Thursday 21 July 2016


चाकोऱ्यात आदिवासी महिलांना रेनकोट वाटप
महिलांचे श्रम कमी करण्यासाठी ‘मुक्त’चा पुढाकार


नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषिविज्ञान केंद्रामार्फत चाकोरे (ता. त्र्यंबकेश्वर) येथील आदिवासी महिला शेतकऱ्यांचे श्रम कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत येथील महिलांना भात शेतीत काम करण्यासाठी खास डिझाईन केलेले रेनकोट देण्यात आले आहेत.

 त्र्यंबकेश्वर तालुक्यात सरासरी २५०० ते ३००० मीमी पाऊस पडत असल्याने येथे भात हे मुख्य पिक घेतले जाते. या भागात भात पिकात भात पिकाची लावणी, खते देणे, निंदणी अशी महत्वाची कामे पावसातच पार पाडावी लागतात. महत्वाचे म्हणजे ही कामे मुख्यत्वे महिलांमार्फतच केले जाते. सततचा पाऊस आणि चिखलात करावयाची कामे, यामुळे महिलांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. स्थानिक पातळीवरच उपाय म्हणून या महिला इरले अथवा प्लास्टिक कागद घेऊन कामे करीत असतात. तरीही पावसापासून पूर्णतः संरक्षण होऊ शकत नाही. पर्यायाने पावसात भिजल्यामुळे महिलांना ताप, थंडी, सर्दी, अंगदुखी यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. हे सर्व टाळता यावे आणि त्यांचे श्रमही कमी व्हावे म्हणून मुक्त विद्यापीठाच्या कृषिविज्ञान केंद्राने पुढाकार घेतला असून या भागातील महिलांना मदतीचा हात दिला आहे. 


या समस्यांचा अभ्यास करून कृषि विज्ञान केंद्रामार्फत खास करून भात शेतीत काम करता यावे या दृष्टीने डिझाईन केलेले रेनकोट या महिलांना देण्यात आले. मजबूत कापड, वजनाने अतिशय हलका, पुढील बाजूस एका फुटाची चेन, डोक्याला व कंबरेला बांधण्यासाठी खास दोरी, भात शेतीत चिखलात खराब होऊ नये म्हणून योग्य उंची, कोपरापर्यंत बाह्या, इ गोष्टी या रेनकोटमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या रेनकोटमुळे पावसात न भिजता शेतीतील कामाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. आकर्षक अशा या रेनकोटची टिकाऊ क्षमता ५ वर्षे इतकी आहे.

चाकोरे गावात महिला सक्षमीकरण आणि महिलांचे श्रम कमी करण्यासाठी विविध उपक्रम कृषिविज्ञान केंद्रामार्फत राबविण्यात येत आहेत. यात विशेषतः भात कापणीसाठी वैभव आणि लक्ष्मी विळे, तण नियंत्रणासाठी कोनो विडर व सायकल कोळपे, वांगी व भेंडी तोडताना हाताला होणाऱ्या इजा टाळण्यासाठी विशिष्ट हातमोजे व तोडणी यंत्र तसेच भुईमुग फोडणी यंत्र यांचा समावेश आहे. तसेच, महिला व मुलांमध्ये असणाऱ्या प्रथिने व लोह कमतरता दूर करण्यासाठी प्रत्येक घराजवळ परसबाग, शास्रोक्त पद्धतीने धान्य साठविण्यासाठी धान्य पिशव्या, धूरविरहीत चुली, याचबरोबर महिलांना पापड, कुरडया, लाडू व इतर प्रक्रियेचे कौशल्ये देण्यात येत आहेत. कृषि विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान तज्ञ  अर्चना देशमुख या सर्व उपक्रमांचे संयोजन करीत आहेत.

No comments:

Post a Comment