Thursday 28 July 2016


कावीळचे उच्चाटन
आज जागतिक कावीळ दिन. जगभरात या रोगाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन आजच्या दिवशी करण्यात येते. या रोगाचा संसर्ग असणाऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेता या रोगाबाबत अधिक दक्षता बाळगणे आणि जनतेपर्यंत माहिती पोहोचविणे आवश्यक आहे.

कावीळ  या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी विविध संघटनांमार्फत जागतिक स्तरावर विशिष्ट दिवशी उपक्रम आयोजित करण्यात येत होते. जगात याविषयी एकत्रितपणे प्रयत्न करण्याच्यादृष्टीने जिनीव्हा येथे 2010 मध्ये झालेल्या 63 व्या जागतिक आरोग्य परिषदेत 28 जुलै हा दिवस ‘जागतिक कावीळ दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.


कावीळ हा संसर्गजन्य आजारांतील हा एक विषाणूजन्य आजार आहे. याची लागण झाल्याने यकृताला सूज येत असते. सुरुवातीला या आजाराचे नाव रक्तजल असे होते. कावीळ या आजाराची लक्षणे सर्वप्रथम आफ्रिका आणि अशिया खंडातील काही देशात दिसून आली. जगातील चारशे दशलक्ष जनता या आजाराने ग्रस्त आहे. विकसनशील देशात या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण अधिक दिसून येते.


कावीळ आजाराच्या विषाणूचे 5 प्रकार आहेत. अ, ब, क, ड आणि ई हे मुख्य प्रकारचे विषाणू  आहेत. यापैकी अ आणि ई हे पाण्यातून पसरणारे आहेत. या आजारावर लसीकरणाने उपचार करता येतात. या प्रकारचा आजार  होऊ नये यासाठी शुद्ध पाणी पिणे, पाणी उकळून पिणे, स्वच्छता राखणे, तसेच पाण्याचे क्लोरीनेशन  करणे आवश्यक आहे.


 ब, क आणि ड हे विषाणू मानवी शरीरात रक्ताद्वारे, असुरक्षित लैंगिक संबंध याद्वारे प्रवेश करतात. कावीळ ‘ब’ हा सगळ्यात जास्त भयानक विषाणू आहे. तसेच याची लागण मातेकडून नवीन जन्मल्या अर्भकास होण्याची दाट शक्यता असते, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून नवीन जन्मल्या बाळास 72 तासांच्या आत प्रतिबंधात्मक लस टोचण्यात येते. या रोगामुळे मातेच्या मृत्यची शक्यता अधिक असते.  कावीळ ‘ब’ विषाणूमुळे यकृताचा कॅन्सर होण्याचीदेखील शक्यता असते.

कावीळ आजाराची लक्षणे समजून येण्यास तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो. यात प्रामुख्याने यकृतास सूज येणे, भूक मंदावणे, भूक न लागणे, डोळे, लघवी पिवळे होणे, ताप तसेच अशक्तपणा येणे, पोटात दुखणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात.

रक्ताच्या अतिशय छोट्या थेंबातूनही कावीळ ‘’ हा आजार पसरत असल्याने मोठी खबरदारी घेणे आवश्यक ठरते.  कावीळ ‘’ चे लसीरकणाद्वारे कॅन्सरवरही नियंत्रण ठेवता येते. शुद्ध पाणी आणि अन्नाचे सेवन तसेच वैयक्तिक स्वचछतेकडे अधिक लक्ष दिल्याने कावीळ आजारावर नियंत्रण करणे शक्य आहे.  या वर्षाच्या जागतिक कावीळ दिनाचे उपक्रम ‘कावीळ आजाराचे उच्चाटन’ (एलिमीनेशन) या संकल्पनेवर आधारीत आहे. नागरिकांनी स्वच्छतेवर भर दिल्यास आणि आवश्यक खबरदारी  घेतल्यास या रोगाचे उच्चाटन शक्य आहे.

कावीळ आजारावर नियंत्रण आणण्यासाठी जन्मातच बाळाचे लसीकरण आवश्यक आहे. ‘पेन्टाव्हॅलंट’ ही पाच आजारावरील लस देणे गरजेचे आहे. त्यात कावीळाची देखील लस समाविष्ट असते. लसीकरणाद्वारे आपण लहान मुलांना कावीळमुक्त करू शकतो. जवळच्या वैद्यकीय केंद्रात किंवा नियमित भरणाऱ्या शिबिरात मुलांचे  मोफत लसीकरण करण्यात येते. लसीकरण वेळेवर करून घेण्याची काळजी मातांनी घ्यावी.- डॉ.सुशील वाकचौरे, जिल्हा आरोग्य अधिकारी नाशिक

No comments:

Post a Comment