Tuesday 27 February 2018

मराठी भाषा गौरव दिन


विविध विषयांवर मराठीतून साहित्यनिर्मीती होणे आवश्यक - झगडे



नाशिक दि. 27: मराठी भाषेच्या प्रगल्भतेसाठी  आणि संवर्धनासाठी विविध विषयांवरील साहित्यनिर्मीती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमीत्त विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अपर आयुक्त जोतिबा पाटील, उपायुक्त दिलीप स्वामी, सुखदेव बनकर, प्रविण पुरी, प्र.माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे, पी.बी. वाघमोडे, उन्मेष महाजन, तहसिलदार एस. डी. मोहिते आदी उपस्थित होते.
 श्री. झगडे म्हणाले, मराठी भाषेत लवचिकता आहे. काळानुसार मराठी भाषेच्या स्वरुपात आणि उपयोगत बदल झाले. भाषेत होणारे बदल स्वीकारणे आवश्यक आहे. दीर्घकाळापासून असलेली मराठी भाषेची वैभवशाली परंपरा लक्षात घेता तिच्या विकासाबाबत भिती बाळगण्याचे कारण नाही. इतर भाषिकांमध्ये मराठी साहित्य पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कुसुमाग्रजांच्या कविततेत जीवनाचे तत्वज्ञान सामावले आहे. त्यांच्या जन्मदिनी मराठी भाषेच्या विकासाबाबत चर्चा व्हावी यासाठी शासनातर्फे मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात येते, असेही श्री.झगडे यांनी सांगितले. समाजमाध्यमात मराठीचे प्रमाण वाढत असून मराठी साहित्याची श्रीमंती  लक्षात घेता  येत्या काळात मराठी भाषा महाजालावर अधिक विकसीत होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुसुमाग्रजांच्या कवितेत निसर्ग आणि जीवन यांचा सुंदर समन्वय-   किशोर पाठक

          कुसुमाग्रजांच्या कविततेत निसर्ग आणि जीवन यांचा सुंदर समन्वय आहे. त्यांनी प्रेमाची कविता लिहिताना जगण्याची शिकवण दिली आणि माणूसकीचा धागा सोडला नाही, असे प्रतिपादन कवी किशोर पाठक यांनी यावेळी केले.
 इंग्रजी भाषा जगाचे ज्ञान मिळवण्यासाठी असणारी खिडकी असली तरी जीवनाचे ज्ञान मिळवण्याचे मराठी भाषा हे मुख्य दार  आहे.  मराठी भाषा मातीशी आणि मनाशी जोडली गेलेली भाषा आहे. मराठी साहित्य ही  प्रकाशकिरणे आहेत. ती जीवनातून नष्ट झाली तर जीवन निरर्थक होईल. म्हणून मराठी भाषा बोलण्याचा आग्रह सर्वांनी धरावा, असे आवाहन त्यांनी केले.

कुसुमाग्रजांच्या सहवासाने चैतन्याचा अनुभव मिळायचा अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करतांना  त्यांनी कुसुमाग्रजांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. कुसुमाग्रजांनी आपल्या जीवनात कायम मराठी भाषा आणि माणसाला जपले,असेही ते म्हणाले.

          श्री. स्वामी म्हणाले, स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषेसोबत मराठी भाषा ही देखील अत्यंत महत्वाची आहे. मराठी भाषेचा व्यवहारात योग्य वापर होण्यासाठी  वाचनसंस्कृती विकसीत होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. संत साहित्यात आणि आधुनिक कवींनीदेखील मराठी भाषेची थोरवी गायली असल्याचे सांगून मराठी भाषेचे महत्व विविध स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी शासनातर्फे कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.मोघे यांनीदेखील आपले विचार व्यक्त केले.  तहसिलदार एस.डी. मोहिते यांनी आभर व्यक्त केले.
पुस्तकांचे प्रदर्शन कौतुकास्पद उपक्रम-   विभागीय आयुक्त

           मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नाशिक विभागीय माहिती कार्यालयामार्फत विभागीय आयुक्त कार्यालयात लोकराज्य आणि मराठी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले. प्रदर्शनात असलेले दुर्मिळ लोकराज्य अंक संग्राह्य आणि उपयुक्त असून प्रदर्शनचा उपक्रम कौतुकास्पद उपक्रम आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.

