यशाचे उद्दीष्ट समोर ठेवून स्पर्धा परिक्षेची तयारी करा-संजय अपरांती
नाशिक दि.23:- युवकांनी यशाचे उद्दीष्ट समोर ठेवून आणि यशाची खात्री
मनाशी बाळगून स्पर्धा
परिक्षेची तयारी करावी, असे प्रतिपादन माजी पोलीस अधीक्षक डॉ.संजय अपरांती यांनी
केले.
मु.शं.औरंगाबादकर सभागृह येथे आयोजित ‘जिल्हा ग्रंथोत्सव
2017’ अंतर्गत ‘स्पर्धा परिक्षेचे विश्व’ या विषयावरील सत्रात ते बोलत होते. जिल्हा कोषागार अधिकारी विलास
गांगुर्डे आणि जिल्हा नियोजन अधिकारी योगेश चौधरी यांच्या उपस्थितीत दोन दिवस
चाललेल्या ग्रंथोत्सवाचा समारोप झाला. यावेळी
मुक्तांगण संस्था संचालक किरण मोहिते, श्रीकांत बेणी, रामचंद्र काकड, जिल्हा
ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे, सहाय्यक ग्रंथालय संचालक आशिष ढोक आदी उपस्थित होते.
श्री.अपरांती म्हणाले, स्पर्धा परीक्षा
आजच्या काळासाठी खूप महत्वाची असून परिक्षेच्या तयारीसाठी वाचनाची सवय महत्वाची
आहे. विविध विषयांवरील वाचनाने परिक्षेची तयारी होण्याबरोबरच व्यक्तिमत्वाचा
विकासही होत असतो. युवकांनी ज्ञानकक्षा रुंदावण्यासाठी पुस्तकांकडे वळावे, असे
आवाहन त्यांनी केले.
स्पर्धा परिक्षेचे महत्व, तयारीचे टप्पे, व्यक्तिमत्व विकास
आदी विविध पैलूंवर त्यांनी मार्गदर्शन केले.
श्री.मोहिते यांनी व्यक्तिमत्व विकासाचे महत्व आपल्या
व्याख्यानातून मांडले. स्पर्धा परिक्षेच्या मुलाखतीदरम्यान व्यक्तिमत्व आणि
संवादालाही महत्व असल्याचे त्यांनी सांगितले. व्यक्तिमत्व विकासासाठी स्वयंप्रेरणा
महत्वाची असल्याचे ते म्हणाले.
----
No comments:
Post a Comment