Sunday, 30 July 2017

वातानुकूलित बसपोर्ट भूमीपूजन

नाशिकच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक तालुक्यात एकात्मिक बसपोर्ट
                                                              -देवेंद्र फडणवीस

नाशिक, दि. 30 :-  राज्यातील प्रत्येक तालुक्यात नाशिक येथील मेळा बसस्थानकाच्या धर्तीवर अत्याधुनिक तसेच एकात्मिक बसपोर्ट तयार करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  स्मार्टसिटीचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी नाशिक शहरात एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण शहरात फायबर ऑप्टीकचे जाळे टाकण्यात येणार असून संपूर्ण शहर वायफाय करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) मेळा बसस्थानकाच्या ठिकाणी विमानतळाच्या धर्तीवर उत्तर महाराष्ट्रातील वातानुकूलित बसपोर्ट उभारले जाणार असून या कामाचा भूमीपूजन कार्यक्रम मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री  गिरीश महाजन, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे,  खासदार हेमंत गोडसे आणि हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजनी भानसी, एस.टी.महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., एस.टी. महामंडळाचे कार्यकारी अभियंता अ.वा. भोसले, प्रादेशिक परिवहन अधिकारी यामिनी जोशी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले , एसटीने सामान्य, गरीब, मध्यमवर्गीय माणसांची मोठी सेवा केली आहे. मात्र, त्याच्या गुणवत्तापूर्ण विकासाकडे लक्ष दिले गेले नाही.  प्रवाशांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी शासनाने एसटीमध्ये मोठे फेरबदल झाले. परिवहनमंत्रीच महामंडळाचे अध्यक्ष असतील असा निर्णय झाला. त्यामुळे निर्णय वेगाने होऊ लागले.  नाशिक येथे अत्याधुनिक वातानुकूलित बसपोर्ट उभारणीचा भूमीपूजन समारंभ झाला. याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक तालुक्यात सर्वसुविधायुक्त एकात्मिक बसपोर्ट सुरु करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

सगळ्या बसपोर्टना अत्याधुनिक करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने काम करण्याचा विचार सुरु असल्याचे सांगून श्री. फडणवीस म्हणाले, यापुढील काळात राज्यातील सर्वसामान्यांनाही तितक्याच दर्जेदार सेवा कमी किंमतीत या माध्यमातून देता येतील.
मुंबईतील उपनगरी रेल्वे स्टेशन परिसरात शेतकऱ्यांचा भाजीपाला विकण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याच्या रेल्वेमंत्र्यांच्या निर्णयामुळे राज्यातील आणि विशेषत: नाशिकमधील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे सांगितले.

नाशिक शहराच्या विकासाचा उल्लेख करुन मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, हे शहर मी दत्तक घेतले आहे.  नाशिक शहर स्मार्ट सिटी करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाधारित व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.  फायबर ऑप्टीकच्या जाळ्याच्या माध्यमातून आणि एकात्मिक सीसीटीवी प्रकल्पाच्या माध्यमातून शहराचे वाहतूक व्यवस्थापन तसेच सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घेणे सोपे होणार आहे, असे त्यांनी सांगितल

नाशिक शहरातील गोदावरी नदीच्या पूररेषेचा प्रश्न निकाली काढण्याचं काम लवकरच केले जाईल, असे श्री. फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.  नाशिक जिल्ह्यातून जात असलेला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग  नाशिकसाठी फायद्याचा असल्याचे ते म्हणाले.  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिकला ड्रायपोर्ट उभारणी करण्याचे घोषित केले आहे. त्यामुळे येथील शेतमालाचे कंटेनर मुंबईला जलदगतीने जाऊ शकतील. त्याशिवाय मुंबई- नाशिक हा प्रवासही कमी कालावधीत शक्य होणार असल्याचे ते म्हणाले.

