कालिदास कलामंदीरची ओळख देशभरात व्हावी-गिरीष महाजन
नाशिक, 15 : कालिदास कलामंदीरची
सांस्कृतिक केंद्र म्हणून असणारी ओळख
नाट्य, संस्कृती व परंपराच्या रुपाने देशभरात व्हावी, अशी अपेक्षा पालकमंत्री
गिरीष महाजन यांनी व्यक्त केली.
महाकवी कालिदास कलामंदीर व महात्मा फुले
कलादालन लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अखिल भारतील नाट्य परिषदेचे
अध्यक्ष प्रसाद कांबळी, अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा किर्ती शिलेदार,
महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सिमा हिरे, मनपा
आयुक्त तुकाराम मुंडे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल,
उपमहापौर प्रथमेश गिते अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे आदी उपस्थित होते.
श्री. महाजन म्हणाले, शहराची सर्वांगिण विकासाकरिता नाशिक महानगरपलिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून नाशिक शहराची वेगळी ओळख निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात
येत आहेत. कालिदास कलामंदिराचे नवे रुप
राज्यातील कलाकारांना प्रोत्साहन देणार आहे. पंडीत पलुस्कर सभागृहाच्या रुपाने
आणखी एक हक्काचे व्यासपीठ कलाकारांना लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी
सांगितले
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक
विकासकामे करण्यात आली असून उर्वरीत कामे येत्या काळात पुर्ण होणार
असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून नाशिक शहराचे नाव
राष्ट्रीय पातळीवर पोहाचवावे आणि
कलामंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन
त्यांनी केले.
श्री. कांबळी म्हणाले, नाशिक सांस्कृतिक वैभव
जपणाऱ्या कालिदास कलामंदिराने नाट्यसृष्टीत नव्याने वेगळी ओळख निर्माण केली आहे.
दिर्घकाळ सुंदर नाट्यगृह टिकून राहण्यासाठी
प्रत्येकाने वैयक्तिक जबाबदारी स्विकारुन त्याकडे लक्ष दिले पाहिजे. नाट्य
परीषदेच्या अडचणी सोडविण्यास तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती
शिलेदार म्हणाल्या, कुसुमाग्रज यांचे योगदान लाभलेले कालिदास सुंदरतेने नव्या
रुपाने कलागुणांच्या सादीरकणाकरीता मिळाले हा नाशिकच्या जनतेचा गौरव आहे. तांत्रिक
बाबतीत कालिदासचे काम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुक्त मुंडे म्हणाले, स्मार्ट सिटी
योजनेत देशात प्रथम क्रमांकावर येण्याचा शहराचा प्रयत्न आहे. स्मार्ट सिटी
प्रकल्पांतर्गत कालिदास कलामंदिर नुतनीकरणासह महात्मा फुले कला दालन काम पुर्ण
झाल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटनाला चालना देवून नागरिकांचे जीवनमान
उंचावण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी
महापौर भानसी, आमदार फरांदे, नगरसेवक अजय बोरस्ते यांनी मनोगत व्यक्त केले.
श्रीमती भानसी यांनी कलामंदिराच्या
लोकार्पणाच्या निमित्ताने चार दिवस सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात
येईल, अशी माहिती दिली. कार्यक्रमाला नागरिक आणि कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
----
No comments:
Post a Comment