 यावेळी उपायुक्त दिलीप स्वामी, सुखदेव बनकर, प्रविण पुरी, माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे, पी.बी. वाघमोडे, उन्मेष महाजन, तहसिलदार श्रीमती एस. डी. मोहिते, सहायक संचालक अर्चना देशमुख यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000

Sunday 25 February 2018

जिल्हा कृषि महोत्सव


नाशिक जिल्हा कृषि महोत्सव 2018
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कृषि महोत्सवाचा समारोप

नाशिक, 25 : राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन         यांच्या उपस्थितीत पाच दिवस चाललेल्या नाशिक जिल्हा कृषि महोत्सवाचा समारोप करण्यात आला.
 कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तुकाराम जगताप, लक्ष्मण सावजी, आत्माचे प्रकल्प संचालक अशोक कांबळे, महेश हिरे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.महाजन म्हणाले, शेतकऱ्यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञाना आत्मसात करून त्याचा शेतात उपयोग करावा. जगभरात लागणारे नवे शोध अशा ठिकाणी पहायला मिळतात. म्हणून शासनाने प्रत्येक जिल्ह्यात असे प्रदर्शन भरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा अधिकाधीक लाभ शेतकऱ्यांनी घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी विपणन आणि व्यवस्थापन कौशल्य वापरल्यास त्यांना अधिक लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीवर भर दिल्यास शहरातील ग्राहकांना आकर्षित करता येईल आणि शेतमालाला अधिक भाव मिळेल. जिल्ह्यातला शेतकरी प्रयोगशील असून कौशल्याचा चांगला वापर करीत आहे. शेतकऱ्याला पाणी आणि वीज देऊन शाश्वत शेतीकडे वळविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे श्री.महाजन म्हणाले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते चांगली कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. त्यांच्या हस्ते जलयुक्त शिवार अभियान जिल्हास्तरीय समितीद्वारे तयार करण्यात आलेल्या जलदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. तत्पूर्वी श्री.महाजन यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेट देऊन माहिती घेतली.
शेतकरी आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद
पाच दिवस  चाललेल्या कृषि महोत्सवाला शेतकरी आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.शेवटच्या दिवशी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दुपारच्या सत्रात ‘डाळींब व द्राक्षे’ या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होतो. अहमदनगर जिल्ह्यातील बाबासाहेब गोरे आणि सांगली‍ जिल्ह्यातल प्रा.वसंत माळी यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली.
प्रदर्शनाला दीड लाखापेक्षा अधिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी भेट दिली. तसेच सुमारे दीड कोटी रुपयांच्या उत्पादनांची विक्री  पाच दिवसात झाली. 24 शेतकऱ्यांचे खरेदीदारांशी करार करण्यात आले आहेत, अशी माहिती श्री.कांबळे यांनी दिली.
                                                                   ----

कार्यक्षम आमदार पुरस्कार


‘सावाना’च्या पुरस्कारामुळे जनसेवेची प्रेरणा मिळेल-गिरीष महाजन

नाशिक 25 : सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे प्रदान करण्यात आलेल्या माजी आमदार  कै.माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या कार्यक्षम आमदार पुरस्कारामुळे जनसेवेची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
          औरंगाबादकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात श्री.महाजन यांचा पद्मश्री डॉ.अभय बंग यांच्या हस्ते कार्यक्षम आमदार पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्याध्यक्ष अभिजित बगदे, सचिव श्रीकांत बेणी, संपादक शैलेद्र तनपुरे, भानुदास शौचे आदी उपस्थित होते.

 श्री.महाजन म्हणाले, विधानसभा हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे. याठिकाणी वंचितांचे प्रश्न मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. गरिबांच्या मुलांना वैद्यकीय शिक्षण घेता यावे आणि गरजूंना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावा याकडे अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न आहे. सार्वजनिक जीवनात वावरतांना व्यक्तिगत प्रतिष्ठेपेक्षा जनतेचे प्रश्न सोडविण्यात जास्त समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक शहर संस्कृतिचे माहेरघर असल्याचा उल्लेख करून सार्वजनिक वाचनालय हा सांस्कृतिक चळवळ पुढे नेणारा शहराचा मानबिंदू आहे, अशा शब्दात त्यांनी वाचनालयाच्या कामगिरीचा गौरवपुर्ण उल्लेख केला. वाचनालयाचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पुरस्कार कोणी दिला आणि कोणाच्या हातून मिळाला याला महत्व असल्याचे नमूद करून  डॉ.बंग यांच्यासारख्या नि:स्वार्थ भावनेने काम करणाऱ्या  सेवाभावी व्यक्तीच्या हातून पुरस्कार मिळणे हा जीवनातील आनंदाचा क्षण असल्याचे श्री.महाजन म्हणाले.

