Friday, 2 June 2017

लोकसहभागातून ‘गाळमुक्त धरण’

लोकसहभागातून ‘गाळमुक्त धरण’


जिल्ह्यात पाणी टंचाई असणाऱ्या तालुक्यांमध्ये लोकसहभागातून  ‘गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार’ योजना राबविण्यात येत असून योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत विविध प्रकल्पातून  सहा लाख 78 हजार घनमीटर गाळ  काढण्यात आला आहे.
महाराष्ट्र दिनापासून योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील लघु पाटबंधारे तलाव, साठवण तलाव, गाव तलाव, पाझर तलावातील गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात येत आहे. त्यासाठी लोकसहभाग घेण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी गाळ वाहण्यासाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले आहेत.

गाळ काढण्याची 207 कामे सुरु करण्यात आली आहेत. त्यातील 65 कामे शासकीय यंत्रणेमार्फत तर 142 कामे लोकसहभागातून करण्यात येत आहेत.
 शासकीय यंत्रणेमार्फत एक लाख 53 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. त्यासाठी शासनाने यंत्रासाठी केवळ इंधनाचा खर्च केला. तर लोकसहभागातून 5 लाख 25 हजार घनमीटर गाळ संपर्णूपणे लोकसहभागातून काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी यासाठी उत्स्फुर्तपणे सहभाग दिला आहे.  गाळ काढण्यासाठी 196 जेसीबी यंत्रांचा उपयोग करण्यात येत असून त्यासाठी औद्योगिक  आणि सेवाभावी संस्थांचे सहकार्य मिळाले आहे.  सर्वाधिक काम सिन्नर, येवला, नांदगाव, चांदवड, दिंडोरी या तालुक्यात झाले आहे.

गाळ काढून 9 हजार 769 मीटर क्षेत्रात रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यात आले आहे. गाळ काढण्यात आलेल्या जमिनीचे एकूण क्षेत्र 482 हेक्टर आहे. त्यापैकी सर्वाधिक 108 हेक्टर क्षेत्र चांदवड तालुक्यातील आहे. गाळ काढण्याच्या कामाची एकूण किंमत 2 कोटी 39 लक्ष असून त्यातील 1 कोटी 95 लक्ष किमतीची कामे लोकसहभागातून करण्यात आली आहेत.
काढण्यात आलेला गाळ शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. आतापर्यंत दीड हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. एकूण 59 कामे पुर्ण झाली आहेत. या कामांमुळे धरणांमधील पाणीसाठा वाढून शेताची सुपीकता वाढण्यास मदत होणार आहे. काही भागातील पाणीटंचाईवरही यामुळे मात करता येणार आहे.
पेठ तालुक्यात इनामबारी येथील ल.पा.तलाव आणि कोटंबी येथील गावतळ्यातील गाव शंभर टक्के लोकसहभागातून काढण्यात आला. विशेषत: येथे आतापर्यंत लोकसहभाग फार कमी होता. मात्र ग्रामस्थांना कामाचे चांगले परिणाम दिसू लागल्याने लोकसहभाग वाढत आहे.

-----

Thursday, 1 June 2017

चार कोटी वृक्ष लागवड

'वनयुक्त शिवार'साठी शास्त्रशुद्ध नियोजन करा- सुधीर मुनगंटीवार

नाशिक दि. 01 -  'वनयुक्त शिवार' करण्यासाठी शासनाने यावर्षी 4 कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला असून  वृक्षरोपणासाठी शास्त्रशुद्ध नियोजन करावे, असे आवाहन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
शासनातर्फे 1 ते 7 जुलै या कालावधीत 4 कोटी वृक्ष लागवड संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात  आयोजित विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी वनविभागाचे सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त महेश झगडे, नाशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामराव,अतिरिक्त प्रधान वनसंरक्षक प्रविण श्रीवास्तव,  अपर आयुक्त ज्योतिबा पाटील आदी उपस्थित होते.

