शेतकऱ्यांनी तृणधान्य उत्पादन
वाढविण्यावर भर द्यावा- जिल्हाधिकारी
नाशिक, दि.16- बदलत्या जीवनशैलीनुसार तृणधान्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत असून ते
आरोग्यासाठी सकस आणि पौष्टीक आहे. आरोग्याच्या पौष्टीकतेसाठी त्याचे महत्व लक्षात
घेता शेतकऱ्यांनी तृणधान्य पीक उत्पादन
वाढविण्यासाठी त्याकडे दृर्लक्ष न करता उत्पादन कसे वाढविता येईल याकडे लक्ष देणे
गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
कृषि विज्ञान केंद्र, यशवंतराव
चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे कृषि विभाग आणि कृषि विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पौष्टिक तृणधान्य दिनाच्या चर्चासत्राप्रसंगी ते
बोलत होते. यावेळी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, जिल्हा कृषि
अधिक्षक संजीव पडवळ, उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप देवरे, गोकुळ वाघ आदी उपस्थित होते.
श्री. राधाकृष्णन म्हणाले, नाशिकच्या
वातावरणात उत्तम प्रकारच्या पिकांचे उत्पादन घेता येते. तृणधान्याच्या शेतीस
प्रोत्साहन उत्पादनाकडे लक्ष दिल्यास त्यात वाढ शक्य आहे. त्यादृष्टीने कृषी
विभागाने तृणधान्य पिकांबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी. द्राक्ष, कांदा, डाळींब
उत्पादनाबरोबर नागली, ज्वारी सारख्या तृणधान्य पिकांचे उत्पादन घेण्यासाठी त्यांना मार्गदर्शन
करावे. तसेच पौष्टीक तृणधान्य दिवस ही एक दिवसाची चळवळ न राहता याबाबत कायमस्वरुपी
जागृती होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
श्री. देवरे यांनी प्रास्ताविकात
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानअंतर्गत राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाची माहिती
दिली. ते म्हणाले, तृणधान्य हे कमी पाण्यात आणि वातावरणाचा ताण सहन करुन हि पिके चांगल्या
प्रकारे येत असतात. ज्वारी, बाजरी आणि रागी या पिकांमध्ये नाशिक जिल्हा उत्पादनात
अग्रेसर आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते
तृणधान्याचा प्रसार आणि प्रचार व्हावा यादृष्टीने माहिती पत्रिकेचे प्रकाशन
करण्यात आले. तत्पूर्वी कृषी विभागाच्या वतीने जनजागृती साठी मोटार सायकल रॅली
काढण्यात आली यावेळी जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment