अहिरे दाम्पत्यासाठी शेततळे ठरले ‘लाख’मोलाचे
नाशिक दि.17-‘जमीन असूनही उत्पन्न नव्हते. शेततळे आले अन् लाखांची कमाई झाली. या भागात टमाटा पीक आमच्यासारखे कोणाच्याच शेतात दिसणार नाही’…. कळवण तालुक्यात निवाने गावातील सकुबाई उत्तम अहिरे आणि उत्तम
अहिरे या शेतकरी जोडप्याची ही उत्स्फुर्त प्रतिक्रीया. ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत शेततळे बांधल्याने त्यांच्या शेताचे अर्थकारणच बदलले आहे.
सकुबाई यांच्याकडे साडेतीन एकर आणि त्यांचे पती उत्तम अहिरे यांचेकडे चार एकर
जमीन आहे. पारंपरिक कांदा, मका,
काही प्रमाणात भाजीपाला असे उत्पादन शेतात घेतले जात असे. बऱ्याचदा दुसऱ्या पिकासाठी पाण्याची कमतरता भासत असे. एप्रिल-मे महिन्यात आलेले उन्हाळी पीकदेखील सोडण्याचे
प्रसंग त्यांच्या नशिबी आले.
शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेची माहिती कृषी सहाय्यक ए.ए.गायकवाड यांच्याकडून मिळताच सकुबाईंनी शेततळ्यासाठी अर्ज केला. त्यांना शेततळ्यासाठी 50 हजार आणि राष्ट्रीय फलोत्पादन
अभियानांतर्गत प्लास्टिक कापडासाठी 75 हजाराचे अनुदान 30 x 30 मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी
मिळाले. शाश्वत सिंचनाचा पर्याय उपलब्ध झाल्याने त्या दिवसापासून
शेतीचे अर्थकारण बदलले आहे.
शेततळे तयार केल्यानंतर अहिरे दाम्पत्याला पहिल्याच वर्षी त्यांनी टमाटा पिकातून
15 लाखापेक्षा अधिक उत्पन्न घेतले. उन्हाळी कांदा
पीक घेणेदेखील त्यांना शक्य झाले. पावसाळ्यात विहिरीच्या पाण्याने
शेततळे भरल्यावर उन्हाळ्यात त्याचा फायदा होतो. नैसर्गिक उताराने
पाणी शेताला जात असल्याने वीजेवर आणि मजूरांवर अवलंबून रहावे लागत नाही याचे सकुबाईंना समाधान आहे.
त्यांना मक्यासाठी स्वयंचलित पेरणीयंत्रासाठी साडेतेरा हजार रुपये अनुदान मिळाले
आहे. रोहयो अंतर्गत गांडुळ खत युनिटही त्यांना मिळाले आहे.
शासनाच्या योजना विश्वासाने
घेतल्या आणि माहिती करून घेतली तर चांगले परिणाम मिळतात अशी प्रतिक्रीया उत्तम अहिरे
यांनी दिली.
----
No comments:
Post a Comment