Friday, 6 April 2018

आरओ प्लॅन्ट उद्घाटन


सप्तश्रृंग गडासाठी 25 कोटीचा विकास आराखडा-दादाजी भुसे
नाशिक, 6 : महाराष्ट्र शासनाने सप्तश्रृंगी गडाला ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्र घोषित केले असून याठिकाणी येणाऱ्या भाविकांना अधिकाधीक सुविधा देण्यासाठी लवकरच 25 कोटीचा विकास आराखडा शासनास सादर करण्यात येऊन त्यास तातडीने मंजूरी देण्यात येईल, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

वणी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या डिजीटल ई-लर्निग क्लासरुम व भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या आर.ओ प्लॅन्टच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तहसिलदार कैलास चावडे, गटशिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण, सरपंच सुमनबाई सुर्यवंशी, मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष रावसाहेब शिंदे, उपसरपंच राजेश गवळी, गिरीष गवळी आदी उपस्थित होते.

 श्री. भुसे म्हणाले, वणी गावातील विकास चांगल्याप्रकारे होत आहे. इंग्लिश माध्यमाच्या स्पर्धेत जिल्हा परीषदेच्या शाळेतील विद्यार्थी टिकला पाहिजे या हेतूने वणी येथील जिल्हा परिषद शाळेत डिजीटल ई-लर्निंग क्लासरूम सुरू करण्यात आले आहे. शासनातर्फे राज्यातील हजार शाळांमध्ये अशी सुविधा निर्माण करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे असा शासनाचा प्रयत्नआहे.   

वणी येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी स्वतंत्र शुद्धीकरण प्रकल्प येत्या काळात उभारण्यात येईल. तसेच वनविभागाकडून अडीच एकर जागा उपलब्ध करुन व्यावसायिकांसाठी डोमची व्यवस्था आणि भाविकांसाठी उद्यानाची व्यवस्था करण्याचादेखील प्रयत्न नव्या आराखड्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ‘निर्मल वारी’च्या संकल्पना गडावर राबविण्यात येऊन येथील स्वच्छता व पावित्र्य राखण्याचा प्रयत्न, सर्वांनी मिळून करावा,असे आवाहन त्यांनी केले.
श्री.भुसे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त निलेश भामरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांना स्कुलबॅगचे वाटप करण्यात आले.
----

Thursday, 5 April 2018

इनोव्हेशन डे समारोप


 समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी योगदान द्या - तुकाराम मुंढे


          नाशिक , 5-  योग्य दृष्टीकोनातून चांगल्या कल्पनांचा विकास करीत समाजाच्या समस्या दूर करण्यासाठी युवा संशोधकांनी योगदान द्यावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.
          नाशिक जिल्हा इनोव्हेशन कौन्सिल आणि नाशिक इंजिनिअरींग क्लस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'इनोव्हेशन डे' उपक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मराठवाडा ऑटो काम्पोनन्टचे संचालक राम भोगले, नाशिक इंजिनिअरींग क्लस्टरचे अध्यक्ष के.एस.पाटील, इएसडीएस सॉफ्टवेअरचे पीयुष सोमाणी, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.

          श्री.मुंढे म्हणाले, इनोव्हेशनच्या माध्यमातून नव्या शोधाची निर्मिती व्हायला हवी. इनोव्हेटरसाठी पैसा हे उद्दिष्ट न राहता सामान्यजनांच्या समस्या सोडविण्याऱ्या नव्या कल्पना उद्दिष्ट असायला हवे. अशा नव्या कल्पना पुढे याव्यात यासाठी शासन स्टार्ट अप आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून नवउद्योजकांना प्रोत्साहन देत आहे. शहरी भागातल्या समस्यांवर उपाय शोधणारे संशोधन करण्यासाठी महानगरपालिका सर्व प्रकारचे सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

          ते म्हणाले, खुले निरीक्षण आणि विचारांनी नव्या कल्पना जन्माला येतात. त्या कल्पनांपर्यंत मर्यादित न राहता नियोजनबद्ध प्रयत्नांच्या माध्यमातून मानवाच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचा विचार व्हायला हवा. अशा नव्या कल्पनांची निर्मिती अधिक प्रमाणात होण्याबरोबर उपयुक्ततेकडेही लक्ष द्यायला हवे. उपयुक्त तंत्रज्ञानाच्या मागचे वैज्ञानिक तत्व जाणून घेतल्यास त्याचा अधिक प्रमाणात उपयोग होऊ शकतो. त्यामुळे नवसंशोधकांनी शोध प्रक्रियेत निरंतरता ठेवावी, असे त्यांनी सांगितले. वाहन उद्योगात इनोव्हेशनला मोठी संधी असल्याचे श्री.मुंढे म्हणाले.

