महाविद्यालये, सेवाभावी संस्था, आयएमए आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांनी  या रॅलीत सहभाग घेतला.
अवयवदात्यांच्या कुटुंबियांचा सत्कार
समारोपप्रसंगी ब्रेनडेड झाल्यानंतर अवयवादन करणाऱ्या दात्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. अवयवदान क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉ.भाऊसाहेब  मोरे आणि डॉ.संजय रकीबे यांचादेखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 युवराज आणि सविता भारंबे यांनी आपल्या 14 वर्षाच्या मुलाच्या मृत्युनंतर त्याचे अवयवदान केले होते. आपल्या मुलाच्या निधनाचे दु:ख आहेच मात्र त्याचबरोबर एका व्यक्तीला नवे जीवन मिळाल्याचे समाधानही आहे. अवयवदान हा कुटुंबाचा निर्णय असतो आणि त्यामुळे इतर अनेकांना नवे जीवन मिळू शकते, अशी प्रतिक्रीया श्री.भारंबे यांनी व्यक्त केली.

फार्मसी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या जयंत पटेल याने वडिलांच्या अपघाती मृत्युनंतर त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबियांचा विरोध असतानाही जयंतने माघार घेतली नाही आणि निश्चयाने डॉक्टरांना अवयवदानाचा निर्णय सांगितला. वडिलांना जीवंत ठेवू शकत नव्हतो, मात्र माझ्याकडे इतरांना नवे जीवन देण्याची संधी होती. अवयवदानामुळे इतर कुटुंबाच्या जीवनात आनंद निर्माण करता येतो. नव्या पिढीनेच या महान कार्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.

शहापूर येथील सुभाष भानुशाली नाशिक येथे आले असताना त्यांचा मृत्यु झाला. त्यांचे सुपुत्र ज्ञानेश्वर भानुशाली यांनी  वडिलांच्या इच्छेनुसार त्यांचे अवयवदान केले. अवयवदानामुळे इतर माणसे आनंदात जगू शकतील, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करताना आपणही अवयवदान करणार असल्याचे सांगितले.
अवयवदानासाठी झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरचे डॉ. रकीबे यांचे सहकार्य लाभल्याचेही या तिघांनी सांगितले.
अवयवदान अभियान 1 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणारा असून या कालावधीत अवयवदानासाठी नोंदणी करण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट रोजी पथनाट्य, विविध स्पर्धा, कार्यशाळाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.
000000000

Monday 29 August 2016

सायबर क्राईम लॅबचे यश
पंधरा दिवसात दहा गुन्ह्यांचा यशस्वी तपास

नाशिक दि.29- नव्याने स्थापित करण्यात आलेल्या सायबर क्राईम लॅबमुळे शहर पोलीसांनी सायबर गुन्हे प्रकारात पंधरा दिवसात दहा गुन्ह्यांचा यशस्वी तपास करण्यात  यश मिळविले आहे.
स्वातंत्रदिनी राज्यात एकाच वेळी 42 सायबर लॅबचे उद्घाटन करण्यात आले होते. जिल्ह्यात देखील आडगाव येथील पोलीस मुख्यालयात तसेच पोलीस आयुक्त कार्यालयात लॅबचा शुभारंभ करण्यात आला होता. शहर पोलीसांनी या लॅबच्या माध्यमातून मोबाईल फोन गहाळ होणे, मीडिया मार्फत आक्षेपहार्य संदेश पसरविणे अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा शोध यशस्वीपणे घेतला आहे.
या लॅबमुळे तांत्रिक गुन्ह्यांचा शोध लावण्यासोबतच या गुन्ह्यांवर प्रतिबंध करण्याचे ध्येय गृहविभागाने ठेवले आहे.  ही लॅब अद्ययावत सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि तंत्रज्ञांनी परिपूर्ण अशी आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह संदेश पसरविणे त्याचप्रमाणे अश्लील छायाचित्रे, चलतचित्रे पसरविणे आदी प्रकारांना पायबंद घालण्याबरोबरच हॅकिंगच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक गुन्ह्यांच्या तपासासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.
          

          सध्या या लॅबमध्ये तपासासोबतच जिल्ह्यातील इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना सायबर गुन्ह्यांचा तपास करण्याबाबतचे प्रशिक्षण दिले जात आहे. नागरिकांनी सोशल मीडिया वापरताना काळजी घ्यावी. नागरिकांना लॉटरी किंवा बक्षिसे लागल्याबाबतच्या आमिषांना बळी पडू नये. स्वतःची वैयक्तिक माहिती तसेच बँकेने पाठवलेला पासवर्ड मेसेज फोनवरून अनोळखी व्यक्तीस देऊ नये. अँडरॉईड फोनवर प्ले स्टोर मधून अॅप्लिकेशन डाऊनलोड करतेवेळी त्याच्या अटी आणि शर्ती वाचून मगच डाऊनलोड करावे अन्यथा आपली सर्व माहिती हॅक होण्याची शक्यता असते. काही तक्रारी असल्यास ०२५३-२३०५२२६ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी केले आहे.

