Wednesday, 20 July 2016

लोकसहभागातून जलसंवर्धन
सिन्नर तालुक्यातील कोनांबे गावात खाजगी संस्था आणि बाजार समितीच्या माध्यमातून देव नदीवरील लघुपाटबंधारे प्रकल्पातील गाळ काढण्याचे काम झाल्याने नऊ गाव योजनेबरोबरच शेतीसाठी कालव्यानेदेखील पाणी देणे शक्य होणार आहे.
थोरल्या बाजीराव पेशव्यांचे आजोळ असलेल्या कोनांबेला इथल्या निसर्ग सौंदर्यामुळे मिनी कोकणही म्हटले जाते. गावाच्या बाजूला टेकड्यांवर पवनऊर्जेचे टॉवर्स उभे असलेले दिसतात. देवनदी या भागाची जीवनवाहिनी आहे. मात्र गतवर्षी नदीचे पात्र एप्रिलमध्येच कोरडे पडल्याने गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागला.
जलयुक्त शिवार अभियानाबाबत गावात बरीच जागृती झाली आहे. मात्र निकषाप्रमाणे गावात योजने अंतर्गत काम करता येत नसल्याने सरपंच संजय डावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी लोकसहभागातून नदीवर असलेल्या लघुपाटबंधारे प्रकल्पातील गाळ काढण्याचा निर्णय घेतला.

सुदर्शन रेलीफंडमार्फत तीन पोकलँड यंत्र आणि गाळ वाहून नेण्यासाठी डंपरची व्यवस्था करण्यात आली. शेतकऱ्यांनीदेखील आपले ट्रॅक्टर गाळ वाहण्यासाठी दिले. कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत डिझेलसाठी एक लाख रुपये देण्यात आले. 25 एकर क्षेत्रातील एकूण 90 हजार क्युबीक मीटर गाळ काढण्यात आला. तीन वेगवेगळ्या ठिकाणी हे काम महिनाभर सुरू होते.
गाळ काढण्यामुळे 9 कोटी लिटर्स पाण्याची जास्त क्षमता निर्माण झाली आहे. देव नदी ही 70 गावातून जाते. पाणी जिरण्यामुळे नदी अधिक काळ वाहती राहण्यासही मदत होणार आहे. पूर्वी पाऊस पडल्यानंतर विहिरीत पाणी येण्यास आठ ते दहा दिवस लागायचे. आता पहिल्या पावसातच विहिरींची पाणी पातळी वाढली आहे.
संजय डावरे, सरपंच- गाळ काढण्यामुळे पाणीसाठा वाढून 500 हेक्टर शेतीला त्याचा फायदा होणार आहे. पाणी जमिनीत मुरल्याने वहिरींना उन्हाळ्यातही पाणी राहील. या प्रकल्पावरील 9 गाव योजनेलाही त्याचा लाभ मिळेल.
बाळासाहेब डावरे, शेतकरी- आमचं मिनी कोकण बहरण्यास अधिक मदत होणार आहे. धरणाच्या बाजूला शेती असल्याने उन्हाळ्यातही पाण्याचा फायदा होईल. ग्रामस्थ एकत्रित आल्याने हे चांगले काम झाले.

जलयुक्त शिवार योजनेमुळे असे अनेक ठिकाणी लोकसहभागातून कामे होत आहेत. कोनांबेच्या ग्रामस्थांनी केलेले काम त्यासाठी निश्चितपणे प्रेरक ठरेल.       

No comments:

Post a Comment