Wednesday 22 March 2017

जलजागृती सप्ताह समारोप

जलसाक्षरता  आणि जलव्यवस्थापन ही काळाची गरज - राधाकृष्णन बी.


नाशिक, दि.22- येत्या काळात पाणी टंचाईचा धोका टाळण्यासाठी  जलसाक्षरता आणि जलव्यवस्थापनावर अधिक भर देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन  जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
कालीदास कलामंदिर येथे जलजागृती सप्ताह समारोप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता सुभाष वाघमारे, अधिक्षक अभियंता राजेश मोरे, निवृत्त जलसंपदा सचिव पी.आर. भामरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी के.टी.जगताप, महानगरपालिकेचे शहर अभियंता यू.बी.पवार आदी उपस्थित होते.

श्री. राधाकृष्णन म्हणाले, वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी पुरविण्यासाठी पाण्याचा पुर्नवापर करण्याची गरज आहे. पावसाळ्यातील पाणी अधिकाधीक प्रमाणात अडविणे आणि जिरविणे यासाठी काम करताना जलपुर्नभरण मोहिम हाती घेण्याचीदेखील गरज आहे. पाण्याचे साठे वाढवण्यासाठी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून नदी, नाले आणि धरणातून गाळ काढण्याचे तसेच पाणी अडविण्याचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले  आहेत. त्यासाठी  विविध घटकांचा  मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले.
पाण्याचे संवर्धन होण्यासाठी जनजागृती महत्वाची असून जलसंपदा विभागाने जलजागृती सप्ताहात त्यासाठी चांगले उपक्रम राबविले, असेही ते म्हणाले.
जलजागृती सप्ताहाच्या निमित्ताने ‘सांडपाण्याचा पुर्नवापर’ ही संकल्पना जनमानसात बिंबवण्याचा विभागाने प्रयत्न केला असल्याचे   मुख्य अभियंता श्री. वाघमारे यांनी सांगितले.

 निवृत्त सचिव श्री. भामरे, श्री.जगताप, श्री.पवार आदींनी विचार व्यक्त केले तसेच अधिक्षक अभियंता श्री. मोरे यांनी प्रास्तविक केले. जलदिनानिमित्त काव्य, वक्तृत्व, गीत पथनाट्य आदी विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

तत्पूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे जलबचतीचा संदेश देण्यात आला. दिलीप काळे यांनी सहकाऱ्यांसह ‘सेव्ह वॉटर सेव्ह लाइफ’ हा मूक अभिनयाचा सुंदर प्रयोग सादर केला. त्यातून पाण्याचे महत्व मांडण्यात आले.  विश्वनाथ डवरे यांनी किर्तन, संदिप गायकवाड यांनी ‘पाणी हरवलं’ हे लघुनाट्य, श्रुती बोरस्ते यांनी व्याख्यान, कडा कार्यालयाच्या नमिता हेमडे व सहकाऱ्यांनी पथनाट्य, शिल्पा हासे यांनी ‘प्रदुषणावर नदीचे मनोगत हे एकपात्री व सीडीओ मेरी महिला मंडळाच्या सदस्यांनी ‘पाणी बचतीचा मंत्र खास’ हे लघु नाट्य आदी कार्यक्रम सादर केले. जलजागृती सप्ताहानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.


जलदिंडीद्वारे जलजागृतीचा संदेश
जलजागृती सप्ताहानिमित्त आयोजित जलदिंडीचे उद्घाटन महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते  झाले. यावेळी त्यांनी जलजागृती उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी अधिक्षक अभियंता राजेश मोरे , कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे जलसंपदा विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीची सुरुवात त्र्यंबक रोड वरील जलसिंचन भवन येथून झाली. त्र्यंबक रस्ता, पिनॅकल मॉल, कान्हेरे वाडी येथून कालीदास कलामंदिर येथे दिंडीचा समारोप झाला. 
      

*************

No comments:

Post a Comment