Thursday 1 November 2018

बोंड अळी व्यवस्थापन


                    गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनाबाबत आवाहन                        
         नाशिक, दि.1 - सद्य:स्थितीत कपाशीचे पीक पक्वता व वेचणीच्या अवस्थेत असून बोंडअळी व्यवस्थापनाबाबत कृषी विभागातर्फे मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत.
 गुलाबी बोंड अळीच्या वाढीसाठी दिवसाचे तापमान 29 ते 32 अंश सें. व रात्रीचे तापमान 11 ते 14 अंश सें. तर दिवसाची आर्द्रता 71 ते 80 टक्के तर रात्रीची आर्द्रता 26 ते 35 टक्के अत्यंत पोषक आहे. यावर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सरासरी दिवसाचे तापमान 35 अंश सें. असल्यामुळे या अळीचा प्रादुर्भाव वाढण्यास अटकाव झाला होता. परंतु आता यापुढे तापमान जसे जसे कमी होत जाईल व हे तापमान वरील तापमानाच्या श्रेणीमध्ये येईल तशी गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावात वाढ होईल.
          गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी नियमित सर्वेक्षण करुन फेरोमोन सापळ्यामधील पतंग दर आठवड्याने मोजून नष्ट करावे. शेतामध्ये लावलेल्या सापळ्यामधील कामगंध वड्या वेष्टणावरील सुचनेनुसार बदलाव्यात व प्रत्येक शेतकरी बंधुनी एकरी कमीत कमी आठ फेरामोन सापळे लावून सापळ्यात अडकलेले पंतग नष्ट करण्याची मोहिम राबवावी.
          प्रत्येक आठवड्याला एकरी शेताचे प्रतिनिधीत्व करतील अशी 20 झाडे निवडावीत, निवडलेल्या झाडावरील मध्यम आकाराचे, मध्यम पक्व झालेले व बाहेरुन किडके नसलेले एक बोंड अशी 20 बोंडे तोडून त्यामधील  जीवंत अळ्यांची संख्या मोजून त्यामध्ये जर दोन किडकी बोंडे किंवा दोन पांढरी गुलाबी रंग धारण करीत असलेल्या अळ्या आढळल्यास आर्थिक नुसकान पातळी ओलांडली असे समजून झाडावर पुरेशी हिरवी बोंडे असल्यासच शेतकरी बंधुनी  किटकनाशकाची फवारणी करावी व आवश्यकता भासल्यास 12 ते 15 दिवसाचे अंतराने दुसरी फवारणी करावी. प्रत्येक फवारणीमध्ये वेगवेगळे रासायनिक किटकनाशके वापरावीत.
          सद्यस्थितीत बागाईत कपाशीवर प्रादुर्भावास नुकतीच सुरुवात झालेल्या क्षेत्रावर ट्रायझोफॉस 40 टक्के प्रवाही 30 मिली किंवा डेल्टामेथीन 2.8 टक्के प्रवाही 10 मिली 10 लिटर पाण्यास मिसळून फवारणी करावी.
जेथे प्रादुर्भाव 10 टक्केच्यावर आहे अशा ठिकाणी मिश्र किटकनाशकांची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामध्ये ट्रायझाफॉस 35 टक्के + डेल्टामेथीन 1 टक्के 17 मिली किंवा क्लोरेट्रेनिलीप्रोल 9.3 टक्के + लॅब्डासायहॅलोथीरन 3.6 टक्के 5 मिली किंवा इंडॉक्झीकार्ब 14.5 टक्के + ॲसीटामाप्रीड 7.7 टक्के 10 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50 टक्के, +सायपरपेथ्रीन 5 टक्के 20 मिली  या प्रमाणे मिश्रण करावे.
          कोरवाडवाहू पिकाची स्थिती , पाण्याचा ताण व पिकाचा उर्वरित कालावधी लक्षात घेऊनच फवारणीचा निर्णय घ्यावयाचा आहे. जेथे ओलीताची सोय आहे त्यांनी हलके पाणी देऊनच फवारणी करावी. फवारणी करणेपूर्वी उमललेल्या बोंडातील कापूस वेचूनच फवारणी करावी. शेतकरी बंधुनी कोणत्याही परिस्थितीत कपाशीची फरदड घेऊ नये. सर्वसाधारण तीन ते चार वेचण्या झाल्याबरोबर कपाशीचे पीक काढून टाकावे.
          कापुस साठवणुक व संकलन केंद्रे, जिनींग मिल्स इत्यादी ठिकाणी सुद्धा कापुस यावयास सुरुवात झाली आहे. तिथे आतापासुनच साफ सफाई मोहिम राबवुन परिसरामधील कापुस जिनिंग नंतर चाळणीवरच्या अळ्या, कोश, व खराब कापूस वेळोवळी त्वरीत विल्हेवाट लावावी व त्या परिसरातील प्रत्येकी 15 ते 20 फेरेमोन सापळे लावावेत तसेच प्रकाश सापळेद्वारे अडकलेले पंतग वेळोवेळी नष्ट करावेत, असे आवाहन कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह  यांनी केले आहे.
00000


No comments:

Post a Comment