          श्री.भोगले म्हणाले, नवी कल्पना समस्यांवर मार्ग शोधून मानवी जीवन सोपे करते. अशी कल्पना उत्पादनापुरती मर्यादीत न रहाता जीवनातील प्रत्येक क्षेत्रासाठी असावी. इनोव्हेशनमागचे विज्ञान समजावून घेतल्यास अशा कल्पनांना अधिक पुढे आणणे शकय आहे. निरीक्षणाने नव्या कल्पना जन्माला येतात. त्यामागचा सिद्धांत समजावून घेत अशा कल्पनांना उत्तम उत्पादनात परिवर्तीत करावे, असे त्यांनी सांगितले.

          इनोव्हेशन साठी शोधक वृत्ती असणे आवश्यक आहे. त्यासाठी युवकांनी मोकळेपणाने विचार करायला शिकावे. जीवनातील समोर येणाऱ्या मर्यादांना आव्हान देत नवनिर्मितीचे तत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.  शासन इनोव्हेटर्सला विविध पातळ्यावंर सहकार्य करीत असून त्याचा लाभ नव्या संशोधकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
          श्री.जालानी यांनी कार्यसंस्कृती निर्माण करून आपल्यातील क्षमतांचा विकास करीत आव्हानांना सामोरे जा, असे सांगितले.
          मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनात विविध प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
----

त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय


आदीवासी भागातील रुग्णाला चांगली आरोग्य सेवा द्यावी-डॉ.दिपक सावंत


नाशिक, दि.5:- दूर्गम, ग्रामीण व आदीवासी भागातील रुग्ण हा पूर्णपणे शासनाच्या आरोग्य यंत्रणेवर अवलंबून असल्याने  या रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्यात यावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी केले. 
          त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या 50 खाटांच्या विस्तारीत इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे, आमदार निर्मला गावीत, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, आरोग्य उपसंचालक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते.

       डॉ. सावंत म्हणाले, कुपोषित बालकांवर उपचारांच्यादृष्टीने पालघर जिल्ह्यात यशस्वी प्रयत्न झाले असून त्यानुसार इतर ठिकाणी कार्यवाही व्हावी. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या भागाबरोबरच मेळघाट, अक्कलकुवा, धडगाव आदी  ठिकाणांवर अशा पद्धतीने काम करणे गरजेचे आहे. कुपोषण दूर करण्यासाठी  महिला व बालकल्याण, आदिवासी विभाग, ग्रामविकास आदी विभागांचे सहकार्यही महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

          ते म्हणाले, माता सुदृढ नसल्याने ही बालके जन्मत: अतिशय कमी वजनाची असतात. त्यामुळे बालमृत्यु होतात. बालमृत्यु रोखण्यासाठी सॅम- मॅम व कमी वजनाच्या बालकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी गावातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका व सरंपच आदींनी लक्षपूर्वक काम करणे गरजेचे आहे. त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयामध्ये लवकरच बाल अतिदक्षता विभाग सुरु करण्यात येईल, यादृष्टीने संबंधितांनी कार्यवाही करावी, असे निर्देशही डॉ. सावंत यांनी यावेळी दिले.

          डॉ. जगदाळे म्हणाले, त्र्यंबकेश्वर येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. कुंभमेळ्यामध्ये देशभरातून आलेल्या भाविकांना येथे चांगली आरोग्य सेवा दिली आहे. पूर्वीच्या ग्रामिण रुग्णालयाची श्रेणीवाढ करुन उपजिल्हा रुग्णालय झाल्याने अधिक वैद्यकिय सुविधा व  विशेष तज्ज्ञांच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. 
          श्रीमती सांगळे यांनी समाजातल्या शेवटच्या दूर्बल घटकापर्यंत आरोग्यसेवा देण्याची जबाबदारी यंत्रणेने पार पाडण्याची गरज असून त्यासाठी चांगले काम करावे, अशा अपेक्षा व्यक्त केल्या.
          यावेळी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी उप जिल्हा रुग्णालयातील विविध विभागांची पाहाणी करुन संबंधितांना विविध सूचना केल्या.
             