श्री मुनगंटीवार म्हणाले, ग्रामपंचायतींना वृक्षरोपणाचा लाभ व्हावा यासाठी 156 प्रकारच्या प्रजातींची  माहिती त्यांना देण्यात आली आहे आणि रोपेदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत 3 कोटी 18 लक्ष वृक्ष लागवडीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी वसुंधरा रक्षणाचे कार्य म्हणून या उपक्रमाकडे पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, वृक्षारोपण उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाची भावना जनतेच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. वृक्ष तोडणाऱ्या हातांपेक्षा वृक्ष लावणारे हात वाढवायचे आहेत. मानवी अस्तित्वासाठी वसुंधरेचे शोषण थांबविण्याची  अत्यंत गरज असून  त्यासाठी वृक्षवेड्या नागरिकांची  संख्या वाढविण्याची गरज आहे. वनाकडे केवळ पर्यावरण  रक्षणाच्या दृष्टीने  न पहाता  रोजगार आणि उत्पन्नाचे साधन म्हणून देखील  पहावयास हवे,  असे मत त्यांनी व्यक्त केले.


वनविभागाने 448 पुस्तिकांच्या माध्यमातून वनाचे महत्व जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले आहे. 80 प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून  वनसंवर्धन आणि संरक्षण करण्यात येत आहे. शासनाच्या या प्रयत्नात नागरिक  आणि सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावे आणि कल्पकतेने उपक्रमाचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
'फॉरेस्ट' या शब्दातच फुड, ऑक्सिजन, रेन, एनर्जी, सॉईल आणि टिक असे जीवनाशी  संबधीत सर्व घटक समाविष्ट असल्याने पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर वनाचे महत्व ओळखण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त कले. पुढील वर्षी 1 जुलैपर्यंत हरितसेनेच्या माध्यामातून वृक्षारोपणात सहभाग घेणाऱ्या एक कोटी स्वयंसेवकांची नोंदणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

श्री. खारगे म्हणाले, एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्रावर वन आवश्यक आहे. राज्यात हे प्रमाण 20 टक्के आहे. पर्यावरण संतुलनासाठी हे प्रमाण वाढणे आवश्यक असून सर्व घटकांना यात सहभागी करून घेतल्यास ते शक्य होईल. म्हणूनच शासनाने या कामाला  जनआंदोलनाचे स्वरूप देवून 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी 2 कोटीचे उद्दीष्ट असतांना 2 कोटी 82 लक्ष वृक्षलागवड करण्यात आली. या कार्यक्रमाद्वारे चांगली वातवरण निर्मिती झाल्याने यावर्षी 4 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. अधिक वृक्षलागवडीसाठीलँन्ड बँकतयार करण्याचा विविध यंत्रणांनी प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त झगडे म्हणाले, गतवर्षी विभागात उद्दीष्टापेक्षा जास्त वृक्ष लावण्यात आले आहेत. यावर्षीदेखील अशाच प्रकारची कामगिरी सर्व विभाग करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वृक्षाच्या उपयुक्त प्रकारांची लागवड, वृक्षारोपणाचा पर्यावरणावर होणाऱ्या बदलांचा अभ्यास आणि नागरिकांसाठी हा प्राधान्याचा उपक्रम व्हावा यासाठी प्रयत्न अशा विविध स्तरावर या उपक्रमाचा विचार करण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली.
प्रास्ताविकात रामराव यांनी नाशिक विभागाचे उद्दीष्ट 76 लाख वृक्ष लागवडीचे असतांना एक कोटीपेक्षा जास्त लागवड करण्यात येणार असल्याचे सांगितले. आतापर्यंत 79 लाख खड्डे खोदण्यात आले आहे. विभागातील 340 रोपवाटीकांमध्ये 4 कोटी 22 लक्ष रोपे उपलब्ध आहेत. हरितसेनेच्या माध्यमातून वृक्षारोपणला चालना देण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी विभागातील जिल्हाधिकारी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमासाठी केलेल्या तयारीची माहिती दिली . गतवर्षी राज्यात सर्वाधिक वृक्षलागवड  नाशिक जिल्ह्यात 29 लक्ष 29 हजार एवढी झाली असून बहुतांशी झाडे जगविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी दिली. उद्योग संस्थांच्या सहाय्याने मोकळ्या डोंगरांवर वृक्षारोपण करण्यात येणार  असल्याचे ते म्हणाले.

वनमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्याने तयार केलेल्या वृक्षलागवड कार्यक्रम पुस्तिकेचे आणि नाशिक जिल्हा वन विभागाने केलेल्या वृक्षारोपण नियेाजन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
बैठकीला जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षा उल्वला पाटील, आमदार सुरेश भोये, उदयसिंह पाडवी, राजाभाऊ वाजे, डॉ.राहुल आहेर, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यात वनाचे  आच्छादन वाढविण्यासाठी सन 2016 च्या पावसाळ्यात दिनांक 1 जुलै  2016 रोजी वनविभाग, ग्रामपंचायत, इतर शासकीय यंत्रणा, अशासकीय संस्था व सर्व नागरिकांच्या माध्यमातून वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करून 2 कोटी 82 लक्ष वृक्ष लागवड एकाच दिवशी करण्यात आली होती. त्यापैकी नाशिक महसूल विभागात एकूण 80 लक्ष 28 हजार रोपे लागवड करण्यात आली होती. वनविभागामार्फत लागवड करण्यात आलेल्या 67 लक्ष 42 हजार रोपांपैकी  90 टक्के हून अधिक जिवंत रोपांची टक्केवारी आहे. तसेच ग्रामपंचायत व इतर शासकीय यंत्रणेमार्फत लागवड करण्यात आलेल्या 12 लक्ष 86 हजार रोपांपैकी 75 टक्के हून अधिक जिवंत रोपांची टक्केवारी आहे.
यापुढील 3 वर्षात सन 2017, 2018 व 2019 या पावसाळ्यात एकूण 50 कोटी वृक्षलागवड करण्याचे महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने नियोजन केले आहे. यामध्ये सन 2017 च्या पावसाळ्यात 4 कोटी,  सन 2018 च्या पावसाळ्यात 13 कोटी व सन 2019 च्या पावसाळ्यात 33 कोटी असे एकूण 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन केलेले आहे. एकूण 50 कोटीपैकी 28 कोटी 50 लक्ष वनविभागामार्फत, 12 कोटी ग्रामपंचायतमार्फत व 9 कोटी 50  लक्ष इतर शासकीय यंत्रणेमार्फत वृक्ष लागवड करण्याचे ठरविले आहे.
सन 2017 च्या पावसाळ्यात दिनांक 1 जुलै ते 7 जुलै 2017 पर्यंत महाराष्ट्र राज्यात करावयाच्या एकूण 4 कोटी वृक्ष लागवडीपैकी नाशिक महसूल विभागातील एकूण 5 जिल्ह्यात  80 लक्ष 34 हजार  वनविभागामार्फत, 19 लक्ष 16 हजार  ग्रामपंचायतमार्फत व 9 लक्ष 50 हजार  इतर शासकीय यंत्रणेमार्फत असे एकूण एक  कोटी 9 लक्ष  वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
रोपे लागवडीसाठी एकूण 16 हजार 41 स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने 94 लक्ष  खड्डे खोदून तयार आहेत व उर्वरित खड्डे खोदण्याचे काम प्रगती पथावर आहे.