रेल्वेमंत्री प्रभु म्हणाले, नाशिक मधील विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाच्या सहकार्याने रेल्वेशी संबंधित प्रकल्पांना मंजूरी देऊन ते तातडीने पूर्ण केले जातील. यामुळे विविध मार्गाने कोट्यावधींचे चलन येथे येईल. पुणे-नाशिक रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण केला जाईल. नाशिक मध्ये रेल्वेच्या उत्पादनांसाठी कारखाना उभारण्यात येईल, ज्यामुळे इथल्या पूरक उद्योगाला देखील फायदा मिळेल व रोजगार निर्मिती होईल. केंद्र सरकार मुंबईमधील 36 उपनगरी स्थानके आधुनिक पध्दतीने विकसीत करण्यात असून तेथे प्रवाश्यांच्या उपयोगी अनेक सुविधा दिल्या जातील. यामध्ये शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला थेट विक्रीची सुविधा करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये येथून सर्वात जास्त भाजीपाला जात असल्याने जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना यामुळे संधी निर्माण होऊन मोठे उत्पन्न मिळेल, असे श्री प्रभु म्हणाले.
ते म्हणाले, रेल्वेच्या विकासात साडे आठ लाख कोटीं रुपयांपेक्षा मोठी गुंतवणूक करण्यात येत असून देशभरातील 100 रेल्वेस्थानकांना अत्याधुनिक स्वरुप दिले जाणार आहे. अनेक प्रकल्पांना अंतिम स्वरुप दिले असून यामुळे नाशिक येथील रेल्वे वाहतूक वाढून त्याचा फायदा मिळेल. या पार्श्वभूमीवर येथे होणारे नवीन बसपोर्ट हे शहरासाठी महत्वाचे ठरेल, असे रेल्वेमंत्री म्हणाले.
परिवहनमंत्री श्री. रावते यांनी राज्यात अशा प्रकारचे  15 ठिकाणी वातानुकूलित बसपोर्ट तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रत्येक ठिकाणची बसस्थानके ही आधुनिक पद्धतीची असावीत, यासाठी महामंडळाने स्वता 60 आर्किटेक्टची नियुक्ती केली. बीओटी तत्वाद्वारे बसस्थानके उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने रद्द केला असून यापुढील काळात अत्याधुनिक बसस्थानके उभारण्याची राज्य शासनाने क्षमता निर्माण केल्याचे ते म्हणाले. खासगी वाहतूकदारांच्या स्पर्धेत आता एसटी महामंडळही उतरले असून कमी किंमतील अधिक चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न असून येत्या 3 महिन्यात दीड हजार लांब पल्ल्याच्या शिवशाही बसेस सुरु होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी या बसस्थानकासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि परिवहनमंत्री रावते यांनी केलेल्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख केला. खासदार गोडसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमावेळी नाशिक होमगार्डच्यावतीने शेतकरी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत एक दिवसाच्या वेतनाचा धनादेश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
शहरातील सर्वाधीक गर्दीच्या ठिकाणी असणाऱ्या या मेळा बसस्थानकाचा विमानतळाच्या धर्तीवर वातानुकूलित आणि सर्वसुविधायुक्त बसस्थानक उभारण्यासाठी 14 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.  याठिकाणी 55 हजार स्क्वेअर फुटाचे  20 बसेसचे प्लॅटफॉर्म  असलेला सर्वांत मोठा बस थांबा याठिकाणी उभारण्यात येणार आहे. यामध्ये नऊ हजार फुटांचे बेसमेंट पार्किंग, प्रवाशांसाठी बाहेर पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था, बसस्थानकातील पहिल्या मजल्यावर मिनी थिएटर, 20 गाळे आदी सुविधा असणार आहेत. तसेच प्रवाशांसाठी शॉपिंगची व्यवस्था, वाहक आणि चालकांसाठी निवारा कक्ष, अद्यावत सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही आदी सोईसुविधा असणार आहेत.

                                                  ****

No comments:

Post a Comment