·        जर मोबाईल फोन गहाळ झाला असेल तर तत्काळ त्यातील सीम कार्ड बंद करावे.
·        ज्या हद्दीत फोन गहाळ होतो त्या हद्दीतील पोलीस स्टेशनला रीतसर अर्ज करावा. अर्ज करतेवेळी फोन बिलची  झेरॉक्स जोडावी.
·        IMEI नंबर अर्जात नमूद असणे आवश्यक आहे.
जनजागृतीसाठी ‘नाशिक सायबर क्लब’
सोशल मिडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह संदेश पसरविणे त्याचप्रमाणे अश्लील छायाचित्रे, चलतचित्रे पसरविणे आदी प्रकार टाळण्यासाठी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नाशिक सायबर क्लब’ स्थापन करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शहर व परिसरातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना एकत्र आणून किचकट सायबर गुन्हे उघडकीस  आणण्यासाठी त्यांची मदत घेतली जाणार आहे.
तंत्रज्ञानाच्या मदतीने घडणारे गुन्हे, त्यापासून संरक्षणासाठी घ्यावयाची दक्षता, गुन्हे घडल्यावर करावयाची कार्यवाही आदींबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन या माध्यामातून केले जाणार आहे. शाळा-महाविद्यालयातदेखील सायबर तज्ज्ञ आणि सायबर लॅब अधिकारी याच्या सहकार्याने अशा प्रकारची जागृती केले जाणार असल्याही माहिती, श्री.पवार यांनी दिली.  नागरिकांना नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या नाशिक सायबर क्लब या फेसबुक पेजचा देखील माहितीच्या आदान-प्रदानासाठी उपयोग करता येणार आहे.   
000000000

महा अवयवदान जनजागृती अभियान

सध्या नाविन्यपुर्ण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी अवयव प्रत्यारोपणाद्वारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहेत. अवयवदानाला चालना मिळावी याकरिता 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2016 या कालावधीत राज्यस्तरावर ‘महा अवयवदान अभियान’ राबविण्यात येणार आहे. 

अवयवदानाअंतर्गत ‘लाईव्ह ऑर्गन डोनेशन’द्वारे किडनी व लिव्हर प्रत्यारोपण करण्यात येते. तसेच कॅडेव्हर, मस्तिष्क स्तंभ मृत पश्चात किडनी, यकृत, फुफ्फुस, हृदय, त्वचा इत्यादी अवयवदान करण्यात येतात. सद्यस्थितीत राज्यभरात सुमारे 12 हजार पेक्षा अधिक रुग्ण अवयव मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून जनतेत या विषयाबाबत जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागासोबतच सार्वजनिक आरोग्य विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महसूल विभाग, गृह विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचे सहकार्य घेऊन विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

अभियानांतर्गत 15 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्यात येतील. इच्छुकांना अवयवदान करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. 30 ऑगस्ट रोजी तालुकास्तरावर महारॅलीचे आयोजन करण्यात येईल. 1 सप्टेंबर रोजी अवयवदान अभियान नोंदणी आणि अवयवदात्यांचा सत्कार करण्यात येईल.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध विभागांमार्फत अवयवदान जागृती अभियान राबविण्यासाठी समन्वयाचे काम तेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता करतील. जेथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसेल तेथे जिल्हा शल्य चिकित्सक समन्वयाचे काम करतील.
 

अभियानाचे नियोजन राज्यभरातून व्यापक स्वरूपात विविध विभागाच्या समन्वयाने यशस्वीरित्या होण्यासाठी विविधस्तरावर समित्या गठीत करण्यात येणार आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनादेखील या जनजागृती अभियानात सहभागी करून घेण्यात येणार आहे.
संचालक, आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियम 1994 अन्वये समुचित प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. अवयव जागृती अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री महोदयांच्या संदेशाने होईल. त्याच वेळी जिल्हा स्तरावर अभियानाचा शुभारंभ होणार आहे. महा अवयवदान अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तीन जिल्ह्यांची निवड राज्यस्तरीय अवयवदान अभियान समितीमार्फत करण्यात येऊन त्यांचा यशोचित गौरव प्रजासत्ताक दिनी करण्यात येणार आहे.

माणसाचे जीवन जरी मर्यादीत असले तरी अवयवदानाच्या माध्यमातून आपल्या स्मृती कायम ठेवता येतात. एखाद्याला नवे जीवन मिळू शकते. त्यामुळेच अवयवदानाचे महत्त्व आहे. ते जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठीच ही मोहिम आहे.

-विनोद पाटील
जिल्हा माहिती कार्यालय, 

नाशिक.

Sunday 28 August 2016

अवयवदाते पुढे यावेत याकरिता महा अवयवदान अभियान- गिरीष महाजन



राज्यात येत्या 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत महा अवयवदान अभियान हाती घेण्यात आले आहे. याद्वारे मोठ्या प्रमाणात अवयवदाते पुढे यावेत आणि सर्वसामान्यांमधून अवयवदानास चालना मिळावी याकरिता प्रयत्न आणि जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्याशी साधलेला संवाद....

अवयवदान जागृती महाअभियान नेमके काय आहे? या मागची पार्श्वभूमी काय?
मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 साली अंमलात आल्यापासून मागील 22 वर्षात राज्यभरात 11,365 किडनीच्या 470 लिवरच्या तर 20 हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रीया झाल्या असून डोळ्यांच्या 480 व फुप्फुसाच्या फक्त तीन शस्त्रक्रिया झाल्या आहेत.. प्रत्यक्षात देशभरात पाच लाखांहून अधिक किडनी, 50 हजार लिव्हर तर 2000 पेक्षा अधिक रुग्ण गंभीर हृदय विकारांनी त्रस्त आहेत, जे सर्व अवयवदात्यांच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना अवयवदाता वेळेवर उपलब्ध झाल्यास पुनर्जीवन मिळू शकते अन्यथा मृत्यू देखील होऊ शकतो. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मनकी बात या कार्यक्रमाद्वारे अवयवदानाचे महत्व लक्षात घेऊन अवयवदानाचे कार्य हाती घेण्याबाबत नमूद केले. त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात अवयवदाते पुढे यावेत व सर्वसामान्यांमधून अवयवदानास चालना मिळावी या करिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने अवयवदान अभियान हाती घेतले आहे.

या अभियानाचे स्वरुप कसे असणार आहे ?
दि. 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर, 2016 या कालावधीत हे अभियान राज्यभरात राबविण्यात येईल. या अभियानाचे उद्घाटन प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात 30 ऑगस्ट रोजी सकाळी मुख्य रस्त्यावर 07.30 वाजेपासून जागृती रॅली द्वारे संबंधित पालकमंत्री/ जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत केले जाईल. याच दिवशी याच वेळी मुख्यमंत्री व राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीत मरीन ड्राईव्ह मुंबई येथे जागृती रॅली द्वारे उद्घाटन करण्यात येणार आहे. दि. 31 ऑगस्ट रोजी अवयवदान जागृतीबाबत चर्चासत्रे/ व्याख्याने/ प्रदर्शने, विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल आणि दि. 1 सप्टेंबर रोजी अवयवदान नोंदणी शिबिरे घेऊन त्याठिकाणी अवयवदान केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियाचा सन्मान करण्यात येईल.

या अभियानात कोणकोण सहभागी आहेत ?
 
मुख्यत्वे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसोबत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा/ प्राथमिक आरोग्य केंद्र, खाजगी वैद्यकीय महाविद्यालये/ रुग्णालये, विविध विद्यापीठातील महाविद्यालये/ रुग्णालये विविध विद्यापीठातील महाविद्यालये, वैद्यकीय संस्था, सामाजिक संस्था यांसोबत विविध शासकीय अधिकारी/ कर्मचारी यात सहभागी होत आहेत. तसेच विभागीय प्रत्यारोपण समित्या या देखील मोठ्या प्रमाणात यात सहभागी आहेत. विविध धर्माचे अध्यात्मिक गुरुदेखील पाठींबा देत आहेत.

अभियानादरम्यान इच्छित अवयवदात्यांच्या नोंदणीसाठी काही विशेष योजना आहेत का ?
 
होय, अवयवदात्यांच्या नोंदणीसाठी प्रत्येक जिल्हा व तालुक्यांच्या ठिकाणी अभियानाची निमंत्रणे तसेच आवश्यक माहितीसह नोंदणीचे फॉर्मस घरोघरी वाटून लोकांना अवयवदानाबाबत नोंदणीसाठी आग्रह करण्यात येईल. तसेच नुकतेच वैद्यकीय शिक्षणविभागाच्या संकेतस्थळावर टाटा ट्रस्ट्स च्या सहकार्यातून ऑनलाईन नोंदणीकरिता लिंक उपलब्ध करण्यात आली आहे. त्याकरिता आपण www.dmer.org या वेबसाईटवर जाऊन अवयव दान नोंदणी करु शकतात.
 

आपल्या बोधचिन्हामध्ये ‘त्येन तक्तेन भुंजिया’ लिहलेय याचा नेमका अर्थ काय ?
ही संस्कृत ओळ आहे याचा अर्थ ‘त्यागातच आनंद आहे’ असा आहे. पंतप्रधानांनी अवयवदानाबाबत या सुंदर ओळींचा उल्लेख केला आहे.

आपण कोणकोणत्या अवयवांचे दान करु शकतो ?
जीवंत व्यक्ती एक मूत्रपिंड (किडनी) किंवा यकृताचा (लिवर) काही भाग दान करु शकतो. तर ब्रेन डेड व्यक्ती मूत्रपींड, यकृत, फुप्फुस, स्वादूपिंड, हृदय, त्वचा, डोळे, आतडी दान करु शकतो. त्यामुळे 1 व्यक्ती 8 ते 9 लोकांना नवे जीवन या माध्यमांतून देऊ शकते.

अवयवदान कोणालाही करु शकतो काय ?
जीवंतपणी दान करावयाचे असल्यास केवळ जवळचे नातेवाईक म्हणजे आई, वडील, बहीण, भाऊ, आजी, आजोबा, मुलगा, मुलगी, पती, पत्नी यांच्यातच होऊ शकते. या व्यतिरिक्त व्यक्तीला जीवंतपणी अवयवदान करावयाचे झाल्यास शासनाने नेमलेल्या समित्यांना परवानगी घ्यावी लागते. परंतु ब्रेन डेड अवस्थेत अवयवदान करावयाचे झाल्यास ते अवयवदान करण्याचा अधिकार हा विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीकडे असतो. समितीमार्फत उपलब्ध यादीतून रुग्णांची निकड, प्रतीक्षा कालावधी व इतर आवश्यक बाबी पडताळून अवयवदान करता येते. 

मस्तिष्क स्तंभ, मृत्यू व कोमा यात फरक काय ?
 
कोमामधील व्यक्ती शुद्धीवर येण्याची शक्यता असते. कारण त्या व्यक्तीच्या मेंदुचा मृत्यू झालेला नसतो. ब्रेनडेड व्यक्ती म्हणजे ज्याच्या मेंदूचा मृत्यू झाला आहे. ती व्यक्ती शुद्धीवर येण्याची सुतराम शक्यता नसते.

किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला वयाची मर्यादा आहे काय ?
आपल्याला इतर काही आजार नसेल व शारीरिकदृष्ट्या सक्षम असाल तर कोणत्याही वयात किडनी प्रत्यारोपण करता येते.

कोणत्या कारणांमुळे किडनी प्रत्यारोपण करता येणार नाही ?
कर्करोग असल्यास, मद्य अथवा ड्रग्जच्या आहारी गेलेली व्यक्ती, असाध्य मानसिक विकार असे आजार असल्यास डॉक्टर सर्व बाबींची शहानिशा करुन आपल्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकतात. 

प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये मृत्यू होऊ शकतो काय ?
शक्यता जवळ जवळ नाहीच. इतर मोठ्या शस्त्रक्रियेप्रमाणे ह्या शस्त्रक्रियेतही एक टक्क्यापेक्षा कमी लोक दगावू शकतात. परंतु ऑपरेशन न केल्यानेही काही धोका टळत नाही

डायलिसीस पेक्षा किडनी प्रत्यारोपण जास्त चांगले आहे काय ?
निश्चितच, कारण डायलिसीस 24 तास ठेवता येत नाही. त्यामुळे रक्तातली अशुद्धता केवळ त्याच वेळात काढता येते. परंतु किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाले असल्यास आपले रक्त शुद्ध करण्याची प्रक्रिया 24 तास सुरु राहते.

एकच किडनी शिल्लक राहिल्यास काही त्रास होऊ शकतो काय ?
सर्व साधारणपणे नाही. एक किडनी तुमचे शारीरिक कार्य योग्यरित्या सांभाळण्यास सक्षम आहे. 

यकृताचा काही भाग जीवंतपणी देणाऱ्या दात्याला काही उपाय होऊ शकतो काय ?
शस्त्रक्रिया ही मोठी शस्त्रक्रिया असल्यामुळे इतर आजारांमध्ये जो धोका असतो तोच धोका एक टक्क्यापेक्षा कमी या शस्त्रक्रियेत असतो. परंतु एकदा शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर कोणताही धोका नसतो.

काही प्रसिद्ध व्यक्तिची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली आहे ?
ॲपल कंपनीचे सीइओ स्टीव्हजॉब्ज यांचे यकृताचे प्रत्यारोपण झाले आहे. अमेरिकन ॲक्टर पटीनकिन यांना डोळ्यांच्या बुब्‍बुळाचे प्रत्यारोपण झाले आहे. बास्केटबॉल स्टार अलोन्झोमोर्निंग यांचे किडनीचे प्रत्यारोपण झाल्यानंतर त्यांनी 2006 मध्ये बास्केटबॉल चॅम्पियनशीप जिंकली. साऊथइंडियन हिरो राजकुमार यांनीही अवयवदान केले आहे. 

कोणत्या रुग्णालयात अवयव काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात येते ?
 
अवयव काढण्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयाला शासनाकडून रितसर परवाना घ्यावा लागतो. ज्या रुग्णालयाला हा परवाना मिळालेला आहे तेच रुग्णालय अवयवदानासाठी अवयव काढू शकतात. 

अवयवदान करणाऱ्यांसाठी शासनाकडून काही फायदे मिळतात का ?
नाही. अवयवदान हे एक अत्यूच्च दान आहे. यामध्ये काही मोबदला, पैसे मिळण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. परंतु शस्त्रक्रिया व त्यासाठी लागणारा खर्च मात्र दात्याला करावा लागत नाही. यासोबतच अवयवदान करणाऱ्या व्यक्तींचा मेडिक्लेम किंवा इन्शुरन्‍सच्या माध्यमातून अथवा नव्या महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत लाभ मिळवून देण्याबाबत शासन विचार करीत आहे.

