कृषि विभागाच्या पुढाकाराने आदिवासी भागात बियाणे निर्मिती
नाशिक दि.24- पेठ तालुक्यातील आदिवासी भागात कृषि विभागाने शेतकऱ्यांच्या
आर्थिक समृद्धीसाठी पुढाकार घेतला असून त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. हा
भाग केशर आंबा उत्पादनासाठी ओळखला जात असून लवकरच बासमती आणि कांद्याचे प्रमाणित बियाणांचे उत्पादनदेखील प्रायोगिक
तत्त्वावर घेण्यात येत आहे.
कृषि विभागाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या सहाय्याने 2009
मध्ये पहिल्या प्रयोगास सुरूवात केली. नागलीसारखे खरीप पीक होणाऱ्या या भागात योजने अंतर्गत केशर आंब्याची लागवड करण्यात
आली. आतापर्यंत दोन हजार हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली असून एक हजार हेक्टर
क्षेत्रात यावर्षी फळधारणा झाली. एका शेतकऱ्याला एका झाडामागे सरासरी एक हजार
रुपये मिळत आहेत. पुढील वर्षी आंब्याचे उत्पादन आणखी वाढणार आहे.
या संपुर्ण प्रकल्पांतर्गत एकूण 1 लाख 60 हजार मनुष्य दिवसांची निर्मिती झाली
आणि आंबा लागवड तसेच मजुरीवर 3 कोटी रुपये खर्च झाला. गावातच रोजगार मिळाल्याने
नागरिकांचे गुजरातकडे होणारे स्थलांतरदेखील थांबले आहे. मे-जून मध्ये आंब्याचे
पैसे मिळत असल्याने खरीपासाठी याचा उपयोग करून शेतकरी कर्जाच्या पाशातून बाहेर पडत
आहेत.
कृषि विभागाने पुढाकार घेऊन पेठ, दिंडोरी, सिन्नर येथील खरेदीदारांमार्फत
खरेदीची व्यवस्था केल्याने स्थानिक बाजारात स्वस्त दरात विकला जाणारा आंबा सरासरी 50 रुपये प्रति किलो दराने विकला जातो. भाताच्या तुसात आंबा पिकविण्याचा प्रयोग
यशस्वी झाला असून या सेंद्रीय आंब्याला चांगली मागणी आहे. राष्ट्रीय फलोत्पादन
अभियानातून 8 पॅक हाऊस उभारून ग्रेडींग आणि पॅकेजिंगची व्यवस्थादेखील पुढील
वर्षापासून करून देण्यात येणार आहे.
आंब्याप्रमाणेच भाताचे प्रमाणित बियाणेदेखील प्रायोगित तत्वावर तयार करण्यास
सुरूवात करण्यात आली आहे. राष्ट्रीय बागवानी संशोधन आणि विकास प्रतिष्ठान (एनएचआरडीएफ)च्या माध्यमातून यासाठी
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना स्थानिक वाणाऐवजी 38 क्विंटल
पायाभूत बियाणे पुरविण्यात आले आहे.आयएचआरआय कर्नाल येथून हे बियाणे आणण्यात आले
आहे. 19 शेतकरी गटामार्फत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 150 शेतकऱ्यांनी 150 एकर
क्षेत्रावर या बियाणांची लागवड केली आहे.
शिलानाथ
पवार, तालुका कृषि अधिकारी- शेतकऱ्याला एकरी 20 पोत्याऐवजी 10 पोते जरी उत्पादन
झाले तरी दराचा विचार करता दहापट लाभ अधिक होईल. शिवाय एक हजार क्विंटल प्रमाणित
बियाणे उपलब्ध होईल. या बियाणाला बाजारात मागणी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ
होणार आहे.
|
आत्माकडून हे बियाणे प्रमाणित करून पुढीलवर्षी स्थानिक शेतकऱ्यांना पुरविण्यात
येणार आहे. संशोधन, पायाभूत बियाणांची निर्मिती आणि प्रमाणित बियाणांचे उत्पादन
अशा तीन स्तरावर हे काम सुरू आहे.
नागलीसाठीदेखील 100 शेतकऱ्यांना एक किलोप्रमाणे फुलेनाचणी हे संशोधित वाण
वितरीत करण्यात आले. त्यातून 200 ते 500 क्विंटल बियाणे पुढीलवर्षी मिळणार आहे. हे बियाणेदेखील प्रमाणित करून
विक्रीसाठी उपलब्ध होईल.
कांदा बियाणाचे उत्पादनदेखील रब्बीसाठी करण्यात आले आहे. हा प्रयोग यशस्वी
ठरल्याने पुढील हंगामापासून पश्चिम घाट पट्टयातही कांद्याचे उत्पादन होऊ शकणार
आहे. चार गटातील 40 शेतकऱ्यांना ॲग्रीफाऊंड डार्क रेड जातीचे बियाणे देण्यात आले
होते. या भागात मोहाच्या फुलांचा उन्हाळ्यात बहार असल्याने आणि करवंदे, गिरीपुष्पालाही बहार असल्याने मधमाशांच्या माध्यमातून क्रॉस पॉलिनेशन
चांगल्या पद्धतीने होते. एकरी सव्वा ते दीड लाख उत्पादन त्यामुळे मिळते.
पुढच्या टप्प्यात प्रमाणित बियाणांचे प्रमाण वाढविण्याबरोबर त्याला बाजार
मिळवून देण्याचा कृषि विभागाचे प्रयत्न असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले. मधमाशा
पालनासाठी एनएचआरडीएफच्या माध्यमातून पेट्या मिळविण्याचे कृषि विभागचे प्रयत्न
आहेत. आदिवासी भाग आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यासाठी हे प्रयत्न महत्वाचे ठरणार
आहेत.
*******
No comments:
Post a Comment