Thursday 12 October 2017

कृषी आढावा बैठक

कृषी ग्रामसभेचा ‘नाशिक पॅटर्न’ संपूर्ण राज्यात राबवणार-सदाभाऊ खोत

          नाशिक दि. 12-  कृषी विभागामार्फत ग्रामीण भागात कृषी ग्राम सभांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य व उपयुक्त असून कृषी ग्रामसभेचा ‘नाशिक पॅटर्न’ संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
          कृषी प्रशिक्षण केंद्रात आयोजित कृषी विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी टी.एन.जगताप , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे आदी उपस्थित होते.

          श्री. खोत म्हणाले, सर्व कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष गावात भेटी देत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्यावर उपाययोजना सुचविण्यात याव्यात. शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्याबाबत त्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
          कृषी निविष्ठा केंद्रात शासनाने प्रमाणित केलेल्या औषधांची यादीप्रमाणे विक्री होत असल्याबाबत कृषी निरीक्षकांनी दुकानांची तपासणी करावी. तसेच या संदर्भात मार्गदर्शनासाठी मेळावे, बैठकांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देशही यावेळी श्री. खोत यांनी दिले.

पाणी पुरवठा योजनांचा आढावा
          महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना आणि मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेबाबत राज्यमंत्री श्री.खोत यांनी जिल्हानिहाय आढावा घेतला. तसेच नोव्हेंबर 2017 पासून जिल्हास्तरीय आढावा बैठकांचे आयोजन करण्यात यावे आणि कामांना गती द्यावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

---

No comments:

Post a Comment