पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जलजागृती
आवश्यक-के.भा. कुलकर्णी
नाशिक, दि.22- शहरी व ग्रामीण भागातील पाण्याची समस्या दूर
करण्यासाठी जलजागृती चळवळ उभी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे मुख्य
अभियंता के.भा. कुलकर्णी यांनी केले.
परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे आयोजित
जलजागृती सप्ताह समारोप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलतज्ज्ञ सुनील
कुटे, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, महानगरपालिकेचे शहर अभियंता ए.व्ही.धनाईत,
कार्यकारी अभियंता प्रविण गायकवाड, दिलीप मुसळे, राजेश शिंदे, गिरीष सैंदाणी आदी
उपस्थित होते.
श्री.कुलकर्णी म्हणाले, पाण्याचे महत्व जाणूनही त्याकडे दुर्लक्ष
केल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे पाण्याचा अतिरिक्त वापर टाळणे
गरजेचे आहे. पाण्याची नासाडी टाळण्यासाठी
आवश्यक उपाययोजनेवर भर दिला गेला पाहिजे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत हे
उद्दीष्ट समोर ठेऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
श्री. कुटे यांनी पाणी हा जीवनशैलीचा
भाग असल्याने जलजागृती केवळ सप्ताहापुरती मर्यादीत न राहता याविषयी निरंतर प्रबोधन
करणे गरजेचे आहे, असे सांगितले.
अधिक्षक अभियंता श्री. मोरे यांनी प्रास्तविकात
जलजागृती सप्ताहानिमित्त आयोजित उपक्रमांची माहिती दिली. जलदिनानिमित्त रांगोळी, चित्रकला, आदी विविध स्पर्धांतील विजेत्यांना
मान्यवरांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
तत्पूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे विक्रम
गायकवाड यांनी सहकाऱ्यांसह ‘व्यथा’ या एकांकिकेचा प्रयोग सादर केला. त्यातून शिक्षण, पाणी
,आरोग्य, जलसंवर्धनाचे महत्व मांडण्यात आले. तृप्ती बोरस्ते हिने ‘पाणी प्रश्न आणि मी’ याविषयावर व्याख्यान केले. गिरणा नदी खोरे प्रकल्प यांनी ‘पाण्याला लागली तहान’ हे लघुनाट्य, तर नाना साळवे यांनी वामनदादा कर्डक यांची ‘पाणी वाढ गं माय’ ही कविता सादर केली.
00000
No comments:
Post a Comment