Monday 26 September 2016

कृषी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
नाशिक दि. 26:- कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकरी, संस्था, गट यांना तसेच शेतीविषयक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने महत्वाचे व मोलाचे काम करणाऱ्या व्यक्तींना  पुरस्कार देण्यात येणार आहेत. पात्र शेतकऱ्यांनी आणि संस्थांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका स्तरावर सादर करावे, असे कृषी उपसंचालक (माहिती) कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी कळविले आहे.
अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या मंडळ, तालुका, विभागीय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा www.mahaagri.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. कृषी विभागातील अतिउत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यास पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.  

          डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार कृषी क्षेत्रातील कृषी विस्तार, कृषी प्रक्रिया, निर्यात, उत्पादन, पिक फेरबदल, कृषी उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञाचा वापर यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या एका शेतकरी अथवा संस्थेस देण्यात येतो. 75 हजार रुपयांसह स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विकास, फालोत्त्पादन व ग्रामीण विकास ज्यात बायोगॅसचा वापर, शेतकऱ्यांचा विकास या संलग्न क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या दहा शेतकरी, संस्था, गटांना दिला जातो. 50 हजार रुपयांसह स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

जिजामाता कृषिभूषण पुरस्कार शेती क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव होऊन इतर महिलाही त्यांच्या कार्याने प्रभावित शेतकरी महिलांमध्ये जागृती निर्माण करणाऱ्या 5 महिलांना हा पुरस्कार देण्यात येतो. 50 हजार रुपयांसह स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार ज्या व्यक्ती, संस्था शेती, पत्रकारीतेद्वारे इतर अन्य मार्गाने कृषी क्षेत्रात बहुमोल कामगिरी करणाऱ्या 3 शेतकरी, व्यक्ती अथवा संस्थाना हा पुरस्कार दिला जातो. 30 हजार रुपयांसह स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा वापर, शेती पुरक व्यवसाय, स्वत:च्या कल्पनेने नवनवीन पद्धतीने पिक लागवड व इतर शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या सर्वसाधारण 19 व आदिवासी गटातील 6 शेतकरी अथवा संस्थाना हा पुरस्कार देण्यात येतो. 11 हजार रुपयांसह स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
 पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील, कृषी सेवारत्न पुरस्कार        राज्यातील शेतीविषयक उत्त्पन वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे कार्य करणाऱ्या कृषी विभागातील एक अतिउत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यास स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.


----

No comments:

Post a Comment