पुरस्कारासाठी करण्यात आलेली श्री.महाजन यांची ओळख योग्‍य असल्याचा उल्लेख करीत डॉ. बंग म्हणाले, पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आणि त्या व्यक्तिचे चारित्र्य कसे आहे यावरून पुरस्काराची उंची ठरते. सावानातर्फे देण्यात येणारा कार्यक्षम आमदार पुरस्कार कर्तबगार व्यक्तिंना देण्यात आल्याने त्याला विशेष महत्व आहे. श्री.महाजन स्वस्थ जीवनशैलीचे आदर्श असल्याने    तसेच प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत असल्याने त्यांची पुरस्कारासाठी निवड योग्य असल्याचे , त्यांनी सांगितले.
आरोग्याचे विविध प्रश्न समोर येत असताना निरोगी जीवनशैलीचा वापर दैनंदिन जीवनात करणे आवश्यक आहे. रोगनिर्मितीच्या नव्या कारणांचे समाजातून उच्चाटन होणे आवश्यक असून त्यासाठी वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिंनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात श्री.बेणी यांनी पुरस्कार निवडीविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुलाखतीतून प्रकटले जीवनातील विविध पैलू

तत्पूर्वी श्री.महाजन यांची त्यांचे मित्र एम.एम.पाटील आणि संपादक श्रीमंत माने यांनी प्रकट मुलाखत घेतली. मुलाखतीत विचारल्या गेलेल्या प्रश्नांना पालकमंत्र्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
नाशिकला सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्याची वैभवशाली परंपरा असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री पद भुषवितांना विशेष समाधान मिळते असे त्यांनी सांगितले.
एका कौटुंबिक प्रश्नाला उत्तर देताना मुलगा-मुलगी असा भेद करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांच्या वागणुकीमुळे वृद्धाश्रमात राहणाऱ्या माता-पित्यांच्या व्यथा मांडतांना ते काहीसे भावूकही झाले. आपली संस्कृती भेदाची नसल्याने असा लिंगभेद चुकीचा असल्याचे श्री.महाजन म्हणाले.

जलसंपदा विभागाच्या कामाविषयी बोलताना शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांना वीज आणि पाणी देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राच्या सहाय्याने सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी अधिक निधी उपलब्ध झाल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचनाकडे वळवावे लागेल,असेही ते म्हणाले.
श्री.महाजन यांनी आपला स्वभाव, राजकीय कारकिर्द, कुटुंबातील संस्कार याविषयी विचारलेल्या प्रश्नांना तेवढ्याच दिलखुलासपणे उत्तरे दिली. कुंभमेळ्याचे जनतेच्या सहकार्याने झालेले यशस्वी आयोजन विशेष समाधन देणारे होते, असेही ते म्हणाले.
----

Saturday 24 February 2018

डांगी जनावर प्रर्दशन


 ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी देणार- दादाजी भुसे

          नाशिक दि.24- गावांच्या विकासाची जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायतींना स्व:ताची चांगली इमारत नसल्याने एक हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावात ग्रामपंचायतीची चांगली इमारत बांधण्यासाठी राज्यसरकार निधी उपलब्ध करून देईल,  असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
          इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे ग्रामपंचायत घोटी व जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित डांगी जनावरांच्या प्रर्दशनातील बक्षीस वितरण  प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, सरपंच कोंडाबाई बोटे, उपसरपंच आशा जाधव, उदय सांगळे, प्रा एस. डी. तायडे, निवृत्ती जाधव व सुर्यकांत भागडे आदी उपस्थित होते.

