Friday 29 July 2016


लिंगटांगवाडी-कुंदेवाडीत लोकसहभागातून जलक्रांती

सिन्नर तालुक्यातील लिंगटांगवाडीतील पाणी समस्या ‘जलयुक्त’च्या माध्यमातून दूर होतानाच लगतचे कुंदेवाडी गाव जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट नसतानाही प्रशासन, समाजसेवी संस्था आणि स्थानिकांच्या प्रयत्नातून या गावात जलक्रांती झाल्याचे दृष्य पहायला मिळते आहे.

लिंगटांगवाडीत पाण्याची समस्या असल्याने गावाचा समावेश जलयुक्त शिवार योजनेत करण्यात आला. मात्र लगतच्या कुंदेवाडी गावाचा समावेश योजनेत नव्हता. गावात गतवर्षी प्रथमच टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. टंचाईची ही पाऊले गावातील ज्येष्ठ मंडळींनी ओळखली.  सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे संचालक नामकर्ड आवारे, ह.भ.प. एकनाथ महाराज गुळेश्वर, मधुकर नाठे, शिवाजी नाठे, राजाराम कुऱ्हाडे या मंडळींनी गावकऱ्यांना एकत्र करून जलसंधारणाचे महत्व समजावले.
आमदार राजाभाऊ वाजे आणि तहसीलदार मनोज खैरनार यांच्या प्रयत्नामुळे महामार्गाचे काम करीत असलेल्या चेतक एन्टरप्रायजेस संस्थेचे सहकार्य या दोन्ही गावातील कामासाठी मिळाले. प्रशासनाने ‘चेतक’च्या माध्यमातून डिझेल आणि जेसीबीची व्यवस्था केली. गाळ वाहण्यासाठी डंपरची व्यवस्थादेखील करण्यात आली.

लिंगटांगवाडीतील बंधाऱ्याजवळ साचलेला गाळ काढण्यात आला. नाल्याचे खोलीकरणही करण्यात आले. लिंगटांगवाडी आणि कुंदेवाडी मिळून पंधरा दिवस 2800 फूट लांबीच्या नाला 35 फूट रुंद आणि 28 फूट खोल करण्यात आला. 18.5 लाख क्युबीक मीटर गाळ त्यातुन काढण्यात आला. चांगला गाळ शेतकऱ्यांनी शेतात वाहून नेला. काही भागातून निघालेला मुरूम चेतक संस्थेने कामासाठी वापरला. याद्वारे शासनास सुमारे 4 कोटीचा महसूल प्राप्त झाला.
झालेल्या कामाची किंमत 1 कोटी 10 लाख रुपये आहे. झालेल्या कामामुळे साडेपाच कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे.  लिंगटांगवाडीतील नाल्याच्या किनाऱ्यावर असलेल्या शेतीला याचा फायदा होणार आहे. कुंदेवाडीतील 110 आणि मुसळगावातील 25 विहिरींना याचा फायदा झाल्याचे पहिल्याच पावसात दिसून आले आहे. एकूण 750 एकरावरील शेतीला याचा फायदा होणार आहे शिवाय गावाला टँकरचीही गरज भासणार नाही.

नाल्यावर ठरावीक अंतरावर यशवंत ग्रामसमृद्धी योजने अंतर्गत तीन बंधारे बांधून पाणी शिवारात जिरविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गावात लघुपाटबंधारे विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात आले असून याच नाल्यावर तीन बंधारे बांधण्यात येणार आहेत. यावर्षीच्या टंचाईवरून धडा घेत भविष्यातही पाणी टंचाई जाणवू नये म्हणून ग्रामस्थांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचे चांगले परिणामही दिसून आले आहेत. जलयुक्त शिवार योजना ही केवळ शासनापुरती मर्यादीत राहिलेली नसून तील लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त होत असल्याचे अशा कामांच्या माध्यमातून दिसून येत आहे.
नामकर्ण आवारे- जागरूक नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे फलित आहे. नागरिक, प्रशासन आणि खाजगी संस्था एकत्रित आल्यास त्यांच्या समन्वयातून चांगले काम उभे रहाते, हे कुंदेवाडीने दाखवून दिले आहे. माझेच गाव असल्याने या कामात सहभाग असल्याचे समाधान आहे.
शिवाजी नाठे, शेतकरी- नाल्याच्या किनारच्या विहिरींची पाणी पातळी 20 ते 25 फुटांनी वाढली आहे. त्याचा फायदा शेतीसाठी होणार आहे. देव नदीचे वाहून जाणारे पाणी ठिकठिकाणी शिवारात जिरल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही.

No comments:

Post a Comment