मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेला मान्यता
नाशिक दि.18- दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे याकरिता राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहीत एक
लक्ष सौर कृषीपंप टप्प्याटप्प्यात उपलब्ध करून देण्याच्या ‘मुख्यमंत्री सौर कृषीपंप’ योजनेला मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत पुढील 3 वर्षाच्या कालावधीत एक लक्ष कृषीपंप आस्थापित करण्यात येतील. पहिल्या टप्प्यात 25 हजार, दुसऱ्या टप्प्यात 50 हजार आणि तिसऱ्या टप्प्यात 25 हजार कृषीपंप आस्थापित करण्यात येणार आहेत. प्रत्येक टप्पा सुरू झाल्यापासून 18 महिन्यात राबविण्यात येईल.
पहिल्या टप्प्यातील 18 हजार 750 नग हे 5 अश्वशक्तीचे व 6 हजार 250 नगर 3 अश्वशक्तीचे
असतील. या टप्प्यात अनुसूचित जातीच्या 2 हजार 953, अनुसूचित जमातीच्या 2 हजार 336 आणि सर्वसाधारण गटातील 19 हजार 711 लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल. त्यासाठी 858 कोटी 75 लक्ष रुपये खर्च होणार आहेत.
सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांकरीता सौर कृषीपंपाच्या केंद्रीय आधारभूत किमतीच्या 10 टक्के तर अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांचा हिस्सा 5 टक्के राहील. योजनेचा लाभ घेण्यासाठी शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध असलेले सर्व शेतकरी पात्र राहतील. मात्र अशा शेतकऱ्यांकडे पारंपरिक पद्धतीने विद्युत जोडणी झालेली नसणे आवश्यक आहे.
पाच एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्तीचे आणि त्यापेक्षा अधिक शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्तीचे
कृषीपंप देय राहतील. पारंपरिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले, अतिदुर्गम भागातील शेतकरी, ज्यांना नजीकच्या काळात विद्युत जोडणी मिळणे शक्य नाही, महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत प्राधान्य राहील.
लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. योजनेच्या गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदरी महावितरणी राहणार आहे. सौर कृषी पंपासाठी पुरवठादाराकडून 5 वर्षे देखभाल दुरुस्तीचा करार करण्यात येणार आहे. सदर शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक क्र. 201811151448539410 आहे.
-----
No comments:
Post a Comment