(महान्यूजवरून)

Saturday 27 August 2016


नाशिकला जगाच्या पर्यटन नकाशावार आणण्यासाठी प्रयत्न करणार
                           -जयकुमार रावल
          नाशिक दि 27 :- जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करून जिल्ह्याला जगाच्या पर्यटन नकाशावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पर्यटन आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ.राहुल आहेर, अनिल कदम, योगेश घोलप, दिपीका चव्हाण, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, सा.बां. विभागाचे अधीक्षक अभियंता रणजीत हांडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे,  अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, एमटीडीसीच्या प्रादेशिक व्यवस्थापक प्रज्ञा बढे, कार्यकारी अभियंता हेमंत जगताप आदी उपस्थित होते.
श्री.रावल म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2017 हे वर्ष ‘व्हिजीट महाराष्ट्र’ वर्ष म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे. लोणावळ्याला पर्याय म्हणून इगतपुरी परिसराचा पर्यटनाच्यादृष्टीने नियोजनबद्ध विकास करण्यात यावा. विविध विभागांनी परस्पर समन्वयाने पर्यटन विकासासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. विभागीय स्तरावर तीन महिन्यातून एकदा पर्यटनाशी संबंधीत विविध घटकांची एकत्रित बैठक घेऊन पर्यटन विकासाला चालना देण्याची सुचना त्यांनी केली.

पर्यटन विकासासाठी विशिष्ट प्राधिकरणाबाबत विचार करण्याची गरज असल्याचे नमूद करून श्री.रावल म्हणाले,  उद्योगात गुंतवणूक केल्यानंतर निर्माण होणाऱ्या रोजगारापेक्षा पर्यटन क्षेत्रात तेवढ्याच गुंतवणूकीत चारपट रोजगार निर्माण होतात. स्थानिक नागरिकांना याचा विशेष  लाभ होतो. त्यामुळेच शासनाने पर्यटन क्षेत्राच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले आहे. पर्यटन विकासासाठी स्वतंत्र संचालनालय स्थापन करण्यात येणार असून त्यात नाशिकसाठी स्वतंत्र विभाग असेल, असे त्यांनी सांगितले.
 गोवर्धन येथे विकसीत करण्यात येणाऱ्या कलाग्रामला पारंपरिक बाजाराचे स्वरुप देण्यात यावे. लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने निवास-न्याहरी योजनेचा जिल्ह्यात अधिकाधीक प्रसार करण्यात यावा. रिक्शा टॅक्सी चालकांना पर्यटनाच्यादृष्टीने प्रशिक्षण देण्यात यावे, अशा सुचना त्यांनी केल्या. गंगा आरतीच्या पार्श्वभूमीवर गोदावरी आरतीसाठी 20 लाख रुपये देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. मांगी-तुंगी तीर्थक्षेत्र औरंगाबाद सर्कीटला जोडून तेथील पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.डवले यांनी पर्यटन संस्था, पर्यटन क्षेत्राशी निगडीत व्यक्ती, शासनाचे विविध विभाग, टूर ऑपरेटर्स आदींना एका व्यासपीठावर आणून पर्यटन विकासाबाबत एमटीडीसीने चर्चा घडवून आणावी, अशी सुचना केली. अंतर्गत शिर्डी, भंडारदरा, शनी शिंगणापूर, नांदूर-मधमेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि नाशिकचा समावेश असणारे विभागीय पर्यटन सर्कीट विकसीत करून पर्यटकांना अधिक संख्येने आकर्षित करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत लोकप्रतिनिधींनी हतगड, सप्तश्रृंगीगड, चांदवड येथील रंगमहाल, मांगी-तुंगी, सोमेश्वर, टाकळी, नांदूर-मधमेश्वर आदी विविध पर्यटनस्थळांच्या विकासाबाबत चर्चा केली. श्रीमती बढे यांनी सादरीकरणाद्वारे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या उपक्रमांची माहिती दिली.
पर्यटनमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींना पर्यटनस्थळांची माहिती देणाऱ्या पुस्तिकांचा संच भेट दिला. तत्पूर्वी त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंळाच्या कार्यालयाला भेट देऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

000000000

Tuesday 9 August 2016


'आदिवासी जनहिताय'
नाशिकच्या ग्रामीण आणि विशेषत: आदिवासी बहुल भागात फिरल्यानंतर या भागातला विकास चटकन नजरेत भरणारा आहे. नागरिकांच्या जीवनमानात पडणारा फरकही तेवढाच प्रकर्षाने इथे जाणवतो. मधूनच एखाद्या घरासमोर दिसणारी चारचाकी, डिश अँटेना, इंग्रजीतून विश्वासाने बोलणारे विद्यार्थी या बदलाची जाणीव करून देतात.