-----

Wednesday, 31 May 2017

नाशिक जिल्ह्याचा गौरव

‘लाख’मोलाची कामगिरी

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संपन्न झालेल्या ‘दरवाजा बंद माध्यम अभियाना'च्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षभरात एक लाखापेक्षा अधिक शौचालय बांधल्याबद्दल  नाशिक जिल्ह्याचा गौरव करण्यात आला.
 या सोहळ्याला केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नरेंद्रसिंह तोमर, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर, राज्याचे पाणीपुरवठा सचिव राजेशकुमार आदी उपस्थित होते.
'स्वच्छ भारत' अभियानात जिल्ह्याने भरीव कामगिरी केली  आहे. ग्रामीण भागात एकूण 3 लाख 36 हजार 998 शौचालय बांधण्याचे उद्दीष्ट असून आतापर्यंत एक लाख 76 हजार 937  शौचालय बांधण्यात आली आहेत.  एकूण 1368 पैकी 808 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. यापैकी 508 ग्रामपंचायती याच वर्षात हागणदारीमुक्त झाल्या आहेत.
वर्षभरात जिल्ह्यात एक लाख 4 हजार 319 शौचालये बांधण्यात आलीत.  2016-17 या वर्षात सर्वाधिक शौचालय बांधण्यात पुण्यानंतर नाशिक जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आहे. जिल्ह्यातील देवळा, कळवण आणि नाशिक हे तीन तालुकेदेखील हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
शौचालय बांधकामाचे सुक्ष्म नियोजन, प्रभावी संनियंत्रण, ग्रामस्थांशी थेट संवाद,  लोकसहभाग आणि अभियानातील सांघिक भावना ही या यशामागची मुख्य कारणे आहेत. सुक्ष्म नियोजनांतर्गत प्रत्येक आठवड्यात आढावा बैठक घेण्याबरोबरच सोशल मिडियाचा दैनंदिन कामकाजात प्रभावी वापर करण्यात आला. तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर  आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुड मॉर्निंग पथक, टमरेल मुक्त गाव अभियानात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यानी उत्स्फुर्त सहभाग घेतला.
 टमरेल मुक्त गाव अभियान विशेष प्रभावी ठरले. या अभियानांतर्गत पहाटेच्यावेळी गावात फिरून बाहेर टांगलेले टमरेल तसेच बाहेर शौचालयास जाणाऱ्या ग्रामस्थांचे टमरेल जप्त करण्यात आले. या टमरेलांची गावातून फेरी काढण्यात येऊन ग्रामस्थांना शौचालय बांधण्याचे आवाहन करण्यात आले. ही बाब ग्रामस्थांना शरमेची वाटू लागल्याने चांगली जनजागृती होण्यास मदत मिळाली.
कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी आयोजित गवंडी प्रशिक्षणामुळे गावात रोजगारही उपलब्ध झाला. श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता चळवळीला गती देण्यात आली. स्वत: अधिकारी-कर्मचारी श्रमदानात सहभागी झाले. अनेक ठिकाणी महिलांनी पुढाकार घेऊन गाव हागणदारीमुक्त केले.
जिल्ह्याची वाटचाल आता संपुर्ण हागणदारीमुक्तीकडे सुरू आहे. उर्वरीत 560 ग्रामपंचायतीतील एक लाख 55 हजार 915 शौचालय बांधण्यासाठी जिल्हा परिषदेने नियोजन केले आहे. प्रत्येक महिन्यात किमान दोन तालुके हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येणर आहे. फेब्रुवारी 2018 अखरे संपुर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुरस्कार स्विकारला. सामुहिक कामगिरीच्या बळावर जिल्ह्याचा हा गौरव जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. 'स्वच्छ भारत ' अभियानातील जिल्ह्याची ही कामगिरी कौतुकास्पद अशीच आहे. यात सातत्य ठेवीत हागणदारीमुक्तीचे उद्दीष्ट नागरिकांच्या सहकार्याने निश्चितपणे पुर्ण केले जाईल यात शंका नाही.

-----

Tuesday, 30 May 2017

‘मेक इन नाशिक’

मेक इन नाशिकचा ब्रँड विकसित करु- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





मुंबई, दि. 30 : नाशिकमधील कृषी प्रक्रिया उद्योग व अन्य उद्योगांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात येतील.मेक इन महाराष्ट्रच्या बरोबर मेक इन नाशिकचा ब्रँड विकसित करु अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

‘निमा’ (नाशिक औद्योगिक आणि उत्पादक असोसिएशन) संस्थेतर्फेवरळी येथील नेहरु सेंटरमध्ये आयोजित केलेल्या मेक इन नाशिककार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार श्रीमती देवयानी फंरादे, सीमा हिरे, महापौर श्रीमती रंजना भानसी, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सिंघल, निमाचे अध्यक्ष हरीशंकर बॅनर्जी, नाशिकचे जिल्हाधिकारी बी.राधाकृष्णन आदी यावेळी उपस्थित होते.

श्री.फडणवीस म्हणाले की, नाशिकमध्ये कृषी प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. या उद्योगाला आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा देण्यात येतील.यातूनच शेतकऱ्यांच्या विकासाला चालना मिळेल. नाशिक शहर व नाशिक जिल्ह्यामध्ये पर्यटन व्यवसायालाही खुप मोठी संधी आहे. पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक असणारी सर्व मदत दिली जाईल. मुंबई-पुणे नंतर नाशिकमध्ये उद्योग गुंतवणूकीला खूप मोठी संधी आहे. नाशिकला मोठे उद्योग प्रकल्प मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील. नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गामुळे नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. मालेगाव येथे औद्योगिक विकास होण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला लवकरच जागा उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

