Monday 1 October 2018

पत्रकार पुरस्कार


जलयुक्त शिवार पत्रकार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नाशिक, दि. 1 : महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानात वृत्तपत्रातून तसेच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाद्वारे जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या पत्रकारांना राज्य शासनाच्या वतीने राज्य, विभाग तसेच जिल्हा या तीन स्तरांवर पुरस्कार देण्यात येतात. सन 2017-18 या वर्षीच्या पुरस्कारासाठी पत्रकारांनी आपला विहित नमुन्यातील अर्ज 20 ऑक्टोबर 2018 पर्यंत तीन प्रतीत जिल्हा माहिती कार्यालय येथे सादर करावेत.
जलयुक्त शिवार अभियानाबाबत जनजागृती, अभियानात लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर, पाणलोटाच्या यशोगाथा प्रकाशित करणे, इतर गावांना प्रोत्साहित करून पाणी प्रश्न सोडविण्यात योगदान देणाऱ्या पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात येतो.
राज्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागीय स्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार, तर जिल्हा स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार या नावाने पुरस्कार देण्यात येतात.  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अ, ब, क वर्गवारीतील वृत्तपत्रे, नियतकालिके यामधून 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत प्रसिध्द झालेल्या साहित्याचाच  विचार करण्यात येईल.
मुद्रित माध्यम गटासाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर प्रत्येकी तीन पुरस्कार देण्यात येतील. यामध्ये जिल्हा स्तरावरील प्रथम क्रमांकाला 31 हजार, द्वितीय क्रमांकास 21 हजार, तृतीय क्रमांकास 15 हजार, विभागीय स्तरावरील प्रथम क्रमांकाला 50 हजार, व्दितीय क्रमांकाला 35 हजार, तृतीय क्रमांकाला 25 हजार, तर राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाला एक लाख, द्वितीय क्रमांकाला 71 हजार, तर तृतीय क्रमांकाला 51 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच इलेक्ट्रानिक माध्यमातील मराठी वृत्तकथा प्रसारित करणाऱ्यांना राज्यस्तरावर तीन पुरस्कार देण्यात येतात. त्यामध्ये प्रथम क्रमांकास 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकास 71 हजार, तर तृतीय क्रमांकास 51 हजारांचे बक्षीस देण्यात येते.
मुद्रित माध्यम गटासाठी वृत्तपत्रांचे बातमीदार, स्तंभलेखक, मुक्त पत्रकार या पुरस्कार स्पर्धेत भाग घेण्यास पात्र असतील. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रसिध्द केलेल्या साहित्याचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल. उमेदवारास ज्या स्तरावरील पारितोषिकासाठी अर्ज करावयाचा आहे, त्या स्तरावरील समितीच्या सदस्य सचिवांकडे अर्ज करता येईल. मात्र, कोणत्याही एका पारितोषिकासाठीच अर्ज करता येईल. एका वृत्तपत्राच्या एका आवृत्तीच्या एकाच पत्रकारास या स्पर्धेत भाग घेता येईल. एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकामार्फत स्वीकारण्यात येईल. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी संबंधित जिल्ह्यातून प्रसिद्ध होणारी वृत्तपत्रे, नियतकालिके यांमध्ये प्रसिध्द झालेल्या साहित्याचाच विचार केला जाईल.
पुरस्कारासाठी मागील पाच वर्षाची कामगिरी, त्याची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. सलग दोन वर्षे एकाच पत्रकारास पुरस्कार प्राप्त झाल्यास तिसऱ्या वर्षी त्याचा प्रस्ताव स्विकारला जाणार नाही.
स्पर्धेत भाग घेत असलेल्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच कोणाचेही शिफारस पत्र जोडण्याची आवश्यकता नाही. पुरस्कारासाठी पाठवायच्या प्रस्तावासोबत मूळ लिखाणाची कात्रणे त्यांच्या दोन प्रतीसह पाठवावे लागतील. स्पर्धेसाठी पाठविलेला प्रस्ताव,त्यासोबत पाठविलेली लेखांची कात्रणे निटनेटकी असणे आवश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड केलेली कात्रणे, न वाचता येणाऱ्या प्रस्तवांचा विचार केला जाणार नाही, असे प्रस्ताव रद्द समजले जातील.
पुरस्कार पात्रतेच्या अटी व शर्तीच्या अधिक माहितीसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय पाहावा. प्रत्येक स्तरावरील पुरस्कारासाठी एकापेक्षा अधिक प्रस्ताव सादर केल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.  1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या कात्रणांसह आपला प्रस्ताव 20 ऑक्टोबर 2018 पूर्वी जिल्हा माहिती कार्यालय, 3 रा मजला, सारडा संकुल, नाशिक येथे सादर करावा, असे जिल्हा माहिती अधिकारी  डॉ.किरण मोघे  यांनी कळविले आहे.

00000


No comments:

Post a Comment