                                                                        0000000

Wednesday, 4 April 2018

इनोव्हेशन डे


राज्याचे इनोव्हेशन धोरण तयार करण्याची बाब विचाराधीन-असीम गुप्ता

         
       नाशिक, दि.4:- विविध क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्याकरिता राज्यासाठी इनोव्हेशन धोरण तयार करण्याचे विचाराधीन आहे, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता आणि ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी केले.  
          नाशिक डिस्ट्रीक्ट इनोव्हेशन कौन्सिल व नाशिक इंजिनिअरींग क्लस्टरच्यावतीने आयोजित इनोव्हेशन डेउपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. क्लस्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशिनाथ पाटील आदी उपस्थित होते.
          श्री. गुप्ता म्हणाले, स्टार्ट अपच्या माध्यमातून नवीन उद्योजक पूढे येत आहेत. अनेकांना संधी मिळत आहे. पण स्टार्ट अप आणि इनोव्हेशन हे पूर्णत: स्वतंत्र असल्याचे मतदेखील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे इनोव्हेशनबाबत स्वतंत्र धोरण ठरविण्याची प्रक्रीया सुरू आहे.

          नाशिक इंजिनिअरींग क्लस्टरमध्ये चांगले काम होत असून उद्योजकांना विविध औद्योगिक सेवा देताना क्लस्टर सामायिक सुविधा केंद्राची भूमिका पूर्ण करत आहे. यामुळे नाशिक क्लस्टर राज्यातील अमरावती, पुणे, नागपूर अशा इतर क्लस्टरसाठी महत्वपूर्ण  आणि तेवढेच मार्गदर्शक आहे. नाशिक मध्ये स्टार्ट अप व्हिलेज, संशोधन केंद्र अशा मागण्या असून त्याबाबतही शासन पातळीवर विचार केला जाईल, असे श्री. गुप्ता यांनी सांगितले.
          श्री.राधाकृष्णन म्हणाले, जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग असून त्यांच्या गरजा पूर्ण तरताना अनेक छोट्या उद्योजकांना काम मिळते. मात्र लघुउद्योजकांनी त्यावरच न थांबता नाविन्यपूर्ण दृष्टीकोन ठेवण्याची गरज आहे. नाशिकमध्ये ‘इनोव्हेशन हब’ देखील विकसीत व्हावे असा प्रयत्न केला जात आहे. अशा उपक्रमांना प्रोत्साहित करण्याचे शासनाचे  धोरण आहे.  या अनुषंगाने डिजीटल शिक्षण देणाऱ्या सुविधायुक्त स्कूल, टेलिमेडीसिन मधील महत्वपूर्ण असे डायग्नोस्टीक टूल आदींचा वापर वाढवण्याकडे भर दिला जात आहे.
          खासदार गोडसे म्हणाले, ‘स्टार्ट अप’ संकल्पना  जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे नेऊ शकते. राज्याच्या विकास धोरणाच्या माध्यमातून  जिल्ह्यात जास्तीत जास्त विकास साधण्यात येईल. यासाठी संशोधन केंद्र, स्टार्ट अप व्हिलेज आदी माध्यमातून काम केले जावे.
          याप्रसंगी त्यांनी नवसंशोधक व उद्योगांद्वारे मांडलेल्या संशोधन संकल्पना प्रकल्पांची पाहाणी करुन माहिती जाणून घेतली.
           नाविन्यपूर्ण उपक्रमांचाइनोव्हेशन डे


 ‘इनोव्हेशन डे’ च्या निमित्ताने आयोजित प्रदर्शनात स्पर्धेच्या युगात वावरणाऱ्या विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशोधनाची चुणूक  दाखवली. आपल्या वैज्ञानिक कौशल्याच्या सहाय्याने त्यांनी  अभिनव  प्रकल्प सादर केले.
इंजिनिअरिंग, फार्मसी, आणि आयटी अशा विविध क्षेत्रांतील विद्यार्थ्यांनी  यात सहभाग घेतला आहे. त्यामध्ये व्हि.एन.नाईक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, के.के.वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ब्रम्हा व्हॅली  कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, एनडिएमव्हीपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, टिएमईडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, संडे व इस्पायर शाळा इत्यादी विविध शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी आहेत.
टिएमईडी या महाविद्यालयाच्या ‍ विद्यार्थ्यांनी वयोवृद्ध तसेच वैद्यकिय उपचार घेणाऱ्या रुग्णांना त्यांचे औषध वेळवर घेता यावे म्हणून ‘डिजीटल एम्पॅक्स स्केअर’ हे यंत्र तयार केले. या यंत्रामुळे अलार्मच्या सहाय्याने रुग्णांना औषधे मिळतील आणि औषधे घेतली कि नाही हे मोबाईल वरील संदेशाने रुग्णांच्या  कुटुंबियांना समजेल.
संघवी  कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाच्या माध्यमातून पेट्रोल चोरी तसेच पेट्रोल गाडीमध्ये व्यवस्थित भरले गेले की नाही याचे उत्तर मिळते.  ‘स्मार्ट टँक’ या उपकरणाद्वारे  पेट्रोलचे मोजमाप ते गळती यासंदर्भात तत्काळ संदेश संबधितांना मिळत असतो.