देशातील थेट परकीय गुंतवणुकीपैकी 50 टक्के गुंतवणुक ही महाराष्ट्रात होते. परकीय गुंतवणुकीमध्ये देशात राज्य प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्र हे देशाचे पॉवर इंजिन आहे. जगातील सर्वात तरुण लोकसंख्या भारतात आहे. या तरुणाईच्या कौशल्याच्या बळावर मेक इन इंडिया ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना यशस्वी करु, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
‘निमा’ने आयोजित केलेल्या मेक इन नाशिकच्या दोन दिवसाच्या चर्चासत्रातून नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी जे जे मुद्दे येतील त्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन ‘मेक इन नाशिक’च्या यशस्वीततेसाठी प्रयत्न करु, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
००००



Sunday, 28 May 2017

नाशिक महानगरपालिका बैठक

विकास प्रक्रीयेला गती देण्यासाठी महापालीकेने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा
                                                                                                    - मुख्यमंत्री


नाशिक, दि. 28शहरातील विकास प्रक्रीयेला गती देण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा,  असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
          नाशिक महानगरपालिकेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, संभाजी मोरुसकर, लक्ष्मण सावजी,  आदी उपस्थित होते.

          मुख्यमंत्री म्हणाले, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पिण्याचे पाणी आणि सार्वजनिक वाहतूक या चार मूलभूत बाबींवर महापालिकेने लक्ष केंद्रीत करावे. ओला आणि सुक्या कचऱ्याचे विलगीकरण आणि त्यावर प्रक्रीया करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या संदर्भात विद्यामान क्षमता वाढविण्याचा महापालिकेने प्रयत्न करावा.
 सार्वजनिक वाहतूकीसाठी सल्लागार संस्थेची नेमणूक करून ‘ॲपबेस’ बससेवा सुरू करण्याचा विचार करावा. त्यासाठी आवश्यक असल्यास शासनातर्फे जमीन विनामूल्य देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात शहर बससेवा सुरळीत झाल्यावर दुसऱ्या टप्प्यात मेट्रोचा विचार करता येईल, असे त्यांनी सांगितले.

          शहराच्या विकासासाठी सर्व सहकार्य करण्याची ग्वाही देताना श्री.फडणवीस म्हणाले, महापालिकेचे अस्तित्वात असलेले उत्पन्नाचे स्त्रोत आणि वाढविता येण्यासारखे स्त्रोत वगळता विकासाचे नियोजन करण्यासाठी कमी पडणाऱ्या निधीसाठी सर्व सहकार्य करण्यात येईल. महापालिकेची तांत्रिक पदे भरण्यासाठीदेखील सहकार्य करण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.
          मुख्यमंत्री म्हणाले, गोदावरी संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी तज्ज्ञ संस्थांची मदत घेण्यात यावी. महापालिकेला विकासावर अधिक खर्च करणे शक्य व्हावे यासाठी आऊटसोर्सिंग आणि तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे कार्यक्षमता वाढविण्याचा प्रयत्न करावा.  महापालिकेने  माहिती तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग सुरू केला असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शहर विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे, राज्य शासनाशी संबधीत विषयांच्या बाबतीत महापालिकेस सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
          यावेळी आयुक्त कृष्णा यांनी सादरीकरणाद्वारे शहरातील विकास योजना आणि समस्यांची माहिती दिली.

