Saturday 29 September 2018

रोजगार मेळावा


मेक इन महाराष्ट्र’द्वारे रोजगार निर्मितीला चालना-देवेंद्र फडणवीस

नाशिक,29 : ‘मेक इन महाराष्ट्र’ च्या माध्यमातून राज्यात गेल्या चार वर्षात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणुकीला आकर्षित करण्यात आले असून त्याद्वारे रोजगार निर्मितीलादेखील  चालना देण्यात येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ओझर टाऊनशिप परिसरातील कम्युनिटी हॉल येथे उद्योग विभागतर्फे आयोजित बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार अनिल कदम, देवयानी फरांदे, डॉ.राहुल आहेर, बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, उप महापौर प्रथमेश गिते, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, पोलीस अधिक्षक संजय दराडे आदी उपस्थित होते.

श्री.फडणवीस म्हणाले, उद्योग क्षेत्राला मनुष्यबळ देण्यासाठी तसेच कुशल युवकांना मनुष्यबळाला रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी उद्योग मेळावा सेतूचे काम करतो. त्यामुळे राज्यात उद्योग विभागातर्फे रोजगार मेळाव्याचा चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
बदलत्या काळात कौशल्य विकासाला महत्व प्राप्त झाले आहे. रोजगारासाठी शिक्षणाबरोबर कौशल्य प्राप्त करणे आवश्यक आहे. कौशल्य विकासासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे. राज्याची औद्योगिक प्रगती होत असतना रोजगाराच्या संधीतही वाढ होत आहे.ईपीएफआयच्या सर्वेक्षणानुसार राज्यात गतवर्षी 8  लाख नवे रोजगार निर्माण  झाले. शासन युवकांना संधी उपलब्ध करून देत आहे. त्या संधीच्या लाभ घेत अनुभवाच्या बळावर युवकांनी प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.

नाशिक जिल्ह्याला उद्योग क्षेत्रात प्रगतीची संधी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, नाशिक हा औद्योगिक त्रिकोणातील महत्वाचा जिल्हा आहे. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मुंबई आणि नाशिक जवळ येऊन पुण्याप्रमाणे नाशिकचा औद्योगिक विकास शक्य आहे. हायस्पीड कनेक्टिव्हीटीमुळे नाशिकच्या कृषी आणि औद्योगिक क्षेत्राला लाभ होणार आहे. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढत असून ड्रायपोर्टमुळे जिल्हा मुंबईशी जोडला जाऊन कृषी विकासाला आणखी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी तरुणाला रोजगार देण्यासाठी संघर्ष केला. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून शासनाचे असेच प्रयत्न असल्याचे श्री.फडणवीस म्हणाले.
आमदार कदम म्हणाले, राज्यात रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. राज्य शासनातर्फे त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नाशिकमध्ये रोजगार मेळाव्यासाठी 12 हजार तरुणांनी नोंदणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुक्त कांबळे यांनी प्रास्ताविकात महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, मॅग्नेटिक महाराष्ट्र आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून राज्यात 12 लाख कोटींची गुंतवणूक केली. उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी अनुकूल धोरण राज्यात राबविण्यात येत असून उद्योग क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येत आहेत.
00000

No comments:

Post a Comment