ब्रम्हा व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने दुचाकी वाहनामध्ये एकाचवेळी दोन इंजिन लावुन वेगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चालकास स्पोर्टस बाईक आणि साध्या बाईकचा आनंद घेता येईल.
एनडिएमव्हीपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने शेतकऱ्यांच्या हितासाठी सोलर ऑपरेटिंग ‘थ्री इन वन ॲग्री मशिन’ तयार केले आहे. त्यामध्ये कटिंग मशीन, फवारणी यंत्र आणि डस्टिंग यंत्र असे तीन उपकरण एकाच वेळी  सौर ऊर्जेच्या  सहाय्याने चालू शकतात.
          चांदवड येथील एसएनजेबी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी पिकअप  वाहनाद्वारे माल वाहतूकीसाठी हायड्रोलिक सुविधा तयार केली आहे.  नदीच्या काठावरील कचरा काढण्यासाठी रीव्हर क्लिनींग मशीन, भिंतीवरील डागडुजी पाहण्यासाठी व्हॅक्यूम प्रेशर, फ्लोटरच्या सहाय्याने पाण्यावर चालणारी सायकल, मल्‍टी युटिलीटी कुलर फ्रिज, कुलर आणि पिण्याचे पाणी, लहान मुलांनी तयार केलेले बॅटरीवर चालणारे कुलर, बुट पॉलिश करणारी यंत्रणा, हायड्रोलिक जेसीबी, क्लिनिंग रोबोट, फिजिओथेरपी सिस्टिम युजिंग कायनेस्ट सेंन्सर अशा अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा प्रदर्शनात समावेश आहे.
---

50 कोटी वृक्ष लागवड


जिल्ह्यात 33 टक्के क्षेत्रावर वृक्षाच्छादनाचा प्रयत्न करा-विकास खारगे


नाशिक, 4 :  शाश्वत विकासासाठी  हरित क्षेत्र वाढणे गरजेचे असून राज्य शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत जिल्ह्यात 33 टक्के क्षेत्रावर वृक्षाच्छादन करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालय येथे 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त राजाराम माने, सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी, प्रधान मुख्य वनसंरक्षक एस.एच.पाटील, अपर मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव महेष गुप्ता, मुख्य वनसंरक्षक टी.रामाराव, टी.एन. साळुंके, उपायुक्त अर्जुन चिखले आदी उपस्थित होते.
श्री.खारगे म्हणाले, वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. टंचाईची परिस्थिती दूर करण्यासाठी आणि नद्य पुर्नप्रवाहीत करण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. केवळ उद्दीष्ट पुर्तता करण्याच्यादृष्टीने या कार्यक्रमाकडे न पाहता पुढच्या पिढीच्या चांगल्या भविष्यासाठी यात सहभाग घ्यावा. जंगलक्षेत्र केवळ 20 टक्के असल्याने जंगल विरहीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी, असे आवहान त्यांनी केले.

ते म्हणाले, नद्यांचे पुनरुज्जीवर होण्यासाठी नदी किनारी दोन्ही बाजूस एक किलोमीटर अंतररावर झाडे लावावीत. शेतजमीनीवरवृक्षाधारीत शेतीकरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करावे. वृक्ष लागवड कार्यक्रमाविषयी विश्वासार्हता वाढविण्यासाठी झाडे जगविण्याचे प्रमाण वाढवावे. जिल्हाधिकारी यांनी वृक्ष लागवड क्षेत्राला भेट देऊन पाहणी करावी, असे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या 2017 च्या अहवालात राज्यात जंगलक्षेत्र, मँग्रुव्हज, बांबू क्षेत्र आणि जंगलातील जलस्त्रोतात वाढ झाल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पर्यावरण रक्षणासाठी हरितसेना उपक्रम राबविण्यात यत असून 45 लाख हरितसैनिकांची नोंदणी करण्यात आल्याचे श्री.खारगे म्हणाले. नागरिकांशी संपर्क वाढवून या उपक्रमाचे महत्व पटवून द्यावे, असे ते म्हणाले.
श्री.माने म्हणाले, नदी किनारी वृक्ष लागवड केल्याने जमिनीची जलधारण क्षमता वाढेल आणि या भागात अतिक्रमणही होणार नाही.  परिसरातील भूजल पातळी वाढण्यासदेखील मदत होऊन पावसाळ्यसानंतरही पाणी उपलब्ध होईल. त्याबरोबर धरणाला लागून असलेल्या गाळपेर जमिनीवरही वृक्षलागवड करण्यात यावी.
जलयुक्त शिवार योजनेची सांगड वृक्षलागवडीशी घालावी. वृक्ष लागवडीसाठी जागा निवडतांना आर्दता धारण करण्याच्या क्षमतेचाही विचार करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात वृक्षलागवड करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रशासन स्तरावर होणाऱ्या बैठकांमध्ये वृक्षसंवर्धन विषयाचा समावेश करावा, असेही श्री.माने म्हणाले.