----

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ शतक महोत्सव

शाश्वत विकासासाठी ज्ञानाधारीत समाजरचनेची गरज-   देवेंद्र फडणवीस             


नाशिक दि.28 –शाश्वत विकासासाठी सर्वांना समानता देणाऱ्या आणि सर्व प्रकारच्या भेदभावाला बाजूला सारणाऱ्या ज्ञानाधारीत समाजरचनेची गरज आहे, , असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नाशिक शिक्षण  प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संस्थेच्या धामणकर सभागृहाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय काकतकर, संस्थेचे कार्याध्यक्ष महेश दाभक, विनायक गोविलकर, देणगीदार गंगूताई धामणकर आणि सिंधूताई धामणकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 21 व्या शतकामध्ये पैसा नव्हे तर गुणवत्ता ही संपत्ती ठरेल. शिक्षणात सर्वसमावेशकता आहे. समाज घडवणारी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न शिक्षणाच्या माध्यमातून होत असतो. त्यामुळेच शिक्षणाला गुणवत्तेकडे नेण्याची गरज असून हे काम शासन, शिक्षण संस्था, शिक्षक आणि पालकांचे आहे.
शिक्षणाबाबत पूर्वी राज्याचा देशात पंधरावा क्रमांक होता, पण सरकारने प्रगत शिक्षण अभियानाची अंमलबजावणी केली. 40 हजार शाळा उन्नत केल्या. याद्वारे राज्य तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. शैक्षणिक सुधारणांच्या या प्रयत्नांमुळे राज्य लवकरच देशात पहिल्या क्रमांकावर जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज ही गरज असून येथून पुढे भव्यतेपेक्षा आवश्यकता, नीटनेटकेपणा यांना महत्वाचे ठरणार आहे. ‘मोबाईल फोन’ हा या बदलाचा निदर्शक असून आपल्या हातामध्ये आपले ऑफिस, बँक, स्टोअर सामावले गेले आहे.  तंत्रज्ञानाचा अशा उपयोगामुळे विकासाचा मार्ग अधिक विस्तारणार आहे.

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील 44 हजार शिक्षकांनी टेक्नोसॅव्ही होत, तंत्रज्ञानाचे दूत होण्याची घोषणा केली आहे ही महत्वाची घटना आहे. ज्ञानाची सर्वांसाठी दारे उघडी होण्यासाठी ज्ञान-युगात तंत्रज्ञानाचे योगदान आहे. या माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करुन जगभरातील ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम महाविद्यालये, शाळा व शैक्षणिक संस्थांनी करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वाटचालीतील आव्हाने पेलताना शिक्षणाच्या या वटवृक्षाखाली अनेक विद्यार्थ्यांनी ज्ञान घेतले आहे, अभिमान वाटावा असे असंख्य नामवंत विद्यार्थी निर्माण झाले आहेत. हे गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचा चांगले काम झाले आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 100 वर्षे पूर्ण करणारी ही संस्था इतर शिक्षण संस्थांच्या मार्गदर्शकाची भूमिका निभावेल. शतक महोत्सवी वर्षांत संस्थेने ज्ञान, विचार व संकल्पनांची देवाण घेवाण करणारे संमेलन आयोजित करुन चांगले कार्य हाती घेतले आहे. संस्थेने विद्यार्थ्यांच्या 1 कोटी सुर्य नमस्कारांचा उपक्रम हा ‘प्रिव्हेंटीव्ह मेडीसीन’चा उत्तम मार्ग आहे.  सुर्याच्या उर्जेचा हा स्त्रोत तरुणांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
समाजव्यवस्थेच्या संवर्धनामध्ये विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या व्यक्तींनी आपण समाजाला काय देऊ शकतो हे विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करताना त्यांनी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाला एक कोटी रुपये दान करुन धामणकर भगिनींनी दातृत्वाचे मोठे उदाहरण उभे केले आहे, असे श्री.फडणवीस म्हणाले .

पालकमंत्री महाजन म्हणाले, नाशिक हे विविध शिक्षणाचे हब असून येथे अनेक चांगल्या संस्था आहेत. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने सर्वच क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या विद्यार्थीं  घडवले यामुळे संस्थेचा नावलौकिक वाढतो आहे. ही संस्था अनेकांच्या ध्येय व त्यागातून उभी राहीली आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देणगीदार धामणकर भगिनींचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वाटचालीची माहिती देणाऱ्या प्रदर्शनीची त्यांनी पाहणी केली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. काकतकर आणि कार्याध्यक्ष दाभक यांनी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याची व उपक्रमांची माहिती दिली. कुसुमाग्रज, दत्ता भट, डॉ गिरीष ओक, शरद जोशी यासारख्या असंख्य नामवंतांनी संस्थेमध्ये शिक्षण घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
000000

स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मोत्सव

स्वा.सावरकरांना अभिप्रेत समाजविचार जपण्याचा प्रयत्न करु या
-        देवेंद्र फडणवीस

नाशिक दि.28- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समाजातील जातीभेद, विषमता याबरोरच समाजातील  अनिष्ट रुढी, परंपरा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. समाजातील या विषमता दूर करुन स्वा.सावरकरांना अभिप्रेत असलेला समाजविचार जपण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करु या, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