          श्री. भुसे म्हणाले, ग्रामीण भागालादेखील शहरांप्रमाणे सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. चांगल्या शाळा, नागरिकांना राहण्यासाठी घरे, ग्रामपंचायतींची कार्यालये आदीसाठी शासन विविध योजनांची अमंजबजावणी करीत आहे. चांगल्या शिक्षणाच्या सुविधा देण्याच्या प्रयत्नांमुळे जून 2018 पर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा डिजीटल करणे व शाळांना ई-लर्निंग सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

 गावठाणातील शासकीय जमिनींवर रहाणाऱ्या  रहिवाश्यांना स्वता:च्या घरात  रहाण्यासाठी संबंधीत जागा त्यांच्या नावावर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या लाभार्थ्यांना रहिवाशी जागेचा लाभ मिळावा यासाठी संबंधित यंत्रणेने प्रयत्न करावेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
          ते म्हणाले, इगतपुरी तालुका हा मुंबई, मराठवाडा, नाशिक यासह विविध तालुके व जिल्ह्यांना पाणी पुरविण्याचे काम करतो, पण येथील जनतेला उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यांनादेखील धरणांतील पाणी उपलब्ध व्हावे यासाठी उपाययोजना करण्यात येईल.
 डांगी जनावरांचे प्रदर्शन हा सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या काळातदेखील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. येथे लाखो रूपये किंमतीची डांगी जनावरे पहावयास मिळतात. यावरून शेतकऱ्यांचे या जनावरांवरचे प्रेम दिसून येते, असे श्री. भुसे म्हणाले.

          खासदार गोडसे यांनी प्रदर्शन व यांत्रिकी परंपरा 48 वर्षापासून सुरू असून ग्रामीण जनतेच्या प्रतिसादामुळे ग्राममहसूलात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने परिसरातील गावे व जिल्ह्यांना याचा चांगला फायदा होतो, असे सांगितले.
          22 ते 25 फेब्रुवारी 2018 या कालावधीत प्रदर्शनाचे आयोजन केले असून येथे शेती, औद्योगिक, औजारे, दुध आदी कारणांसाठी वापरात येणाऱ्या जनावरांचे प्रदर्शन विक्री केली जाते. तसेच ट्रॅक्टर, खते विविध कृषी उपयोगी साहित्याचे स्टॉल्स प्रदर्शनात असून यात्रेला नागरीकांचा मोठा प्रतिसाद आहे.

यावेळी विविध प्रकारात उत्तम असलेल्या जनावरांच्या मालकांच्या सत्कार यावेळी रोख पारिताषिके व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
पारितोषिके मिळालेली जनावरांचे प्रकार व त्यांच्या मालकांची नावे पुढील प्रमाणे आहे.
 डांगी वळू (सहा दात)  चॅम्पियन पुरस्कारचंद्रकांत बेंडकोळी, कोकणगाव ता. अकोले, जि. अहमदनगर. डांगी वळू (चार दात)- सदाशिव बेंडकोळी, अकोले जि. अहमदनगर.  डांगी वळू ( जुळलेले)- रोहित रमेश मोरे, आझादखिंड , इगतपुरी.
डांगी गायमालक नवनाथ्तुपे, डांगी दुभती गायमालक दादा पाटील बोरसे, खिलार वळू( दोन दात )- मालक चांगदेव चोपडे, खिलार वळू( चार दात ) – मालक गोरख थिटे याचबरोबर सदाशिव सदगिर, ज्ञानदेव कासार, भागवत वाबळे आदीं मालकांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
00000



कृषि प्रदर्शन

प्रदर्शनाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती

नाशिक दि. 23- कृषि महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येत आहे. आत्मा, कृषि, रेशिम उद्योग आणि मत्स्य व्यवसायच्या दालनाला अधिक प्रतिसाद मिळतो आहे. विशेष म्हणजे तरुण शेतकरी विविध योजनांविषयी माहिती घेताना दिसत आहेत.

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यसाय यांनी बागायती शेती करताना शेततळ्यात कटला, रोहू, सिप्रिंन्स माशांचे उत्पादन आणि माशांचा खत म्हणून कसा वापर करता येईल याविषयी माहिती प्रदर्शित केली आहे. याठिकाणी लहान ड्रममध्ये मासे सोडलेले असल्याने शेतकरी याकडे आकर्षित होत आहेत.

जिल्हा रेशीम कार्यालयाने रेशीम किटकांपासून शाश्वत शेतीची माहिती प्रदर्शित केली आहे. तुती बागेस किटकनाशक आणि बुरशीनाशकांचा उपयोग करावा लागत नाही. एकदा तुतीची लागवड केल्यानंतर 15 वर्ष लागवड करावी लागत नाही. अशी उपयुक्त माहिती देताना शाश्वत शेतीचे महत्व विविध प्रतिकृतींद्वारे प्रदर्शित करण्यात आले आहे.

कृषि विभागाने जलुयक्त शिवार अभियानासह विविध योजनांची माहिती प्रदर्शित केली आहे. तर आत्माच्या दालनाद्वारे सेंद्रीय शेती, प्रशिक्षण, क्षेत्रभेटी, परंपरागत कृषी विकास, गांडुळ खत निर्मिती, उत्पादकता वाढ आदींची माहिती देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना पतपुरवठ्याची माहिती विविध बँकांच्या दालनातून देण्यात येत आहे. सामाजिक वनीकरण विभाग, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, जिल्हा कृषि विभाग, महाराष्ट्र राज्य कृषि पणन महामंडळ, महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण आदी विविध दालनांद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे.
----

‘कांदा व भाजीपाला’ परिसंवादा


नाशिक जिल्हा कृषि महोत्सव 2018
जैविक खते व पिके ही काळाची गरज-डॉ.श्रीधर देसले

नाशिक, 24 : उत्पादनवाढीसाठी जैविक खते आणि पिके ही काळाची गरज असल्याचे मत धुळे येथील कृषि शास्त्रज्ञ डॉ.श्रीधर देसले यांनी व्यक्त केले.  
कृषि विभाग आणि कृषि व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने नाशिक कृषी महोत्सवात ‘कांदा व भाजीपाला’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.  यावेळी प्रकल्प संचालक अशोक कांबळे,  उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप देवरे, गोकुळ वाघ, गणेश वाकळे, तुषार आमले, संजय पारडे आदी उपस्थित हेते.  

डॉ. देसले म्हणाले, जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी मुख्य, दुय्यम आणि सुक्ष्म अन्नद्रव्याचा अभ्यास करून खतांचा वापर करावा. त्यानंतरच उत्पादक क्षेत्राचा विचार करायला हवा. जमिनीनुसार योग्य पीक निवडल्यास उत्पादनात यश मिळते. सध्या सुक्ष्म अन्नपदार्थ, गंधक, पालाश कमी झाल्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी झाली आहे. म्हणून माती परिक्षणानंतर खतांचा वापर करावा तसेच हवामानाच्या बदलानुसार करावयाच्या उपययोजनांचादेखील विचार शेतकऱ्यांनी करावा, अशी सुचना त्यांनी केली.
कांद्याचे पीक हंगामानुसार बदलणारे असल्याने शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. कांदा पिकाच्या आजूबाजूस मक्याची लागवड करावी. बुरशीमुळे बियाण्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गंधक, सुक्ष्म पदार्थ, पालाश यांची मात्रा योग्य प्रमाणात द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
श्री.वाळके, श्री.शेटे यांनीदेखील भाजीपाला उत्पादनाविषयी मार्गदर्शन केले.
-----

Friday 23 February 2018

कृषि प्रदर्शन

प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

नाशिक दि. 23- कृषि महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि विविध प्रकारच्या जोड व्यवसायाची माहिती देण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी प्रयोगशिल आहेत. त्यामुळे प्रदर्शनातील नवे तंत्रज्ञान जाणून घेण्याची जिज्ञासा त्यांच्यात दिसत आहे. विविध दालनांना भेट देताना संबंधितांना प्रश्न विचारून माहिती जाणून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे.

 प्रदर्शनातील ‘बायोनिक स्क्रिक्रो’ हे उपकरण तयार करुन हवामानात होणारे बदल, पर्जन्याची माहिती याची अचुक माहिती मोबाईलच्या माध्यमातुन देते. त्याचबरोबर ड्रोन तंत्रज्ञानदेखील शेतकऱ्यांसाठी विशेष आकर्षण आहे.  एक ड्रोन माती परीक्षण करुन जमिनीतील आर्द्रता, येणारे पीक, याबद्दल सखोल माहिती देते. शेतकऱ्यांना फवारणीसाठी लागणारा कालावधी दुसऱ्या प्रकारच्या ड्रोनमुळे कमी होते. हा ड्रोन दिड ते दोन एकर शेती दहा मिनिटात फवारणी करतो.
शेतातील विहीरीमधील विद्युत मोटारीसाठी असणारे ‘ॲग्रोमेशन मोबाईल ऑटो’ या उपकरणात जगातून कुठूनही मिस्ड कॉल, मेसेज आणि दुरध्वनीद्वारे नियंत्रण ठेवुन मोटार चालू- बंद करता येते. तसेच आपण मोबाईलवर तयार केलेल्या वेळापत्रकानुसारदेखील उपकरणाचा वापर करु शकतो.