यावेळी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांनी सादरीकरणाद्वारे यावर्षीच्या वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती दिली. अहमदनगर जिल्ह्यात हरितसेनेअंतर्गत एक लाख 97 हजार, नंदुरबार 39 हजार, धुळे 34 हजार, नाशिक 2  लाख 74 हजार आणि जळगाव जिल्ह्यात 79 हजार नोंदणी करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नंदुरबारसाठी 49 लाख, अहमदनगर 49 लाख 94 हजार, धुळे 43 लाख 39 हजार, नाशिक 72 लाख आणि जळगाव जिल्ह्यासाठी 42 लाख रोपांचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. विभागातील रोपवाटीकेत पुरेशा संख्येत रोपे उपलब्ध आहेत.
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे लाख उत्पादनासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. उतरणे गावात जिल्हा परिषदेमार्फत लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने 10 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. जळगाव येथे त्रिपक्षीय कराराद्वारे मॅगसेसे पुरस्कार प्राप्त निलिमा मिश्रा यांच्या उपस्थितीत 10 हेक्टर क्षेत्रावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
बैठकीत नाशिक महानगरपालिकेने वृक्षसंवर्धन आणि वृक्षगणनेसाठी केलेल्या कार्याचे कौतुक करण्यात आले. नाशिक महापालिकेचे उदाहरण इतर महापालिकांसमोर ठेवले जाईल, असे श्री.खारगे म्हणाले. नाशिक शहरातील वृक्षगणनेत 46 लाख 53 हजार 18 वृक्षांची गणना करण्यात आली असून 250 प्रजाती आढळल्या आहेत. त्यापैकी 70 प्रजाती दुर्मिळ आहेत, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
बैठकीस नाशिक विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, विविध यंत्रणांचे विभागीय अधिकारी उपस्थित होते.
-----

Sunday, 1 April 2018

मोसम चौपाटी लोकार्पण


मोसम नदी स्वच्छ ठेवण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज- दादाजी भुसे


  मालेगाव दि. 1- मोसम नदी चौपाटीचे सौंदर्य कायम ठेवण्याची जबाबदारी महानगरपालिकेची असून नदी स्वच्छ ठेवण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
मोसम नदी चौपाटीचे लोकार्पण  श्री. भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला  आमदार आसिफ शेख, मनपा आयुक्त संगिता धायगुडे, उपमहापौर सखाराम घोडके,  मनपा सभापती सलिम अन्वर, जयप्रकाश बच्छाव आदी उपस्थित होते.
श्री. भुसे म्हणाले,  गेल्या दीड महिन्यापासून महसूल, मनपा, पोलीस, वनकर्मचारी, विविध संघटना व परिसरातील नागरिकांनी मोसम नदी स्च्छता अभियानात सहभाग  घेतल्याने हा सोहळा शक्य झाला आहे. मालेगावच्या सौंदर्यात यामुळे भर पडणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी आणि चौपाटीचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. नदी सुशोभिकरणासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. येत्या काळात मोसम नदी शंभर टक्के स्वच्छ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार शेख यांनी चौपाटीच्या सुशोभिकरणासाठी सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. मनपा आयुक्त धायगुडे यांनी नदीत दुषित पाणी आणि कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई  करण्यात येईल, असे सांगितले.
मोसम नदी  सुशोभित करण्याकरिता  प्रयत्न करणाऱ्या  ईश्वर पवार, मनोज जगताप, उमेश अहिरे, जिभाऊ रौदंळ डॉ. जतीन कापडणीस, अजिक्य भुसे, अविष्कार भुसे  यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.  
चौपाटी  सायंकाळी 4 ते 8 वाजे पर्यंत खुली राहणार असून या चौपाटीमध्ये विविध प्रतिकृती,  खाद्य पदार्थाचे स्टॉल, मनोरंजाचे साहित्य, रोप वाटिका, वाचन कट्टा आदी मनोरंजनाची साधने विद्युत रोषणाई करुन  लावण्यात आले आहेत.
                                                                    0000000