एक महत्वाकांक्षी ‘उडान’
शिक्षण
सामाजिक परिवर्तनाचे महत्वाचे साधन आहे. शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी भागातील विकासाला
खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे. विशेषत: एकलव्य निवासी विद्यालयाच्या माध्यमातून अनेक
गुणवान आणि यशस्वी विद्यार्थी पुढे येत आहेत. सुरगाणा तालुक्यातील अलंगुण गावच्या मालती
भोये या आदिवासी विद्यार्थीनीने अशीच
महत्वाकांक्षी ‘उडान’ घेतली आहे. केंद्रीय
माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या (सीबीएसई)
‘उडान’ योजने अंतर्गत निवड झाली आहे.
राज्यातून
निवड झालेल्या 24 विद्यार्थींनींपैकी ती एकमात्र आदिवासी
विद्यार्थीनी आहे.
मालती पेठरोड
येथील एकलव्य विद्यालयात बारावीत शिक्षण घेत आहे. या शाळेत
मालती इयत्ता सहावीत दाखल झाली. वडिलांनी कष्टाने
चारही मुलांना शिक्षण दिले. मोठी बहिण बी.ई.
झालेली.
दोन
नंबरची मुलगी कला शाखेतून पदवीधर. तर मुलगा ङिएङ
झाला असून विज्ञान शाखेतील पदवीचे शिक्षण घेत
आहे. ही परंपरा पुढे नेतांना तिसरीपासून बाहेर शिक्षण घेत असलेल्या
मालतीच्या मनात आपणही शिक्षणात मोठे उद्दीष्ट गाठावे अशी इच्छा लहानपणापासूनच रूजली.
तिच्या
या इच्छेला खतपाणी घालण्याचे काम ‘एकलव्य’मधील
शैक्षणिक वातावरणाने केले.
आदिवासी मुलामुलींना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी 2000 मध्ये नाशिक, ठाणे जिल्ह्यातील कांबळगाव, चिखलदरा आणि नागपूर
जिल्ह्यातील खैरीपरसूडा या गावात एकलव्य विद्यालय सुरू करण्यात आले. या शाळांची संख्या आता
चौदा पर्यंत पोहोचली आहे. नाशिकच्या एकलव्य शाळेतून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी
क्षेत्रात शिक्षण घेणारे विद्यार्थी बाहेर पडले आहेत.
|
दहावीला विज्ञान आणि गणित विषयात
90 टक्क्यापेक्षा जास्त गुण असल्याने मालतीने ‘उडान’
योजनेत
निवड होण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरला. देशातील निवडल्या
जाणाऱ्या हजार मुलींमध्ये तिची निवड झाली. महाराष्ट्रातील
नाशिक आणि पुणे केंद्रातून निवडल्या गेलेल्या चोविस मुलींमध्ये ती एकमात्र आदिवासी
मुलगी आहे. या योजनेअंतर्गत गुणवत्तेच्या आधारावर
सर्व संवर्गातील मुलींमधून निवड होत असल्याने या निवडीला विशेष महत्व आहे.
आयआयटीमध्ये मुलींचे प्रमाण वाढावे
आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘उडान’
अंतर्गत
प्रत्येक शनिवार रविवारी या मुलींना रसायनशास्त्र, गणित
आणि भौतिकशास्त्राचे ई-क्लासरूमच्या
माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन केले जाते. नेहरू नगर येथील
केंद्रीय विद्यालयात त्यासाठी वायफाय यंत्रणा, प्रोजेक्टर
आणि स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑगस्ट
2015 पासून मालती या मार्गदर्शन वर्गाच्या सहाय्याने आयआयटीची तयारी करीत
आहे. तीला योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या टॅबच्या साहाय्याने
तिचा अभ्यास सुरू असतो. सोबत मिळालेल्या
32 जीबीच्या दोन मेमरी कार्डमध्ये व्याख्याने, टिपणे,
पुस्तके
आदींचा समावेश आहे.
शाळेतही मालती अभिमानाचा आणि कौतुकाचा
विषय बनली आहे. मार्गदर्शन वर्गातून वसतीगृहात परतल्यानंतर
मुली तिच्याभोवती एकत्र येतात आणि उत्सुकतेनं तिच्याकडून माहिती जाणून घेतात.
शाळेत
सामान्यज्ञान बाबत मार्गदर्शन करतांना ती ‘ताई’ची भूमिका
पार पाडते. गावी गेल्यावर शाळेतील मुलांना टॅबमधील
गमती दाखवतांनाही बऱ्याचदा रमते. आयआयटी पूर्ण
केल्यावर भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याची तिची इच्छा आहे. राजेंद्र
भारूड यांच्या ‘मी एक स्वप्न पाहिले’
या
पुस्तकाने तिला प्रभावीत केले आहे. ‘समाजाची सेवा
करण्यासाठी भव्य दिव्य यश’ हे सूत्र तिने
आतापासूनच मनाशी निश्चित केले आहे.
तिचे वडील रामदास भोयेंनादेखील
मुलींचे कौतूक आहे. ‘यशाचा विचार न करता क्षमतेप्रमाणे प्रयत्न
कर’ ही वडिलांची शिकवणूक लक्षात ठेवीत ती कष्ट करते आहे.
‘पोरगी मोठ्ठी उडान घेईल अन् गावाकडे कौतुक होईल’
हे
आईचे शब्दही तिला सतत प्रेरणा देतात. वसतीगृहातील
अधिक्षिका निलोफर मन्सुरी आणि प्राचार्य अशोक बच्छाव तसेच इतर शिक्षकही तिचे पालक असल्याप्रमाणे
मार्गदर्शन करत असतात. ‘एकलव्य’ने आत्मविश्वास
दिला, असे मालती आवर्जून सांगते.
तिची
ही ‘उडान’ तिला उच्च पदापर्यंत
निश्चित नेईल, असा विश्वास तिच्या बोलण्यातून जाणवतो.
No comments:
Post a Comment