आदिवासी दिनाच्या निमित्ताने नाशिक, त्र्यंबकेश्वर  आणि पेठ तालुक्यातील आदिवासी बहुल भागाचा दौरा झाला. या दौऱ्याच्या माध्यमातून या सर्व समारात्मक बदलाची नोंद घेता आली. गुणात्मक विकास घडविण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. एकलव्य विद्यालय किंवा आदिवासी आश्रमशाळांच्या माध्यमातून हे ‘वाघिणीचे दूध’ पाड्यावर राहणाऱ्या मुलांनाही मिळतंय.


आश्रमशाळांनी कात टाकल्याची साक्ष बोरवट आणि इनामबारी आश्रामशाळांच्या इमारती देतात. इनामबारीमध्ये आश्रमशाळेसाठी शहराच्या तोडीचे बहुउद्देशीय सभागृह उभारले जात आहे. विद्यार्थ्यांना गावापासून दूर असलेल्या शाळेत शिक्षण घेता यावे यासाठी उभारलेल्या वसतीगृहातही चांगल्या सुविधा आहेत. एकलव्य शाळेतील विज्ञान कक्ष पाहिल्यावर इथले विद्यार्थी उच्च शिक्षणापर्यंत का पोहोचतात याची प्रचिती येते.


ठक्कर बाप्पा योजनेच्या माध्यमातून वाडी-तांड्यावरील रस्ते सिमेंटचे झाले. काही ठिकाणी पाण्याची टाकी, सभामंडप, सभागृह अशा सुविधा उभारण्यात आल्या आहेत. दुर्गम भागातल्या हनुमाननगरमधील अंगणवाडीची इमारतही सुंदर आणि सुविधांनी युक्त अशी आहे. गावात सोलर दिवे लावलेले दिसतात. ‘अधी लई गारा व्हायचा, हिथं काही बी नव्हतं, आत्ता अंगणवाडी, ग्रामपंचायत, रस्ते समदं झालं. बचतगटानं रेशन गावात आलया’ हनुमाननगरच्या  गोदाबाई खोटरे यांची ही बोलकी प्रतिक्रीया….


…..सेंट्रल किचन असो वा अमृत आहार विविध योजनांच्या माध्यमातून डोंगर-दऱ्यात वसलेल्या आदिवासी बांधवांपर्यंत विकासगंगा पोहोचविण्याचे प्रयत्न आहेत. आदिवासी बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठीदेखील वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येत आहे. कोपर्ली गावात जमिनीचे सपाटीकरण करून अकरा शेतकऱ्यांना मजगी  तयार करून देण्यात आली. त्यामुळे जेथे केवळ चारा किंवा काही प्रमाणात नागली व्हायची त्याच ठिकाणी भात, भुईमुग, वरी, नागली आदीच पेरणी झाल्याचे पाहिल्यावर परिवर्तन शब्दाचा अर्थ लक्षात येतो.

          विशेष म्हणजे या भागात अनुकूल बदल व्हावेत ही भावना नागरिकात दिसून आली. ज्या कौतुकाने महिला गावाच्या विकासाबाबत बोलतात, समस्या मांडतात ते पाहता विकासाचा प्रवाह पुढे जात असल्याचे लक्षात येते. मुलांची शाळेतली शिस्त, वैज्ञानिक प्रतिकृतीबद्दील विश्वासाने बोलणे, मोठी स्वप्न पाहणे हे सर्व कौतुकास्पदच आहे…आणि त्यांना हवे असलेले वातावरण, सुविधा देण्याचा प्रयत्न शासनाचा आहे.

          पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात दाखल होण्यास अवघा एक महिनाही झाला नसताना प्रशिक्षणार्थी युवक प्रशिक्षणाचे विविध अंग सहज आत्मसात करतात. वनपट्टे  आणि विहिर मिळाल्याने नागलवाडीत नागलीची जागा  हळदीने घेतली आहे. बदल बरेच आहेत, आणखीनही व्हायचे आहेत. शासनाचे प्रयत्न त्याच दिशेने आहेत. डोंगरात वसलेल्या वाड्यांमधून फिरले की  हे प्रयत्न दृष्य स्वरुपात दिसतात, ‘आदिवासी जनहिताय’ हे ब्रीद घेऊन एक पाऊल पुढे पडलेले लक्षात येते.

Monday 8 August 2016


आणि हास्य फुलले
प्रशासन चांदवडच्या रेणुका लॉन्स परिसरात सर्वत्र महिलांचा वावर दिसत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी समस्या जाणून घेण्यासाठी येणार असल्याने चेहऱ्यावर आनंदही होता. निमित्त होते महिला सबलिकरण अभियानाचे….

 महसूल दिनानिमित्त   राज्य शासनाच्यावतीने हे अभियान राबविण्यात येत आहेत्याचाच एक भाग म्हणून  महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि  शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले होते. महाराजस्व अभियानमुळे महिलांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य या निमित्ताने पहायला मिळाले.


          विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी महिलांना स्वावलंबी आणि सक्षम होण्याबरोबर मुलींनाही शिक्षण देण्याचा संदेश दिला. आमदार डॉ.राहुल आहेर यांनी उपक्रमाचे कौतुक करताना बेटी बचोओ, बेटी पढाओअभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. तर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी महिलांच्या आर्थिक उन्नतीवर भर दिला.

कार्यक्रमात प्रशासन राबवित असलेल्या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली. यामुळे शासनाच्या अनेक योजना खऱ्या अर्थाने महिलांपर्यंत पोहोचल्या.  तालुक्यातील एक हजारहून अधिक महिला कार्यक्‌रमात सहभागी झाल्या होत्या.  महाविद्यालयीन विद्यार्थिनीची हिम्बोग्लोबिन, शुगर, रक्तदाब तपासणी  मोफत करण्यात आली. या तपासणीतही दीड हजार विद्यार्थिनी सहभागी झाल्या. 

 यावेळी आयोजित करण्यात आलेले प्रदर्शनही विशेष असेच होते. प्रदर्शनाला महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.  प्रदर्शनात 20 ते 25 स्टॉल लावलेले होते. प्रत्येक स्टॉलवर महिलांसाठी असलेल्या योजना त्यासंबंधी माहिती देण्यात आली. यात दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना,  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजन, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन स्वच्छ भारत अभियान, सुकन्या समृद्धी योजना, भारतीय स्टेट बँकेचे विशेष स्वर्णधारा अभियान, लक्ष्मीमुक्ति योजना, प्रतिसाद अॅप्स, डेंग्यु जनजागृती,  शिक्षण विभागामार्फत मुलींसाठी राबविल्या जाणार्‍या योजना, लेक वाचवा अभियान आदींना विशेष प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमात 3122 दाखले, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत 16 धनादेश, संजय गांधी निराधार योजने अंतर्गत 24 मंजूरी आदेश, 300 शिधापत्रिका, नैसर्गिक आपत्ती धनादेश, लक्षमी मुक्ती योजना अर्ज, कृषी विभाग येाजना अर्ज,  मागेल त्याला शेततळे योजनेचे मंजूरी आदेश आदींचे वाटप करण्यात आल्याने हा मेळावा खऱ्या अर्थाने महिलांसाठी उपयुक्त ठरला. शिवाय वाहन परवाना, पोलीस ॲप, बँकांच्या येाजना आदींची माहिती यावेळी देण्यात आली.

शासकीय योजनांच्या लाभासाठी कार्यक्रमस्थळीस अर्ज स्विकारण्याची सुविधा केल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले. शासकीय योजनांचे धनादेश वितरणही कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी महिलांना खऱ्या अर्थाने शासन दारीआल्याचे समाधान मिळाले. हे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते.
अशा प्रकारच्या अभियानातून महिलांना आपल्या हक्काची जाणीव होते आहे आणि त्यामुळे  विविध योजनांचा लाभही घेणे सहज शक्य होते, ही रंजना बच्छाव यांची प्रतिक्रीया बोलकी आहे. तर अलका शिंदे यांनी अभियानाच्या आयोजनाबाबत शासनाला धन्यवाद दिले. हेच अभियानाचे यश होते. हा कार्यक्रम जिल्ह्याला मार्गदर्शक असल्याचे मान्यवरांनी केलेले कौतुक उत्तम नियेाजनाची पावती देणारे होते.

(शब्दांकन- सुनिल पोळ, लेखक हे जिल्हा माहिती कार्यालय नाशिक येथे आंतरवासिता करीत आहेत.)

Sunday 7 August 2016

पूरबाधित भागात साथीच्या रोगाबाबत विशेष दक्षता  घ्या
                                                   -गिरीष महाजन

नाशिक दि.7- पूरबाधित भागात साथीचे रोग पसरू नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात यावी. अशा भागात औषध फवारणी करण्यात येऊन डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजावेत, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिले.
शासकीय विश्रामगृह येथे पूरस्थिती संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त एस.जगन्नाथन, विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अनिल चव्हाण, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बाळासाहेब वाकचौरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एस.पी.जगदाळे  आदी उपस्थित होते.

