Saturday 25 November 2017

शतायुषी संस्था संवाद संमेलन

राज्यात शंभर आंतराष्ट्रीय शाळा सुरु करणार-विनोद तावडे

नाशिक दि.25 :- जागतिक पातळीवर राज्यातील विद्यार्थ्यांची ओळख निर्माण होण्यासाठी राज्यात आंतराष्ट्रीय पद्धतीचे शिक्षण देणाऱ्या 100 आंतराष्ट्रीय शाळा सुरु केल्या जातील, त्यामधील पहिली शाळा नंदुरबार येथे सुरु करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडा, उच्च व तंत्र शिक्षण, अल्पसंख्याक व वक्फबोर्ड, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केले.

          यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ  येथे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 'शतायुषी संस्था संवाद संमेलना'त ते बोलत होते. कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन, संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय काकतकर, कार्याध्यक्ष महेश दाबक, शिक्षणतज्ज्ञ सुमनताई करंदीकर आदी उपस्थित होते.

           श्री.तावडे म्हणाले, शिक्षण व्यवस्थेत बदल स्विकारण्यासाठी मोकळेपणा स्विकारण्याची तयारी ठेवण्याची गरज आहे. शिक्षण क्षेत्रातील विकास व बदलांसाठी वेगळे मार्ग  चोखाळणाऱ्या शिक्षणसंस्थांच्या मागे शासन भक्कमपणे उभे राहिल.

राज्यातील जुन्या व जास्त शाळा असणाऱ्या संस्थांना माध्यमिक शालांत परिक्षा घेण्यासाठी स्वायत्तता देण्याचा विचार असून मुंबई सारख्या महानगरातील नामांकित शाळातील विद्यार्थी व दुर्गम ग्रामिण भागातील विद्यार्थी यांना एकाच पातळीवरील परिक्षा देण्याची यामुळे गरज राहाणार नाही, असे  त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, शाळांमधील बिगर शिक्षक कर्मचाऱ्यांची पदभरतीसाठी विद्यार्थी संख्या हा निकष ठरविण्यात येणार आहे. शिक्षक भरतीसाठी संस्थांना मर्यादित स्वरुपात अधिकार असतील. शासनाने राज्यस्तरावर निवड केलेल्या यादीतील शिक्षकांना मुलाखतीद्वारे ते नियुक्ती देऊ शकतील.
यावेळी शिक्षकांना देण्यात येणारी शाळाबाह्य कामे दिल जाऊ नये असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना विविध प्रसंगांच्या निमित्ताने प्रभात फेऱ्यांच्या माध्यमातून रस्त्यांवर उपक्रमांसाठी सहभागी करण्याचे प्रकार थांबले पाहिजेत, असे श्री.तावडे म्हणाले.

मंत्री महोदयांनी संस्थेच्या दिर्घ वाटचालीचा गौरव करताना सांगितले 100 वर्षे शाळा चालवणे सोपे नाही, त्याहूनही त्या काळात शाळा सुरु करणे देखील अवघड होते. चांगले काम करणाऱ्या या संस्थांतून येणारे नवे विचार स्विकारण्यात येतील, असे शिक्षणमंत्री म्हणाले.
याप्रसंगी श्री. दाबक यांनी प्रास्तविक केले. तसेच डॉ. काकतकर, श्रीमती करंदीकर यांनी शिक्षण क्षेत्रातील बदलत्या परिस्थिती, विद्यार्थ्यांच्या गरजा, पालकांच्या अपेक्षा आदींबाबत विचार व्यक्त केले. यावेळी मंत्रीमहोदयांनी उपस्थितांशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात संवाद साधला.

----

No comments:

Post a Comment