एक्सपेंडेड क्ले ॲग्रीगेट नावाची माती प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. इतर मातीपेक्षा या मातीचे वजन 70 टक्के कमी असते. यामध्ये 12 प्रकारची जैविक तत्व असल्यामुळे पाण्याचा कमीत कमी वापर होत असतो. या मातीचा उपयोग बागकामासाठी  मोठ्या प्रमाणात केला जातो.
 किटक व पशु, पक्ष्यापासुन धोका लक्षात घेता केळी, टरबुज, टोमॅटो, पपई, द्राक्ष, डाळींब पिकांचे नुकसान टाळण्यासाठी ‘क्रॉप कव्हर’  प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. विविध प्रकारची किटकनाशके, वनस्पतीपासून तयार होणाऱ्या वस्तू, ट्रॅक्टर्स, अवजारे , रोपवाटिकांमधील नवे तंत्र आदी प्रदर्शनात पहायला मिळते. शेततळ्यातील मत्स्यव्यवसायाबाबत प्रदर्शनात स्वतंत्र दालनाद्वारे माहिती देण्यात येत आहे.

----

कृषि परिसंवाद

नाशिक जिल्हा कृषि महोत्सव 2018
कृषी व्यवसायात आत्मविश्वास गरजेचा- डॉ. रत्नाकर आहेर

नाशिक, 23 : कृषी व्यवसायात वाढ करुन अधिक उत्पन्न घेण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन आणि आत्मविश्वास गरजेचा आहे, असे प्रतिपादन जिल्हा दुग्ध विकास अधिकारी  डॉ. रत्नाकर आहेर यांनी केले.
कृषि विभाग आणि कृषि व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे आयोजित  नाशिक कृषी महोत्सवात ‘शेतकी उद्योगाचा ध्यास हाच शेतकऱ्यांचा विकास’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.  यावेळी प्रकल्प संचालक अशोक कांबळे, सह्याद्री उत्पादक कंपनीचे संचालक विलास शिंदे, दाभोळकर कृषि परिवाराचे समन्वयक वासुदेव साठे, देवनदी शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक अनिल शिंदे आदी उपस्थित होते.
डॉ. आहेर म्हणाले, शेती व्यवसायात नवीन बाजारपेठा निर्माण करण्याकडे आणि तेथे आपली उत्पादने पोहोचविण्याकडे लक्ष द्यायला हवे. सहकार्याच्या भावनेतून सामुहिकरित्या काम करणे गरजेचे आहे. शेतीला उद्योगाप्रमाणे समजून योग्य व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे यांनी ‘शेतकरी उत्पादक कंपनी’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले, शहरात, उद्योगात, सेवाक्षेत्रात बदल होत असताना शेती क्षेत्रात पाहिजे तसे बदल होतांना दिसत नाहीत. शेतकऱ्यांना आज जागतिक स्पर्धेत उतरावे लागते. या स्पर्धेत सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन आपल्या क्षमतेचा वापर केला पाहिजे.
देवनदी शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल शिंदे यांनी यावेळी  ‘शेतकरी उत्पादक कंपनी- विकास व व्यवस्थापन’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. प्रोड्युसर ॲक्ट सुधारणा कायद्यामुळे उत्पादक कंपनीत अनेक सुधारणा झाल्या. उत्पादन व्यवसायात मार्केटिंग पद्धतीची शेती केली तर आर्थिक विकासाला चालना मिळेल.
यावेळी उपस्थित इतर तज्ज्ञांनी शेतकरी उत्पादक,व्यवस्थापन ,कंपनी स्थापना, गट शेती, या विषयावर आपले मत व्यक्त केले.

---

Thursday 22 February 2018

खरेदीदार-विक्रेता संमेलन

नाशिक जिल्हा कृषि महोत्सव 2018
खरेदीदार-विक्रेता संमेलनास चांगला प्रतिसाद

नाशिक, 22 : जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी बचतगट आणि शेतकरी उत्पादक कंपनीतील शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य दर मिळावा तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नाशिक जिल्हा कृषि महोत्सवांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.
           संमेलनाच्या माध्यमातुन उत्पादक शेतकरी, निर्यातदार आणि खरेदीदार संस्थेचे प्रतिनिधी यांची एकाच ठिकाणी चर्चा घडवून आणण्यात आली. विविध उद्योगसमुह, निर्यातदार, परदेशी कंपन्या असे 25 खरेदीदार उप‍स्थित होते. त्यामध्ये बिग बाझार, गोंगळ प्रोसेसिंग कंपनी, युनिक ॲग्रीकल्चर, फिल्डफ्रेश ॲग्रीकल्चर, टेक्निकल झोन, स्केलर ट्रेडिंग कंपनी, स्टार ॲग्री बाझार, केपरी कॉर्न आदींचा यात सहभाग होता