        स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मोत्सावानिमित्त त्यांचे जन्मगाव भगूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मोत्सव समितीचे निमंत्रक प्रसाद लाड, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, सहायक जिल्हाधिकारी अमोल एडके, भगूरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर, नाशिकचे उपमहापौर प्रथमेश गीते आदींसह मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, भारतभूमीला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी सावरकरांनी आपले जीवन मातृभूमीला अर्पण केले. ते क्रांतीकारकांचे  प्रेरणास्त्रोत होते. त्यांच्या तेजाने क्रांतीकारकांची पिढी निर्माण करण्याचे कार्य केले. अनेकदा अपमान आणि अन्याय सहन करून ही देशसेवेचा विचार सावरकरांनी कधीच ढळू दिला नाही. हे त्यांच्या जीवनातील मोठेपण होते.
अंदमान येथे काळ्यापाण्याची शिक्षा भोगतांना भारतमातेच्या उज्वल भवितव्यासाठी सावरकर सतत कार्यरत राहिले. इंग्रजांनी क्रांतीकारकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी अनेकदा त्यांचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी परिस्थितीला शरण न जाता तरुण पिढीत देशभक्तीचे स्फुल्लींग चेतविले. त्यांच्या तेजाने क्रांतीकारकांची वसाहत निर्माण करण्याचे कार्य केले. अंदमानच्या कारागृहातही त्यांनी कैदांना एकत्र करुन देशभक्तीचे धडे दिले. देशात जोपर्यंत जातीव्यवस्था, रुढी व परंपरा आहे. तोपर्यंत भारत गुलाम राहील हे त्यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी  या परंपरा तोडण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन  त्यांना अभिप्रेत असलेले विचार अनुसरण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करून त्यांनी मराठी भाषेला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला, असे श्री.फडणवीस म्हणाले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरदेखील सावरकरांच्या महान कार्याची दखल पाहिजे तशी घेतली गेली नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
श्री. महाजन म्हणाले, स्वा. सावरकरांनी त्याग, देशप्रेम आणि सहनशीलतेची शिकवण दिली. त्यांचा जीवनलेख सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. सावरकारांसारखे राष्ट्रप्रेमी भगूरच्या मातीतून घडले याचा जिल्हावासियांना अभिमान आहे. त्याग आणि सहनशीलतेची शिकवण देण्याऱ्या सावरकरांच्या स्मारकाचे जतन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच 65 लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती त्यांनी दिली.
तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला भेट देवून पाहणी केली. त्यानंतर स्मारकामधील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

स्मारकस्थळी अभिप्राय नोंदवहीत त्यांनी अभिप्राय नोंदविला. तेजस्वीता, तपस्वीता आणि त्यागाचे मुर्तीमंत उदाहरण असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर लक्षावधी क्रांतीकारकांचे प्रेरणास्त्रोत होते. बारा वर्षापेक्षा अधीक काळ अंदमानच्या शिक्षेची तमा न बाळगता प्रखर तेजाने इंग्रजी साम्राज्याविरोधातील मशाल तेवत ठेवणारे देशभक्त, कवी, समाजसुधारक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या भारतमातेच्या तेजस्वी सुपुत्राच्या घराचे दर्शन मंदिराच्या दर्शनापेक्षा जास्त पवित्र आहेअसे श्री. फडणवीस यांनी आपल्या अभिप्रायात म्हटले आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वा. सावरकर यांच्या जीवनकार्यावर आधारीत दुर्मिळ पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ‘संस्कार भारतीने काढलेल्या रांगोळी प्रदर्शनाची त्यांनी पाहणी केली. नंदेश उमप यांनी सादर केलेल्याशतजन्म शोधीतांनाया स्वा. सावरकर यांच्या गीतांच्या कार्यक्रमाचादेखील त्यांनी आस्वाद घेतला. श्री.लाड यांनी जन्मोत्सव समितीच्यावतीने मुख्यमंत्री महोदयांना स्वा.सावरकर यांचे समग्र साहित्याचा संच भेट दिला. भगूरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर येथे स्वागत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हा दौऱ्यावर ओझर विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्यासमवेत पालकमंत्री गिरीष महाजन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर होते.
पालकमंत्री महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्याच्यावतीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, डॉ.राहुल आहेर, अनिल कदम, महापौर रंजना भानसी, विभागीय आयुक्त महेश झगडेविशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे आदी उपस्थित होते.
------