श्री.महाजन यांनी पूरपरिस्थितीनंतर करण्यात येणाऱ्या मदतकार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, पूरामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे त्वरीत पुर्ण करण्यात येऊन मदतीसाठीचा प्रस्ताव त्वरीत सादर करावा. पूरग्रस्त भागात टँकरने शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. पूरामुळे वाहून गेलेली जानोरी येथील पाईपलाईन त्वरीत दुरुस्त करण्यात यावी. रस्त्याच्या नुकसानाची पाहणी करून त्वरीत अहवाल तयार करावा. पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी लोकप्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील नाल्यांच्या ठिकाणी इमारती उभारण्यात आल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अवरुद्ध झाल्याचे सांगून शहरात अशा भागांचे सर्वेक्षण करून पाण्याचा निचरा होण्याबाबत आवश्यक उपाययोजना महापालिकेने त्वरीत कराव्यात, असे निर्देश श्री. महाजन यांनी दिले. पूरानंतर अनेक भागात साचलेला गाळ आणि कचरा स्वच्छ करण्याचे काम प्राधान्याने करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी चांदोरी व सायखेडा येथे 4 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती दिली. पूरग्रस्त भागात आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मलेरीयाबाबत दक्षता घेण्यात येत आहे. शेजारीत गावातल्या प्राथमिक वैद्यकीय केंद्रातील अधिकारी पूरग्रस्त भागात नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
शहरातील कचरा आणि गाळ स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे 24 जेसीबी आणि 33 ट्रॅक्टर्स, 7 स्क्रॅपर्स आणि 8 डंपर्सची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.
जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन यंत्राची सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी  अधिकाऱ्यांना निर्देश दिले. ब्रिटीशकालीन जुन्या पुलांची पाहणी करून त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. चांदोरी आणि सायखेडा यांना जोडणाऱ्या पूलाचे पुरामुळे नुकसान झाल्याने त्याचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात यावे. तसेच त्याशेजारी नवा पूल तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी  पालकमंत्री महाजन यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. खुल्या बाजारात शेतमाल विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने घेतला असून शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा, असेच शासनाचे धोरण आहे. या संदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.  

Saturday 6 August 2016


महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक-एकनाथ डवले
नाशिक दि.6:- महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या  सक्षम होणे आवश्यक  असून महसूल विभागातर्फे महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी महिला सक्षमीकरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी केले.
चांदवड येथे ‘महिला सक्षमीकरण सप्ताह’ निमित्त आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार डॉ.राहुल आहेर, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., सहायक जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी, अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, पंचायत समिती सभापती सुनिता जाधव,  उपविभागीय अधिकारी बी.आर.दराडे, नगरारध्यक्ष भूषण कासलीवाल, तहसीलदार माणिक आहेर, गटविकास अधिकारी भूषण बेडसे, पोलिस निरिक्षक आनंत मोहिते आदी उपस्थित होते.

श्री.डवले म्हणाले, आर्थिक प्रगतीशिवाय महिलांच्या समस्या  दूर होणार नाहीत. त्यामुळेच शासनाने महिलांना सक्षम करण्याची भूमीका स्विकारली आहे. महिला सक्षमीकरणासाठी प्रत्येक मुलीला शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यांच्यात आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे गरजेचे आहे. महिलांच्या आरोग्याचीदेखील विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत: गरोदर मातांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तिची काळजी घेणे महत्वाचे आहे. महिलांनी आपल्या आहारावर विशेष लक्ष द्यावे आणि अन्याय सहन न करता आपल्या मताशी ठाम रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार डॉ.आहेर यांनी प्रशासनातर्फे महिलांसाठी आयोजित मेळावा चांगला उपक्रम असल्याचे सांगितले. ते म्हणाले, महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष लक्ष दिले जाणे महत्वाचे आहे. ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होणेदेखील आवश्यक आहे. मेळाव्याच्या माध्यमातून महिलांच्या विकासाला चालना मिळेल, असेही ते म्हणाले. लोकसहभागातून चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार अभियान राबविले गेल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.  शासनाची प्रत्येक योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

श्री.राधाकृष्णन म्हणाले, महिलांचा सामाजिक कार्यातील सहभाग महत्वाचा असतो. त्यामुळे महिलांच्या समस्या दूर करणे अधिक महत्वाचे आहे. महिलांची आर्थिक उन्नती झाल्यास त्या अधिक सक्षम होऊ शकतील. याच उद्देशाने महाराजस्व अभियानांतर्गत तालुका, मंडळ आणि गावपातळीवर महाराजस्व अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.  महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी उपक्रम राबविणे गरजेचे आहे. तसेच स्त्री-पुरुष लोकसंख्येच्या प्रमाणातील फरक चिंताजनक असून हा फरक दूर करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या विकासासाठी जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे आदी योजना राबविण्यात येत असून त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

श्री.स्वामी यांनी पीसीपिएनडीटी कायदा आणि कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यासंदर्भात माहिती दिली. विद्यार्थींनींनी शालेय जीवनात व्यक्तिमत्व विकसीत करून प्रगती साधावी, असे त्यांनी सांगितले. यावर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महसूल अभियानाचे वेगळेपण त्यांनी मांडले.
श्री.लांडगे यांनी जिल्हा परिषदेमार्फत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली.

प्रास्ताविकात श्री.दराडे यांनी मेळाव्याच्या आयोजनाची माहिती दिली. मेळाव्यांतर्गत संजय गांधी निराधार योजनेचे धनादेश, जात पडताळण प्रमाणपत्र, क्रिमीलेयर प्रमाणपत्र आदींचे वाटप करण्यात आले. 3152 दाखले, 16 लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत 3 लाख 20 हजाराचे  अर्थसहाय्य, 450 पिवळ्या शिधापत्रिका आणि कृषि विभागातर्फे 9 मेज मॉइस्चर मीटर तसेच 15 शेततळ्यांच्या अनुदान मंजूरीच्या आदेशाचे वाटप करण्यात आले.

यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते करण्यात आले.
00000