Monday 18 July 2016


दुष्काळातून जलसमृद्धीकडे
 सिन्नर तालुक्यातील डुबेरे गावात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून  चार ठिकाणी 41 हजार क्युबीक मीटर गाळ काढण्यात आल्याने 4.16 कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. गावाची वाटचाल दुष्काळाकडून जलसमृद्धीकडे होत आहे.

गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीला लागूनच मणेगाव-ब्राह्मणदरा पाझर तलाव आहे. तलावात गाळ साठल्यामुळे पावसाळा संपण्याचा आतच तलाव कोरडा पडत असे. गावात गेल्या पाच वर्षापासून दिवाळीनंतर टँकर सुरू करावे लागतात. गावाचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश झाल्यानंतर आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली  सरपंच अर्चना ढोले, माजी सरपंच नारायण वाजे, शरद माळी यांनी ग्रामसभेत नागरिकांना लोकसहभागाचे महत्व पटवून दिले.

तहसीलदार मनोज खैरनार यांनी ग्रामस्थांना जलयुक्त शिवार योजनेबाबत मार्गदर्शन करताना आवश्यक सहकार्य उपलब्ध करून दिले. टाटा ट्रस्टने तीन जेसीबी आणि 5 डंपर उपलब्ध करून दिले. 15 टक्के खर्च लोकसहभागातून करण्यात आला. त्यात युवामित्र संस्थेचे सुनिल पोटे यांचे चांगले सहकार्य लाभले. या पाझरतलावातून गाळ काढण्याबरोबरच धुपे, चिलमदर येथील कोल्हापूर बंधारा आणि  लेंडी नाल्यातील गाळही काढण्यात आला आहे.
पहिल्या पावसामुळेच पाझर तलाव पाण्याने भरला आहे. त्यातील पाणी दोनदा जिरल्याचे स्थानिक सांगतात. हे पाणी बाजूने झिरपून नाल्यामध्ये प्रवाहित झाले आहे. आणखी पाऊस झाल्यास इतर दोन ठिकाणीदेखील पाणीसाठा होऊन गाव टँकरमुक्त होईल,असा विश्वास माळी यांनी व्यक्त केला.
कामाचे ठिकाण
काढलेला गाळ (घ.मी.)
निर्माण झालेली साठवण क्षमता (कोटी लिटर)
लाभ होणाऱ्या शेतीचे क्षेत्र
ब्राह्मणदरा
27700
2.77
20 एकर
धुपे को.बं.
5700
0.60
4 एकर
चिलमदरा को.बं.
4000
0.40
3
लेंडी नाला
4300
0.43
0
एकूण
41600
4.16
27

गावातील शिवार खोल असल्याने पाणी जिरण्याचे प्रमाण जास्त आहे. त्याचा फायदा विहिरांना होताना दिसत आहे. पाच वर्ष टंचाईने त्रस्त नागरिकांना जलयुक्त शिवार योजनेमुळे आशेचा किरण दिसला आहे. गावालगत असलेल्या शेंदरी पाझर तलावातूनदेखील लोकसहभागातून गाळ काढण्यात आल्याने त्याठिकाणी होणाऱ्या पाणीसाठ्याचा डुबेरेसह अन्य परिसरातील गावांनाही लाभ होणार आहे.

 शिवारात पाणी अडल्याने  डुबेरे गावात समाधानाचे वातावरण आहे. गावाला प्रतिक्षा आहे आणखी एका चांगल्या पावसाची. त्यामुळे शिवारात पाणी अडून गाव टँकरमुक्त होणार आहे आणि समृद्धीच्या दिशेने ते गावाचे पहिले पाऊल ठरणार आहे.
अर्चना ढोले, सरपंच- शासनाची अत्यंत चांगली योजना आहे. त्यामुळे ग्रामस्थ एकत्रित आले आणि सगळ्यांच्या सहकार्याने गावात चांगले काम झाले आहे. यावर्षी टँकर लागणार नाहीत असा विश्वास वाटतो.
नारायण वाजे, माजी सरपंच- दुष्काळ ही आमच्यासाठी संधी ठरली आहे. शासनाच्या सहकार्यामुळे संकटाचं संधीत रुपांतर करता आले. जनतेत लोकसहभागाबाबत जागृती निर्माण झाली आहे. शेंदरी पाझर तलाव त्याचे उत्तम उदाहरण आहे.

No comments:

Post a Comment