Saturday 16 July 2016

गाव बदलतंय…
दोन दिवस त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विविध भागांचा दौरा झाला. निमित्त जलयुक्त शिवार योजनेच्या यशकथांचे होते. मात्र त्यानिमित्ताने बदलणाऱ्या ग्रामीण भागाचे झालेले दर्शन निश्चितपणे सुखावणारे होते. माझ्या तरुण वयात असणारे गाव आणि आताचे गाव यातील तफावत स्पष्टपणे नजरेत भरली.
गावातले शेतकरी पारंपरिक शेतीऐवजी नवे प्रयोग करू लागले आहे. शासनाच्या योजनांची माहिती ते चांगल्यापद्धतीने घेतात. मोबाईलवरची एसएमएस सेवा त्यांना माहिती आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने कमी वेळेत चिखलणी करण्याचे तंत्र त्यांच्याकडे आहे. बाजाराची मागणी त्यांना कळते. बैलगाडीची जागा बाईक, कार अशा वाहनांनी घेतली आहे. शेतात उभ्या असणाऱ्या ट्रॅक्टरचे चित्र सामान्य आहे. एका ठिकाणी बैलगाडी शेतात दिसली तर आमच्या छायाचित्रकाराला छायाचित्र घेण्याचा मोह झाला, हादेखील संवादाच्या परिभाषेतील एक ‘संदेश’च आहे.

देवगाव असो वा हरसूल हा संपुर्ण भाग आदिवासी बहूल आहे. गावात फिरताना रेसर बाईकही पहायला मिळते. अगदी दुर्गम अशा भागात प्राथमिक शाळेत मुले बागडतांना दिसतात. आदिवासी आश्रमशाळेत शांततेत वर्ग सुरू असतो. गोलदरीजवळील आश्रमशाळेत नव्या इमारतीचे काम सुरू आहे. येथे पहिली ते बारावीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. वर्ग खोल्या, कर्मचारी निवासस्थाने,  वसतीगृह असे एकूण 19 कोटीचे निर्मितीकार्य येथे सुरू आहे.

 शाळेत सोलर वॉटर हिटर आहे. तंत्रशिक्षणाची सोयही या भागात आहे. नव्या पिढीचा शिक्षणाकडे वाढलेला कल खरोखर आश्वासक वाटला. आधी ‘सायबाची’ गाडी आली की पहायली गर्दी व्हायची. हे आश्चर्य आता राहिलेले नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे, गाव शहराशी जोडले गेलेय. दुर्गम भागातही चांगले रस्ते आहेत. ठाणपाडाला तर शहरासारखे चकचकीत काँक्रीट रस्ते झालेत.
जरा पुढे गेल्यावर चिंचओहोळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांवर उपचार सुरू होते.  संपूर्ण केंद्राला सोलर विद्युत पुरवठा होतो. ठाणपाड्याला डोंगरावरून खाली उतरणारी पायवाट होती. इथे एका इंग्रजी शाळेची पाटी दिसली. ड्रिप, स्कुल, पिक्चर हे शब्द सहजपणे ऐकायला मिळतात. देवगावला एका घरात डिश टिव्ही कनेक्शन होतं आणि कार्टुन सुरू होते. लहान मुले पहात होती. रिचार्ज संपण्याची सुचना स्क्रीनवर आली तसे दुसरीतला एक बच्चु ओरडला ‘रिचार्ज करावं लागील’…..


बदल भरपूर होतोय. शासन खऱ्या अर्थाने दारी पोहोचलंय. बदलाची मुलभूत उर्मी इथे दिसून येते. वनाचं, पाण्याचं, शिक्षणाचं, आरोग्याचं महत्व पटू लागलंय. रात्री दिव्याच्या प्रकाशातही गाव जागू लागलंय. आपल्या भविष्याविषयी नवी पिढी अधिक जागरूक होते आहे…..बदल निसर्ग नियमच आहे. आश्वासक बाब म्हणजे हे बदल अनुकूल आहेत. नाही बदलली ती इथली माणूसकी, आपलेपणा, कष्टाची तयारी, निसर्गाप्रती संवेदना….बदलायलाही नको, नाहीतर गावपणचं नष्ट होईल. माणसाचा डोलारा यावरच आहे.

No comments:

Post a Comment