पोलीस कर्मचाऱ्यांना चांगला निवारा देण्याचे प्रयत्न- डॉ. रणजीत पाटील
नाशिक, दि.15: जनतेच्या सुरक्षेसाठी चोवीस तास काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना कामाचे समाधान मिळण्यासाठी चांगला निवारा उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे
प्रयत्न आहेत, असे प्रतिपदान राज्याचे नगरविकास आणि गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजीत पाटील यांनी केले.
पोलीस मुख्यालय परिसरात आयोजित विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार देवयानी
फरांदे, महापौर रंजना भानसी, पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, उपआयुक्त माधुरी कांगणे, लक्ष्मीकांत पाटील, विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, मनपा स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, प्रा. सुहास फरांदे, लक्ष्मण सावजी, आदी उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे. पोलीसांची घरे तयार करण्यासाठी शासकीय लॅण्डबँकच्या माध्यमातून कमी दरात जागा उपलब्ध करुन देण्याबरोबर इमारतींना जास्त एसएफआय
देण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. पोलीस
कर्मचाऱ्यांना घरासाठी मुलभूत गरजांएवढे क्षेत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी
सांगितले.
डॉ.पाटील यांनी
नाशिक पोलीसांनी राबविलेल्या ‘नो हॉर्न डे’, आणि मुद्देमाल वापसी उपक्रमाचे कौतूक
केले. ते म्हणाले, सायबर गुन्हे आणि आर्थिक गुन्हे हे मोठ्या शहरातील प्रमुख आव्हान आहे. अधिक साक्षरतेचे प्रमाण असूनही शहरात आर्थिक गुन्हे
घडतात. मैत्रेयसारख्या प्रकरणात देशातील पहिले ‘इस्क्रो अकाऊंट’
उघडून समाजाला लाभ देण्याचा स्तुत्य प्रयत्न नाशिक पोलीसांनी केला आहे, असे
कौतुगोद्गार त्यांनी काढले.
पोलीसदल अधिक सक्षम करण्यासाठी मोबाईल फोरेन्सिक
वाहन आणि क्यूआरटी वाहन पोलीस दलाला देण्यात आले आहे. पोलीस दलाला सक्षम
करण्याच्या शासनाच्या प्रयत्नांमुळे गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढले आहे. गुन्ह्यांचे
प्रमाण कमी करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत असून युवकांना कौशल्य
विकासाचे प्रशिक्षण दिल्यास ते गुन्ह्यांकडे वळणार नाही, असे डॉ.पाटील म्हणाले. भाभानगर आणि गंगापूररोड
येथील पोलीस स्टेशनसाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
श्रीमती. फरांदे म्हणाल्या, ब्रिटीश कालीन पोलीस
वसाहतीत अनेक दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी पोलीस
गृहनिर्माणाला चालना देतांना पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनसाठी गतवर्षीच्या
अर्थसंकल्पात 500 कोटींची तरतूद केली. पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस वसाहतीच्या
पुर्ननिर्माणाबाबतचा आराखडा सादर करण्यात आला असून त्यासाठी पाठपुरावा सुरू
असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.सिंगल
यांनी पोलीस आणि जनतेचे संबंध चांगले असणे महत्वाचे असून त्यादिशने शहर पोलीस
प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. अन्यायग्रस्त नागरिकांना तातडीने न्याय मिळवून
देण्याचे प्रयत्न करण्याबरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांना सुविधा देण्याकडेही लक्ष
देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी महापौर
श्रीमती भानसी यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी-कर्मचारी, पोलीसांचे
कुटुंबिय उपस्थित होते.
पोलीस मुख्यालय
परिसरातील पोलीस चाळींची सुधारणा करण्यात येणार असून जुने कौल काढून पत्रे
बसविण्यात येणार आहेत. मलनि:स्सारण वाहिनीची दुरुस्तीदेखील करण्यात येणार आहे. या
परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे मजबूतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामावर
सुमारे 70 लक्ष रुपये खर्च होणार आहे. तसेच संरक्षक भिंतही बांधण्यात येणार आहे.
----
No comments:
Post a Comment