          सत्राच्या सुरुवातीस विविध उत्पादनांबाबत असलेल्या अपेक्षा आणि उत्पादनाची गुणवत्ता यावर निर्यातदारांनी सखोल माहिती दिली. यांमध्ये शेतकऱ्यांनी फसवणुक टाळण्यासाठी निर्यातदारांची आर्थिक बाजू लक्षात घेणे, गतवर्षीच्या आयात निर्यातची आकडेवारी तपासुन माल देणे. आर्थिक व्यवसायात पारदर्शकता यावी म्हणुन करार पद्धतीचा अवलंब करणे आदी सुचना उपस्थित तज्ज्ञांनी  मांडल्या.  प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शंकांना उत्तरे देण्यात आली.

          औपचारीक सत्रानंतर द्राक्ष, कांदा, डाळिंब, टोमॅटो, मिरची, पॅकेजिंग विषयाशी संबंधित शेतकरी आणि खरेदीदारांची  समोरासमोर चर्चा ठेवण्यात आली होती. शेतकऱ्यांनी खरेदीदारांशी समक्ष चर्चा करून माहिती घेतली.
          सत्राचा समारोप करतांना आत्माचे प्रकल्प संचालक अशोक कांबळे यांनी शेतकऱ्यांनी व्यवस्थितरित्या खरेदीदाराची माहिती घेऊन मालाची विक्री कराताना कायदेशीर करार करावा, असे सांगितले. खरेदीदारांनी शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळावा यासाठी शेतकऱ्याना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. गेल्यावर्षी त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा भागातून एक हजार मे.टन आंब्याचे संकलन करण्यात आले होते, अशी माहिती  त्यांनी  दिली.

कृषि प्रदर्शनात सेंद्रीय उत्पादनांना मागणी

 महिला बचतगट आणि शेतकरी गटांनी अनेक कृषिपुरक वस्तूंची निर्मिती करुन जिल्हा कृषि महोत्सव प्रदर्शनातील विविध दालनात मांडल्या आहेत. या प्रदर्शनात सेंद्रीय कृषि उत्पादनांना चांगली मागणी आहे.
 प्रदर्शनात एकुण सहा भव्य दालने उभारलेली असून त्यामध्ये धान्य, सेंद्रिय शेती, खाद्य, औजारे व मशिनरी, गृहोपयोगी वस्तू, सिंचन साधने व तंत्रज्ञान, कृषि व संलग्न विभाग आणि इतर शासकीय विभागांचा समावेश आहे.

सेंद्रीय फळे, भाजीपाला, धान्य आदी उपत्पादनांना ग्राहकांची विशेष मागणी आहे. विशेषत: सेंद्रीय द्राक्षे आणि सुरगाणा तालुक्यातील स्ट्रॉबेरीला चांगली मागणी आहे. सोबत ॲपल बोर, पेरु, सोलर ड्रायरच्या सहाय्याने वाफवलेल्या तसेच सहा महिन्यात कधीही खावु शकणारे सोळा प्रकारच्या फळभाज्या, तेलात शिजवलेली अळिंबी, काकवी , सेंद्रिय गुळ, डाळ, मूग, शेंगा आदी उत्पादनांकडे ग्राहकांचा ओढा अधिक आहे.

खाद्य दालनात विविध बचतगटांनी स्टॉल मांडले त्यामध्ये वसुंधरा महिला बचत गटाने ठेवलेले चुलीवरचे मांडे, बाजरीचे भाकरी पिठले ठेचा हे ग्राहकांसाठी आकर्षण ठरले आहे.  तसेच पापड लोणचे, फ्रूट जॅम, आवळा कॅन्डी, कुल्फी आदी पदार्थांसोबत नागलीच्या भाकरी, ठेचा आदी पदार्थ खवय्यांसाठी विशेष आकर्षण आहे. प्रदर्शन शुक्रवारपासून सायंकाळी 8.30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.

---