Thursday 21 July 2016


समन्वयातून जलक्रांती
नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातील रवळगाव येथे  जलयुक्त शिवार योजने अंतर्गत  शासनाच्या विविध विभागांनी समन्वयाने आणि एकत्रितपणे  कामे केल्याने ‘माथा ते पायथा’ जलसंधारणाची कामे होऊन पहिल्याच पावसात शिवारात सर्वत्र पाणीसाठा झाला आहे. पूर्वी झालेल्या कामांमुळे 132 टीसीएम पाणीसाठा होत असे. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत झालेल्या कामांमुळे 910.96 टीसीएम पाणीसाठा  नव्याने उपलब्ध होणार आहे.

 दिंडोरीपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या या संपुर्ण आदिवासी लोकसंख्या असलेल्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी फारशी समस्या येत नाही. मात्र गेल्या दोन वर्षात ग्रामस्थांना उन्हाळ्यात थोडा त्रास सहन करावा लागला. पाण्याच्या कमतरतेमुळे रब्बीचे क्षेत्रदेखील मर्यादीतच होते. ही परिस्थितीत बदलण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्रित येऊन जलयुक्त शिवार योजना राबविण्याचा निर्णय घेतला.

उपविभागीय अधिकारी मुकेश भोगे  यांच्या मार्गदर्शनाखाली  वन विभाग, कृषि विभाग, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग, ल.पा. स्थानिक स्तर आणि भुजल विकास यंत्रणा यांनी गावातील विविध कामांचा आराखडा तयार केला. तालुका कृषी अधिकारी व्ही.एस.सोनवणे यांनी या यंत्रणांमध्ये चांगला समन्वय राहून नियोजनपूर्वक कामे होतील याकडे विशेष लक्ष दिले. मार्च 2015 पासून कामांना सुरूवात करण्यात आली.

गावातील दऱ्याचा नाल्यावर असलेल्या पाझर तलावाच्या बंधाऱ्याचे पिचिंग आणि सांडव्याचे काम केल्याने पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. भुजल विकास यंत्रणेतर्फे विंधन विहिरीजवळ हायड्रो फ्रॅक्चरींग करण्यात आल्याने विंधन विहिरीला चांगले पाणी  लागले आहे. त्याचा लाभ उन्हाळ्यात होणार आहे. लघु सिंचन विभागातर्फे दोन सिमेंट बंधाऱ्याची कामे सुरू आहेत. आतापर्यंत एकूण 2 कोटी 33 लक्ष रुपयांची कामे करण्यात आली आहेत.
पिप्परधाड नाल्यातून लोकसहभागाद्वारे 800 घनमीटर गाळ काढला. त्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी 60 हजार रुपये खर्च केला. या नाल्यावरील बंधाऱ्या लगतच्या 50 फुट खोल विहिरीचे पाणी तळाशी लागले होते. नालाखोलीकरणानंतर अवघ्या 8 ते 10 फुटावर पाणी आले आहे.

व्ही.एस.सोनवणे, तालुका कृषी अधिकारी- शासनाच्या विविध यंत्रणांनी एकत्रित येऊन समन्वयाने कामे केल्याने मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली आहेत. केवळ गावाची पाणी टंचाई दूर करणे हा उद्देश नसून जलसमृद्धीतून कृषीसमृद्धीकडे गावाची वाटचाल व्हावी, असे प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी कृषि विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल.
श्री.वामन लिलके, माजी सरपंच- जलयुक्त शिवार योजना गावाचे भाग्य बदलणारी ठरली आहे. सर्व ग्रामस्थांचे सहकार्य आणि शासकीय यंत्रणांचे चांगले काम यामुळे आता गावाला पाणी टंचाई भासणार नाही. शेतात विविध प्रकारची पिके घेता येतील.



गावाची लोकसंख्या 2860 असून वर्षभरात  त्यासाठी 16 टीसीएम  आणि जनावरांसाठी चार टीसीएम असे एकूण 20 टीसीएम पाणी आवश्यक असते. रब्बी पिकांचाही विचार करता पिकांसाठी 821 टीसीएम पाणी गरजेचे आहे. पूर्वी झालेल्या कामांमुळे 132 टीसीएम पाणीसाठा होत असे. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत झालेल्या कामांमुळे 910.96 टीसीएम पाणीसाठा  नव्याने उपलब्ध होणार आहे. गावाच्या गरजेपेक्षा हा पाणीसाठा जास्त असून त्यामुळे गाव खऱ्या अर्थाने ‘सुजलाम् सुफलाम्’ होणार आहे.
कामाचा प्रकार
कामे (पुर्ण + सुरू असलेली)
अडविले जाणारे पाणी (टीसीएम)
समतल सलग चर
128.9 हेक्टर
21.65
मजगी
60.27 हेक्टर
159.29
नाला खोलीकरण/सरळीकरण
7
24.5
मातीनाला बांध
4
23.52
वनतळे
36
450
गाळ गाढणे
1
5
 गावतलाव/ पाझर तलाव दुरुस्ती
4
227

*******

No comments:

Post a Comment