Tuesday 26 July 2016


यशासाठी शंभर टक्के योगदान देणार
                          - कविता राऊत

जागतिक क्रीडास्पर्धांचा महासंग्राम अर्थात ऑलिम्पीक स्पर्धा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होत आहे. ब्राझील मधील रिओ शहरात होणाऱ्या या स्पर्धांमध्ये नाशिकची ‘सावरपाडा एक्सप्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धावपटू कविता राऊत-तुंगार मॅरेथॉन स्पर्धेत 14 ऑगस्ट रोजी सहभाग घेणार आहेत. त्यांच्या तयारीविषयी त्यांच्याशी केलेली ही बातचीत-
प्रश्न :- रिओ 2016मध्ये देशाचे स्वाभाविकच महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहात, मनात काय भावना आहेत?
उत्तर:- खूप छान वाटतंय. तिरंगा ध्वजाकडे बघितल्यावर अभिमानाने ऊर भरून येतो. ऑलिम्पिकसारख्या सर्वोच्च क्रीडा स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते; तो क्षण आता खूप जवळ येत चाललायं. मी उलटमोजणी देखील सुरु केली आहे.
प्रश्न:- या प्रवासामध्ये नाशिकचा स्थान काय?
उत्तर:- नाशिकच्या मातीसोबत एक घट्ट नाळ जुळली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक कठीण काळ असतो आणि याच काळात नाशिकने मला आधार दिला, नवा उत्साह दिला. महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी मला मदत केली आणि या सर्व सकारात्मक पाठींब्यामुळेच मला कठीण काळातून उभारी घेण्याची प्रेरणा मिळाली.
प्रश्न:- गेल्या वर्षभरात या स्पर्धेसाठी केलेल्या तयारीचे नियोजन कसे होते?
उत्तर:- आतापर्यंतच्या प्रवासातील सर्वात कठीण परिश्रम मी घेत आहे. रस्त्यावर धावण्याचा  सराव केला. पहाटे तीन  वाजता उठून गोदावरीच्या किनाऱ्यालगत बापू पूल परिसरात धावण्याचा सराव आणि बाकी शारीरिक व्यायाम करायचे. मनःशांती साठी रोज थोडा वेळ ध्यान करायचे. सायंकाळी भोसला सैनिकी शाळेच्या मैदानावर सराव करीत असायचे,ऑलिम्पिकसाठी निवड झाल्यानंतर बंगरूळला सराव सुरू आहे.
प्रश्न:- अशा मोठ्या स्पर्धांसाठी शारीरिक तंदुरुस्ती महत्वाची असते. त्यासाठी काही विशेष खबरदारी…..
उत्तर:- जास्तीत जास्त मी फळे आणि फळांचा रस, पालेभाज्यांचे सूप यावर भर दिलेला आहे. दुपारी जेवण आणि नंतर सलाड एवढाच मोजकाच पण गुणात्मक आहार घेत आहे. व्यायाम नेमाने सुरूच आहे.

प्रश्न:- आतापासून पुढे अंतिम सामन्याच्या वेळपर्यंत सरावाचे नियोजन कसे असणार आहे?
उत्तर:- मॅरेथॉन स्पर्धे मध्ये 42 किमी अंतर पूर्ण धावायचे असते. यासाठी शारीरिक तंदरुस्ती आणि शारीरिक क्षमता चांगली असणे गरजेचे आहे. 32 किमी ते 42 किमी या अतिमहत्वाच्या टप्प्यासाठी वेगळी धोरणे आखावी लागतात. सध्या या धोरणांचाच विचार करत आहे. 30 किंवा 31 तारखेपर्यंत हार्ड सराव असणार आहे आणि नंतर प्रमाण कमी करून फक्त नियमित सरावावर भर देता येईल.  सर्व तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. एखाद्या परीक्षेपूर्वी आपण उजळणीला महत्व देतो त्याप्रमाणे सध्या बारीकसारीक गोष्टींबाबत उजळणी करत आहे, तसेच शरीर तंदुरुस्त रहावं यासाठी काळजी घेत आहे.
प्रश्न:- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या; कसा होता अनुभव?
उत्तर:- अविस्मरणीय क्षण होता. मनावरच दडपण पूर्णपणे दूर झाल्यासारखं वाटलं. पंतप्रधान महोदयांच्या भाषणामुळे अजून चांगले याश मिळविण्यासाठी प्रेरणा मिळाली.

प्रश्न:- सावरपाडा ते रिओ काय सांगाल या प्रवासाबद्दल...?
उत्तर:- खर सांगायचं तर सुरुवात एकदमच खडतर होती; पण चालायचं ठरवलेलं होतं. मार्ग खडतर की सरळ याची कधीच पर्वा केली नाही फक्त चालतंच राहिले. आता सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद सोबत घेऊन एका महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले आहे. एकूणच या प्रवासात आई वडील गुरु आणि पती यांनी वेळोवेळी आधार दिला.
प्रश्न:-  पतीचा उल्लेख केलात, जोडीदाराच्या योगदानाबद्दल काय सांगाल..
उत्तर :- ते कठिण काळातील प्रमुख आधार आहे. जेव्हा लग्न ठरले तेव्हा यांनीच मला पुन्हा खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. त्यामुळे माझा खेळ पूर्ववत झाला किंबहुना विकसित झाला.
प्रश्न:- आपले मार्गदर्शक विजेंदर सिंग यांच्या बोलण्यातून आपल्याविषयी कौतुकाची भावना नेहमी प्रकट होते. तुम्ही आपल्या ‘कोच’बद्दल काय सांगाल?
उत्तर:- मी आज जे काही आहे ते फक्त त्यांच्यामुळेच आहे.  त्यांच्यामुळे नाशिकमध्ये निवासाची सोय झाली. माझी  सगळी  व्यवस्था त्यांनीच केली. माझ्यातील गुण हेरून माझ्या क्षमतांना आणि प्रयत्नांना योग्य दिशा दिली. त्यांनी जे सांगितले ते कृतीत आणण्याचा प्रयत्न मी केला, कदाचित त्यामुळेच मी आज या ठिकाणी आहे.
प्रश्न:- ‘रिओ’मधल्या ‘त्या’अंतिम क्षणाबद्दल मनात काय कल्पना आहे?
उत्तर:- त्या स्वप्नपुर्तीच्या क्षणांची वाट पाहते आहे, त्यासाठीचएवढा सराव चाललाय. त्या दिवशी मी माझे 100 टक्के योगदान देणार आहे. संपूर्ण शर्यत पूर्ण करून पदक मिळविण्याचा माझा प्रयत्न असेल. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्यासोबत आहेतच...
प्रश्न:- उदयोन्मुख खेळाडूंना काय संदेश द्याल?
उत्तर:- शरीर तंदरुस्त राहण्यासाठी खेळत राहणे आवश्यक आहे. खूप कष्ट करा कधी न कधी यश मिळतेच मिळते. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयशाने खचून जाऊ नका आणि यश मिळाल्याने हुरळून जाऊ नका.
प्रश्न:-जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने स्पर्धेसाठी शुभेच्छा!
उत्तर:- धन्यवाद.

कोच विजेंदर सिंग(SAI)- असा शिष्य प्रत्येक गुरूला मिळो. कविताने अतिशय कठीण प्रसंगातून मार्ग काढत ऑलिम्पिकपर्यंत धाव घेतली आहे. जेव्हा सगळ्या बाजूने टीकांचा वर्षाव होत होता तेव्हा न डगमगता तिने ऑलिम्पिकसाठी पात्र ठरून मिळवून टीकाकारांना उत्तर दिले. कविताने ऑलिम्पिकचे दरवाजे ठोठावले आहेत. नव्या खेळाडुंना ही गोष्ट फारच प्रेरणादायी आहे. ती चांगली कामगिरी करेल असा विश्वास आहे.
धन्यवाद...!!!



No comments:

Post a Comment