जलयुक्त
शिवार अभियान पत्रकार पुरस्कारासाठी
30
ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नाशिक, दि. 17 : जलयुक्त शिवार अभियानात वृत्तपत्रातून तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे
जलसंधारणाचे महत्त्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणाऱ्या वृत्तपत्र प्रतिनिधींना
शासनातर्फे राज्य, विभाग तसेच जिल्हास्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्कारांसाठी इच्छुक
पत्रकारांनी 30 ऑक्टोबर 2016 पर्यंत आपली प्रवेशिका विहित नमुन्यात तीन प्रतीत जिल्हा समितीकडे सादर करावी, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी नाशिक यांनी केले
आहे.
या संबंधीचा शासन निर्णय ग्रामविकास व जलसंधारण
विभागाने अलिकडेच जाहीर केला आहे. जलयुक्त शिवार अभियानाची त्या-त्या
परिसरातील जनजागृती, अभियानात लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर, पाणलोटाच्या यशोगाथा प्रकाशित करणे, इतर गावांना प्रोत्साहित करुन पाणी प्रश्न सोडविण्यात योगदान देणाऱ्या
पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले
जलमित्र पुरस्कार, विभाग स्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र
पुरस्कार तर जिल्हा स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार या
प्रमाणे हे पत्रकार पुरस्कार देण्यात येणार आहेत.
जलयुक्त
शिवार अभियानाच्या प्रसिद्धीसाठी बातमीदारांनी मोहिमेच्या अंमलबजावणीच्या प्रथम
वर्षी 1 जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2015आणि
त्यापुढे प्रतीवर्षी 1 जानेवारी
ते पुढील वर्षातील 31 डिसेंबर
या कालावधीत प्रसिद्ध केलेले साहित्य पुरस्कार पात्रतेकरीता मुल्यमापनासाठी
ग्राह्य धरण्यात येईल. या कालावधीत वृत्तपत्र व नियतकालिके यामधून प्रसिद्ध झालेले
टिकात्मक लेख, वृत्तांकन, बातम्या, अग्रलेख
व फोटोफिचर अशा साहित्याचा विचार करण्यात येईल.
वृत्तपत्र
बातमीदारांसाठी राज्यस्तर, विभागस्तर
व जिल्हास्तर अशा तीन प्रकारात पुरस्कार देण्यात येतील. राज्यस्तरावर प्रथम
पुरस्कार 50 हजार
रुपये, द्वितीय 35 हजार व
तृतीय 25 हजार, विभाग
स्तरावर प्रथम 30 हजार
रुपये, द्वितीय 20 हजार, तृतीय 15 हजार आणि
जिल्हास्तरावर प्रथम 15हजार
रुपये, द्वितीय 12 हजार तर
तृतीय 10 हजार असे
पुरस्काराचे स्वरुप आहे. इलेक्ट्रॉनिक्स मीडियासाठी राज्यस्तरावर पुरस्कार देण्यात
येईल. यात प्रथम 1 लाख
रुपये, द्वितीय 71 हजार व
तृतीय 51 हजार अशी
रक्कम आहे.
वृत्तपत्रांचे बातमीदार, स्तंभलेखक, मुक्त
पत्रकार या पुरस्कार योजनेस पात्र असतील. मराठी, हिंदी, इंग्रजी
भाषेत प्रसिद्ध केलेल्या साहित्याचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल. उमेदवारास
ज्या स्तरावरील परितोषिकासाठी अर्ज करावयाचा आहे. त्या स्तरावरील समितीच्या सदस्य
सचिवाकडे अर्ज करता येईल. मात्र, कोणत्याही एका परितोषिकासाठी अर्ज करता येईल.
एका वर्तमानपत्राच्या प्रत्येक आवृत्तीच्या एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकामार्फत
स्वीकारण्यात येईल. जिल्हास्तरीय पारितोषिकासाठी संबंधित जिल्हयातून प्रसिद्ध
होणारे वृत्तपत्र व नियतकालीके यामधून प्रसिद्ध झालेले साहित्य विचारात घेण्यात
येईल. पुरस्कारासाठी मागील 5 वर्षाची
कामगिरी, सामाजिक
बांधिलकी व शासनाच्या विकास विषयक जाणीवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न
आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल.
सलग दोन वर्ष एकाच पत्रकारास पुरस्कार प्राप्त झाल्यास तिसऱ्या वर्षी त्यांची
प्रवेशिका स्वीकारली जाणार नाही.
स्पर्धेत भाग घेणाऱ्या पत्रकार स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत
नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. प्रवेशिकेसोबत कोणाचेही
शिफारसपत्र जोडण्याची आवश्यकता नाही. पुरस्कारासाठी पाठवायच्या प्रवेशिकेसोबत मुळ
लिखाणाची कात्रणे त्यांच्या दोन प्रतीसोबत पाठवावी लागतील. स्पर्धेसाठी पाठविलेली
प्रवेशिका त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे निटनेटकी असणे आवश्यक राहील.
अस्ताव्यस्त, खाडाखोड
असणारी किंवा वाचता येणार नाही, अशा प्रवेशिका रद्द समजण्यात येतील. पुरस्कार
पात्रतेसाठीच्या अटी व शर्तींच्या अधिक माहितीसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने 28 सप्टेंबर 2016 रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय पाहावा.
प्रत्येक स्तरावरील पुरस्कारासाठी एकापेक्षा अधिक प्रवेशिका पाठविल्यास त्याचा
विचार केला जाणार नाही. तरी वृत्तपत्र प्रतिनिधींनी 1 जानेवारी
2015 ते 31 डिसेंबर 2015 या
कालावधीतील प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या कात्रणासह आपल्या प्रवेशिका 30 ऑक्टोबर 2016 पूर्वी
पोहोचतील, या बेताने जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी संबंधित जिल्हा माहिती कार्यालय
येथे तसेच विभागीय पुरस्कारांसाठी उपसंचालक (माहिती), विभागीय
माहिती कार्यालय, नाशिक येथे पाठवाव्यात. त्यानंतर प्राप्त
अर्जाचा विचार केला जाणार नाही.
****
No comments:
Post a Comment