Tuesday 22 May 2018

उन्नत शेती-समृद्ध शेतकरी

‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी पंधरवड्याचे आयोजन
नाशिक, दि. 22 : राज्य शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने 24 मे ते 7 जून हा रोहिणी नक्षत्राचा कालावधी  ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ पंधरवडा म्हणून राबविण्यात येणार असून शासनाच्या योजना गावस्तरावरील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.
मोहिमेत कृषि पुरस्कार प्राप्त तसेच प्रगतशील शेतकरी यांची निवड करून एकदिवसीय कार्यशाळेचे तालुकास्तरावर आयोजन करण्यात येणार आहे. पंधरवड्यात यातील सहभागी प्रतिनिधी आपल्या गावातील शेतकऱ्यांना प्रेरित करण्यासाठी मोहिमेत सहभाग घेतील.  शेतकऱ्यांना प्रमुख पिकांसाठी आधुनिक व अद्ययावत कृषी तंत्रज्ञान, विविध शासकीय योजना, अभियान, उपक्रमांची माहिती व त्यांच्या कार्यपद्धती, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानी पासून शेतकऱ्यांच्या पिकांना विमा संरक्षणाबाबत मार्गदर्शन केले जाईल.
जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, कापसावरील शेंदरी बोंडअळी, सोयाबीनवरील मोझॅक व पिवळा मोझॅक यांच्या एकात्मिक किड व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. एकात्मिक शेती पद्धतीसह बहुवार पीक आंतरपीक पद्धतीचीही माहिती दिली जाणार आहे. उत्पन्नवाढीसाठी कृषीपूरक व्यवसायात पशुपालन, मधुमक्षिका पालन, मत्स्य शेती, रेशीम उद्योग आदीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  
प्रगतीशील शेतकऱ्यांचे नाविन्यपूर्ण कृषि तंत्रज्ञान इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, एम. किसान पोर्टल नोंदणी करुन मोफत एसएमएस सुविधेचा लाभ घेणे, गट समुहांच्या माध्यमातून शेतीमालावर प्राथमिक प्रक्रिया, मूल्यवर्धन व विपणन करण्यासाठी जागृती करण्यात येईल. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये सहभाग वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.
किडनाशके हाताळणी आणि फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येईल. मोहिमेत शासनाचा कृषि विभाग, कृषि विद्यापीठ, कृषि संशोधन केंद्रे, राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँका, पिकनिहाय उत्पादक संघ, कृषि विज्ञान केंद्र, जिल्हा परिषद कृषि विभाग तसेच महसूल, आदिवासी, वन, सहकार, पणन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन इत्यादी विभागांना कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाईल. शेतकरी बांधवांनी पंधरवड्यात आयोजित विविध कार्यक्रम, बैठका, चर्चासत्रे आणि कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन  कृषी आयुक्त यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment