Thursday 28 July 2016


लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान आणि
लोकमान्य उत्सव 
नाशिक दि. 28: सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव चळवळीला 125 वर्ष पुर्ण होत असल्याने तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या लोकमान्यांच्या उद्घोषणेचे शतक महोत्सवी वर्ष यानिमित्ताने लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान’  आणि ‘लोकमान्य उत्सव’ असे दोन सांस्कृतिक उपक्रम 2016 आणि 2017 या दोन वर्षात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या उपक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत लोकमान्य टिळकांचे विचार, त्यांची चतुःसुत्री तसेच अन्य उपक्रमांद्वारे जनजागृती घडविण्याबाबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. यात  गणेशोत्सव साजरा करण्याची मंडळाची पद्धत, देखावे, सामाजिक कार्य, समाज सहभाग आदी विषयांबाबत मुल्यांकन करुन शासनाच्यावतीने तालुका,जिल्हा आणि विभागीय स्तरावर विजेत्या मंडळाचा गौरव तसेच रोख बक्षीस करण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेण्याकरता  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी  स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाव ,व्यसनमुक्ती  व जलसंवर्धन  यातून  एका कल्पनेशी निगडीत देखावा करणे आवश्यक आहे.
 स्पर्धेत राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना होता येईल. त्याकरिता मंडळाची धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.  मंडळानी अर्ज संबधित तालुक्याच्या गट शिक्षण अधिकाऱ्याकडे करावयाचा आहे.  29 जुलै ते 29  ऑगस्ट 2016  या कालावधीत गट शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात कार्यलयीन वेळेत  अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. या कालावधीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची तपासणी  व पारितोषिकाकरीता निवड करण्याकरिता विभागीय ,जिल्हा आणि  तालुका स्तरावर  समित्या नेमण्यात येणार आहेत. विभागीय स्तरावर प्रथम पारितोषिक विजेत्या मंडळाला  दोन लाख , द्वितीय दीड लाखांचे  व  तृतीय विजेत्याला  एक लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर  प्रथम विजेत्याला  एक लाखाचे,   द्वितीय  पंचाहात्तर हजार  व तृतीय  विजेत्याला  पन्नास  हजाराचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तालुका स्तरावर  प्रथम पारितोषिक 25 हजार , द्वितीय पंधरा हजार आणि तृतीय दहा हजार  देण्यात येणार आहे.
लोकमान्य उत्सववाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांची जीवनगाथा, त्यांनी केलेल्या संघर्षाचा लढा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या महोत्सवाकरिता विदेशातील आणि महाराष्ट्राबाहेरील महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी आणि राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि महासंघाचे पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.-----

No comments:

Post a Comment